![](https://marathicontent.com/wp-content/uploads/2024/02/shri-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5-2.jpg)
गजानन विजय ग्रंथ सर्व अध्याय
अध्याय १
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।
जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥
कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।
मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥
तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।
कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥
म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां ।
सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥
मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति ।
परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥
आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती ।
जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥
त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन ।
मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥
तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी ।
मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥
त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला ।
साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥
आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा ।
सच्चिदानंदा रमेशा । “पाहि माम्” दिनबंधो ॥१०॥
तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर ।
कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥
जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण ।
सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥
ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा ।
तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥
रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली ।
गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥
तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन ।
चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥
ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा ।
म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥
हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया ।
माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥
हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा ।
ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥
तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर ।
लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥
तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास ।
साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥
तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं ।
लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥
माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता ।
तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥
हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी ।
ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥
आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया ।
गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥
आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर ।
ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥
आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा ।
दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥
गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर ।
हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥
हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता ।
दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥
तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें ।
दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥
जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते ।
तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥
लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर ।
ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥
दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत ।
ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥
आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण ।
करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥
संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर ।
वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥
संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची ।
संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥
त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश ।
आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥
ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे ।
हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥
संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत ।
आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥
भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी ।
ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥
जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन ।
कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥
याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण ।
अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥
नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर ।
महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥
शंकराचार्य जगद्गुरु । जे पदनतांचे कल्पतरु ।
जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥
मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज ।
ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥
नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास ।
गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥
राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं ।
जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥
गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर ।
ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥
ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती ।
ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥
चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष ।
ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥
मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन ।
ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥
म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत ।
नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥
त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले ।
ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥
त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा ।
या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥
मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं ।
तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥
आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग ।
मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥
जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला ।
तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥
माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती ।
तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥
शेगांव नामें वर्हाडांत । ग्राम आहे प्रख्यात ।
खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥
ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर ।
ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥
त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें ।
जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥
हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा ।
प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥
तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा ।
येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥
गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर ।
चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥
शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी ।
म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्न ॥६४॥
जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण ।
संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥
रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी ।
पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥
माझ्या मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा ।
परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥
त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं ।
केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥
खऱ्या संताचें धोरण । न कळे कोणालागोन ।
महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥
या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा ।
वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥
जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून ।
ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥
जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण ।
तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥
तेथ त्या हिर्याची । खाण आहे कोणाचि ।
हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥
ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं ।
शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥
कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान ।
त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥
परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा ।
परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥
लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले ।
त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥
जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार ।
धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥
कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी ।
ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥
गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत ।
चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥
तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी ।
गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥
हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून ।
योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥
शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं ।
हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥
त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां ।
एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥
हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण ।
शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥
त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची ।
त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥
उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार ।
घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥
तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं ।
एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥
कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें ।
पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥
कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत ।
कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥
नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत ।
प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥
मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर ।
आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥
ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।
शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥
शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत ।
हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥
कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती ।
“अन्नम् ब्रह्मेति” ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥
त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन ।
त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥
बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला ।
त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥
दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी ।
दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥
आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य ।
कीं याची करणी विपरीत । वेड्यापरी दिसतसे ॥९९॥
हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता ।
देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥
द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख ।
कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥
बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्त्यासी ।
आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥
खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी ।
ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥
कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा ।
वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥
ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार ।
रत्न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥
पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले ।
या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥
हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं ।
पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिऱ्यातें ॥७॥
प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला ।
गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥
ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना ।
क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥
त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें ।
नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥
तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार ।
भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥
निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला ।
मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥
देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी ।
तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥
देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें ।
पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥
ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी ।
चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥
अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला ।
तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥
जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार ।
अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥
अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली ।
जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥
बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण ।
ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥
सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला ।
व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥
तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं ।
वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥
धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव ।
“निरिच्छा” हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥
सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला ।
पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥
ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत ।
हा ब्रह्मची होय साक्षात् । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥
हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी ।
तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥
पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर ।
मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥
ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें ।
उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥
तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी ।
एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥
तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित ।
परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥
अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी ।
हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥
म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची ।
तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥
हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां ।
बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥
पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार ।
तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥
कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं ।
जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥
तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले ।
तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥
हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं ।
तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥
मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार ।
वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥
ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां ।
व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥
हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार ।
तेथें गढुळ, निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥
पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे ।
सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥
पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा ।
ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥
तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन ।
यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥
ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी ।
अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥
तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत ।
वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥
यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं ।
अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥
हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत ।
हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥
श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥
॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय २
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा ।
पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण ।
कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढ्याते ॥२॥
सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा ।
रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥
तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी ।
पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥
मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून ।
तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥५॥
गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं ।
न हाले दृष्टीपासोनी । गजाननाचें रुप तें ॥६॥
जिकडे पहावें तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास ।
याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥७॥
चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धि करी साची ।
तैसी बंकटलालाची । स्थिति झाली विबुध हो ! ॥८॥
हें हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठें तया ।
वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥९॥
ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें ।
शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥१०॥
घरीं येतां वडील पुसती । भवानी राम सन्मती ।
बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥११॥
चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा ।
ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ? ॥१२॥
तूं पोर्या तरणा ज्वान । नाहीं कशाची तुला वाण ।
ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥१३॥
किंवा शरीरीं कांहीं व्याधी । होतसे ती सांग आधीं ।
चोरुन पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला ॥१४॥
कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान ।
पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥१५॥
बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी ।
घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥१६॥
ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत ।
बंकटलालानें इत्यंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥१७॥
ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला ।
तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥१८॥
योग्यावांचुनी ऐशा क्रिया । मिळती न कोठें पाहावया ।
पूर्वसुकृता वांचोनिया । होणें न दर्शन अशाचें ॥१९॥
तूं घेतलें दर्शन । जन्म तुझा धन्य धन्य ।
भेटतां ते तुजलागून । ने मलाही दर्शना ॥२०॥
ऐशा स्थितींत दिवस चार । गेले निघून साचार ।
बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥२१॥
गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार ।
ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥२२॥
लौकिक यांचा वर्हाडांत । होता मोठया प्रमाणांत ।
ते आले फिरत फिरत । कीर्तन कराया शेगांवीं ॥२३॥
शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी ।
धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥२४॥
बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला ।
मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥२५॥
हा शिंपी पितांबर । भोळां भाविक होता फार ।
त्यासी समर्थाचा समाचार । बंकटलालें कथन केला ॥२६॥
दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले ।
मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥२७॥
मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून ।
जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥
वा चातकातें स्वातिघन । वा मोरासी मेघदर्शन ।
किंवा तो रोहिणीरमण । चकोर पाहातां आनंदें ॥२९॥
तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले ।
विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥३०॥
महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी ।
आण झुणकाभाकरी । माळणीच्या सदनांतून ॥३१॥
बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी ।
आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥
चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ ।
जा जावोनी ओढ्याप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥
पितांबर बोले गुरुराया । ओढ्यास पाणी अल्प सदया ।
पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥३४॥
इतुकें असून तें पाणी । खराब केलें गुरुंनीं ।
तेवीं जाणार्या येणार्यांनीं । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥३५॥
मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन ।
तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥३६॥
नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी ।
उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥३७॥
तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर ।
तुंबा भरेल ऐसें नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥३८॥
तळवे पदाचे भिजतील । इतुकेंच तेथें होतें जल ।
करुन हातांची ओंजळ । तुंब्यांत पाणी भरणें नसे ॥३९॥
ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर ।
हिय्या करुन अखेर । तुंवें स्पर्श केला जला ॥४०॥
तों ऐसें झालें अघटीत । तुंबा ठेवावा जेथ जेथ ।
तो बुडे तेथ तेथ । खळगा पाहून ओढ्याला ॥४१॥
नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान ।
आल तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥४२॥
तो म्हणे ही ऐशी स्थिति । कीं आज झाली निश्चिती ।
ती योगेश्वराची साच शक्ति । संशय येथें धरणें नको ॥४३॥
तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला ।
त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥४४॥
बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी ।
अरे माळिणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥४५॥
काढ सुपारी खिशांतून । फोडोन देई मजकारण ।
तें ऐकतां समाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥
सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी ।
ठेवितां झाला व्याघ्रांबरी । दुदंडी तांब्याचे ॥४७॥
खडकु दुदंडी व्याघ्रांबरी । हीं मुसलमानी नाणीं सारीं ।
चालत होतीं व्यवहारीं । तया वर्हाड प्रांतांत ॥४८॥
पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन ।
काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥४९॥
हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी ।
भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥५०॥
तें तुझ्याजवळ होतें । म्हणून भेटलों पुन्हां तूंतें ।
याचा विचार चित्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥
जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण ।
मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतों ॥५२॥
दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले ।
गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभींचें निरुपण ॥५३॥
निरुपणासी भागवतीचा । घेतला होता एक साचा ।
श्लोक एकादश स्कंधाचा । हंसगीतामधील ॥५४॥
बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ।
तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥५५॥
हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा ।
जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तनश्रवणास ॥५६॥
बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर ।
समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥५७॥
केली विनंती अवघ्यांनीं । श्रोते अती विनयांनीं ।
परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥५८॥
गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर ।
कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥५९॥
तुम्ही साक्षात् शंकर । बरें न बसणें बाहेर ।
धन्यावांचून मंदिर । शून्य साच समर्था ॥६०॥
पूर्वजन्मींचें पुण्य भलें । माझें आज उदेलें ।
म्हणून हे दृष्टी पडले । साक्षात् चरण शिवाचे ॥६१॥
कीर्तनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती ।
वेळ न करा गुरुमूर्ती । चला मंदिरीं माझ्यासवें ॥६२॥
ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां ।
ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥६३॥
तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें ।
आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥६४॥
जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें ।
शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥६५॥
भागवताचा श्लोक सांगसी । आणि त्याच्या विरुद्ध वागसी ।
कथेकर्याची रीत ऐसी । बरवी नव्हे गोविंदा ॥६६॥
पोटभर्या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी ।
जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥६७॥
बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्यां बोलले ।
तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्न हें त्या सांभाळा ॥६८॥
हें न शेगांव राहिलें । पंढरपूर खचीत झालें ।
चालते बोलते येथ आले । साक्षात् हे पांडुरंग ॥६९॥
यांची तरतूद ठेवावी । सेवा यांची करावी ।
यांची आज्ञा मानावी । वेदवाक्यापरी हो ॥७०॥
तरीच तुमचें कल्याण । होईल निःसंशय करुन ।
अनायासें हें निधान । जोडलें त्या दवडूं नका ॥७१॥
कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले ।
बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष मावेना ॥७२॥
आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेंसी ।
बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥
पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें ।
आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥७४॥
पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती ।
म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥७५॥
पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्गुरुनाथ ।
भेटले बंकटलाला प्रत । अस्तमानाचे समयाला ॥७६॥
दिनपति अस्ता गेला । इकडे बोधसूर्य उदेला ।
माणिक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥
गुराखी घेऊन धेनूस । येऊं लागले ग्रामास ।
समर्थांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥
त्या वाटले नंदसुत । आला येथें साक्षात ।
वृक्षावरी करितात । पक्षी किलकिलाट आनंदें ॥७९॥
दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी ।
अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥८०॥
पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अती आनंद झाला मनीं ।
नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरी बैसविलें ॥८१॥
आणि विनविलें जोडोन हात । कांहीं भोजन करा येथ ।
तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥८२॥
शिव आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली ।
ऐसी आहे ऐकिली । स्कंदपुराणीं गोष्ट म्यां ॥८३॥
ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें ।
समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥८४॥
करा येथें भोजन । ऐसें गेलों बोलून ।
परी स्वयंपाकाकारण । अवधी आहे कांहींसा ॥८५॥
स्वयंपाक होईपर्यंत । हे न थांबले जरी येथ ।
तरी प्रदोषकालीं पार्वतीकांत । गेला उपासी घरांतूनी ॥८६॥
त्यास करुं कैसी तोड । ऐसें संकट पडलें जड ।
जनसमुदाय प्रचंड । जमला मौज पाहावया ॥८७॥
विचार केला अखेरीं । दुपारच्या पुर्या आहेत घरीं ।
त्याच ठेवोन तबकांतरीं । पुढें ठेवूं समर्थांच्या ॥८८॥
ते अवघेच जाणती । कपट नाहीं माझ्या चित्तीं ।
भावें भेटतो उमापती । ऐसा आहे सिद्धान्त ॥८९॥
मी शिळें अवर्जुन । यास घालीत नाहीं अन्न ।
शिवाय पक्क्या रसोईकारण । शिळें म्हणणें उचित नसे ॥९०॥
चिंतिल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी ।
आणून ठेविलें समोरी । तबक एक समर्थांच्या ॥९१॥
पुर्या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा ।
भालाप्रती लाविला बुका । कंठीं घातिला पुष्पहार ॥९२॥
गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते ।
जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥
उदरीं सुमारें तीन शेर । अन्न सांठविलें साचार ।
तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥
बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगल स्नान समर्थांसी ।
घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवे ॥९५॥
घागरीं सुमारें शंभर । उष्णोदकाच्या साचार ।
पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥
कुणी शिकेकाई लाविती । कुणी साबण घेऊन हातीं ।
समर्थांतें घासीती । पदकमळ आवडीनें ॥९७॥
कोणी दवना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा ।
कोणी बेलियाच्या मर्दना । करुं लागले निजहस्तें ॥९८॥
अंगराग नानापरी । त्यांचें वर्णन कोण करी ।
बंकटलालाचिया घरीं । उणें नव्हतें कशाचे तें ॥९९॥
स्नानविधि संपला । पितांबर तो नेसविला ।
अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥१००॥
भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी ।
कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥१॥
नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे ।
भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥२॥
तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार ।
तया दिनीं सोमवार । वार शिवाचा होता हो ॥३॥
अवघ्या मंडळींनीं आपुले । मनोरथ ते पूर्ण केले ।
एक मात्र त्यांतून उरले । इच्छाराम शेटजी ॥४॥
हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा ।
भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥५॥
आज आहे सोमवार । मसी उपास साचार ।
घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६॥
त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनी ।
करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥
तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण ।
इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥८॥
पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन ।
त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनी ॥९॥
आणि विनंती केली वरी । झालें आहे दुपारीं ।
आपुलें तें भोजन जरी । परी आतां कांहीं खावें ॥११०॥
आपण जेवल्यावांचून । मी नाहीं घेणार अन्न ।
आहे मजला उपोषण । सोमवारचें गुरुराया ! ॥११॥
अवघ्या भक्तांचा हेत पुरला । माझा मात्र राहिला ।
तो पाहिजे पुरविला । तुम्ही कृपा करुन ॥१२॥
जन कुतूहल दृष्टींनीं । पाहूं लागले तया स्थानीं ।
इच्छाराम तो घेवोनी । नैवेद्य आला परातींत ॥१३॥
आंबेमोहर तांदळाचा । दोन मुदी भात साचा ।
नानाविध पक्वान्नांचा । थाट केला तयानें ॥१४॥
जिलबी राघवदास मोतीचूर । करंज्या अनारसे घीवर ।
शाखांचे नाना प्रकार । वर्णन करावे कोठवरी ? ॥१५॥
अगणित चटण्या कोशिंबिरी । वाडगा दह्याचा शेजारीं ।
तुपाची ती वाटी खरी । आदनाच्या सव्य भागा ॥१६॥
चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण ।
समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥१७॥
पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी ।
खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्पा ॥१८॥
खा हें आतां अवघें अन्न । अघोर्या न करी अनमान ।
पाहों आले अवघे जन । तुझ्या अघोर वृत्तीला ॥१९॥
महाराज भोजना बैसले । अन्न अवघें पार केलें ।
पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेंही पाहा ॥१२०॥
आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर ।
हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥२१॥
खणाणून उलटी झालि । खाल्ल्या अन्नाची ती भली ।
ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥२२॥
खिरीची झाली वासना । रामदासाचीया मना ।
तिची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले कीं ॥२३॥
उलटीं होतां परत । ती भक्षूं लागले सद्गुरुनाथ ।
श्रीरामदासस्वामी समर्थ । वासनेसी जिंकावया ॥२४॥
तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा ।
हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥२५॥
सत्पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन ।
होतें कराया संरक्षण । निसर्गाच्या धर्माचें ॥२६॥
तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें ।
आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥२७॥
असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी ।
नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥२८॥
नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती ।
तों भजन करण्याप्रती । दिंड्या आल्या दोन तेथें ॥२९॥
आवाज ज्यांचे सुस्वर । खडे पहाडी मनोहर ।
विठ्ठलाचा नामगजर । करुं लागले आवडीनें ॥१३०॥
इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं ।
भजनाचिया मिषांनीं । “गणगण गणांत बोते” ॥३१॥
हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून ।
ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥३२॥
’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून ।
लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥३३॥
जो स्वयमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? ।
नामरुपाचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥
अस्ति-भाति-प्रिया ठायीं । योगेश्वर निमग्न राही ।
त्या आनंदा न वर्णवे कांहीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥
आषाढीसी पंढरपूर । वा सिंहस्थीं गोदातीर ।
वा कुंभमेळ्यासी साचार । गर्दी होते हरिद्वारीं ॥३६॥
त्यापरि शेगांवांत । बंकटलालाच्या घरांत।
लांबलांबून असंख्यात । जन येती दर्शना ॥३७॥
स्वामी समर्थ गजानन । हेच विठ्ठल नारायण ।
निश्चय विटेस ठेवून । पाय उभे राहिले ॥३८॥
त्यांचें वचन गोदातीर । आनंद हा हरिद्वार ।
गजबजलें शेगांव नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥
जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? ।
सूर्याचिया प्रकाशाला । अवघेंच आहे सारखें ॥१४०॥
नित्य यात्रा नवी येई । समाराधना होती पाही ।
त्यांतें वाणितां शेषही । थकून जाईल निःसंशय ॥४१॥
तेथें माझा पाड कोण । मी कीटकासमान ।
अवघें वदे गजानन । निमित्त करुन माझ्या मुखा ॥४२॥
समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां ।
अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥
कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन ।
कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥४४॥
त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा ।
प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥४५॥
चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी ।
नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥४६॥
असो आतां पुढीलाध्याया । भाव ठेवा ऐकावया ।
आली पर्वणी साधावया । वेळ करुं नका हो ! ॥४७॥
हें श्रीगजाननचरित्र । आदर्श होवो भाविकांप्रत ।
हेंच विनवी जोडोन हात । दासगणू ईशातें ॥१४८॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ३
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी ।
तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥
तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर ।
तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥
ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा ।
दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥
असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी ।
दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥
लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती ।
मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥
एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें ।
महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥
ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला ।
पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥
कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन ।
वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥
उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन ।
तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥
परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं ।
वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्हाटें ॥१०॥
ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास ।
येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥
तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी ।
कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥
भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस ।
होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥
मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला ।
ऐसा गोसावी बैसला । कोपर्यांत एकीकडे ॥१४॥
दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार ।
अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥
तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन ।
म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥
समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला ।
आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥
तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ ।
या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥
गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा ।
मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥
माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? ।
येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥
जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी ।
आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥
ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार ।
झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥
तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ ।
बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥
तो पहा त्या कोपर्याला । आहे बिचारा दडून बसला ।
हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥
आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत ।
मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥
ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही ।
कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥
त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार ।
धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥
न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष ।
त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥
मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला ।
तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥
जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत ।
त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥
गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला ।
गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥
महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस ।
पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥
नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली ।
आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥
गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत ।
जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥
मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों ।
परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥
आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची ।
हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥
तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण ।
परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥
भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत ।
अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥
अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी ।
कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥
तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले ।
अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥
तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण ।
तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥
त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर ।
म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥
ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें ।
ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥
महाराज किंचित् घोटाळले । परि अखेर होय म्हणाले ।
माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥
गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली ।
चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥
ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित ।
तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥
कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन ।
आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥
ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां ।
परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥
पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी ।
नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥
वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित ।
कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥
वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं ।
याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥
कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून ।
एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥
चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया ।
ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥
कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन ।
कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥
कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं ।
कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥
असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात ।
होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥
व्याधी शरीरीं बळावली । शक्ति पार निघून गेली ।
प्रयत्नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥
नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार ।
प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥
आम्हीं प्रयत्न केले अती । परी यश ना आलें तिळरती ।
यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥
तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत ।
जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥
तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले ।
परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥
वैद्यानें टेकिले हात । प्रयत्न झाले कुंठित ।
आतां अखेरच्या यत्नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥
बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी ।
यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥
साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत ।
सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥
त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर ।
नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमयाची ॥६५॥
तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत ।
जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥
जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा ।
आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥
महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत ।
तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥
बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं ।
तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥
जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें ।
भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥
भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण ।
दुसर्याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥
प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं ।
आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥
समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन ।
जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥
हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला ।
उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥
तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर ।
सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥
मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली ।
ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥
आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी ।
भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥
पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत ।
संत न ते साक्षात् । देव कलीयुगीचे ॥७८॥
येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा ।
श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥
मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा ।
यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥
संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती ।
परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥
सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी ।
परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥
याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे ।
तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥
मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार ।
त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥
आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक ।
त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥
आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी ।
नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥
त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर ।
त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥
मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा ।
औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥
एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश ।
तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥
हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे ।
भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥
मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख।
पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥
तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा ।
होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥
म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण ।
तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥
कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं ।
परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥
श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी ।
श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥
चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे ।
वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥
साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी ।
माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥
षड्विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना ।
आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥
म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण ।
उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥
गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी ।
म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥
देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर ।
साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥
तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला ।
त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥
कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना ।
स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥
त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान ।
स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥
हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना ।
परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥
जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर ।
परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥
वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर ।
तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥
असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी ।
कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥
चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर ।
वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥
वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला ।
तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥
जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो ।
जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥
जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण ।
हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥
स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान ।
तेज हिर्याचें हिर्यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥
गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई ।
ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्याला ॥१४॥
श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद ।
संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥
तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं ।
मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥
भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें ।
प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥
मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा ।
कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥
चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी ।
निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥
ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे ।
त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥
महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर ।
हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥
तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं ।
कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥
परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली ।
तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥
हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना ।
मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥
ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले ।
विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥
काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार ।
महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥
त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना ।
हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥
तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त ।
तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥
ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं ।
त्यानें जाऊन तत्क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥
मंडळींचे काम झालें । परी संकट ओढवलें ।
घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥
समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी ।
तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥
म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला ।
या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥
मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं ।
घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥
त्या घुमर्याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास ।
तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥
सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये ।
तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥
ऐशा रीतीं ठोकला । छड्याखाली घाटोळाला ।
विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥
खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात ।
ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥
म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन ।
संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥
मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती ।
भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥
तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई ।
परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥
खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त ।
त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥
पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? ।
सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥
संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती ।
ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥
ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन ।
जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥
मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं ।
परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥
मोगर्याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन ।
चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥
तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी ।
किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥
नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें ।
पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥
जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता ।
संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥
कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी ।
वा मागितली करवंटी । कामधेनूपासून ॥१५०॥
ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें ।
तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥
हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ ।
तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥
श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ४
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।
महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥
तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।
तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥
तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।
जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥
अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।
माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥
मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।
तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥
बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।
प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥
वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।
पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥
अक्षयतृतीयेचा दिवस । वर्हाडांतील लोकांस ।
विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥
त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।
महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥
बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।
तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥
सकाळपासून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।
त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥
ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।
चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥
विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।
कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥
पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।
कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥
मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।
अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं आपुल्या ॥१५॥
त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।
दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥
आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।
ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥
पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।
विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥
जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।
अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥
पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।
नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥
महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।
त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥
साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।
उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥
आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।
ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥
विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।
चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥
तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।
ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥
सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।
त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥
गांजा तंबाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।
वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥
जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।
मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥
बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।
नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥
तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।
आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥
साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।
परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥
जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।
नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥
पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।
हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥
ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।
नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥
ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।
बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥
बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।
विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥
काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।
म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥
महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।
नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥
बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।
चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥
तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।
प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥
काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।
हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥
काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।
कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्या साधूला ॥४२॥
याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।
आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥
या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।
जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥
असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।
तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥
त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।
बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥
लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।
सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥
चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।
मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥
मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।
गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥
गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।
गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥
त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।
कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥
गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।
गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥
हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।
माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥
मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।
जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥
आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।
सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥
कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।
पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥
ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।
बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥
अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।
पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥
माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।
हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥
आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।
पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥
त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।
तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥
तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।
म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥
सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।
नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥
जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।
चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥
आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।
मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥
क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।
साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥
समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।
घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥
आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥
तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।
ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥
माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें करुन ।
समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥
जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।
तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥
महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।
तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥
तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।
पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥
अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।
हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥
ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।
कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥
चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।
निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥
श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।
अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥
कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।
कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥
कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।
कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥
तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।
दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥
चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।
इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥
तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।
पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥
जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।
गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥
त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।
जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥
चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।
दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥
तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।
आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥
अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।
ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥
मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।
ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥
तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।
नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥
चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।
जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥
समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।
आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥
ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।
करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥
कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।
उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥
दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।
त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥
त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।
ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥
ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।
कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥
आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।
कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥
बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।
बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥
कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।
धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥
चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।
लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥
लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।
भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥
चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।
राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥
शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।
तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥
वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।
तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥
प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।
ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥
माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।
म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥
जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।
म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥
म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।
आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥
आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।
माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥
ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।
गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥
आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।
वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥
ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।
तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥
हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।
प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥
तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।
अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥
जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।
घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥
ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।
ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥
अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।
त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥
तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।
दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥
तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।
यत्न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥
शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।
भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥
तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।
समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥
रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥
आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।
कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥
रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।
आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥
तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।
धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥
बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।
ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥
आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।
तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥
त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।
तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥
माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।
यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥
नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।
हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥
यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।
आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥
माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।
परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥
कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।
संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥
ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।
महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥
श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।
जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥
किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।
ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥
माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।
ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥
तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।
आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥
ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।
झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥
इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।
कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥
म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।
उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥
असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।
चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥
असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।
ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥
वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।
वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥
पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।
एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥
ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥
सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।
ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥
महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।
ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥
मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।
झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥
सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।
आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥
दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।
जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥
थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडळी आनंदली ।
दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥
संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।
कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥
बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।
अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ५
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया ।
दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥
मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार ।
सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥
परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी ।
पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥
तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा ।
हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥
सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे ।
आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥
जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं ।
देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्या उड्या ॥६॥
गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी ।
ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥
महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर ।
ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥
महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें ।
कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥
श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी ।
गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥
त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत ।
शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥
ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी ।
बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥
गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे ।
घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥
मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता ।
तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥
कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत ।
तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥
मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी ।
पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥
कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले ।
कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥
परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना ।
याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥
कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला ।
शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥
कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी ।
थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥
ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर ।
भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥
परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना ।
म्हणून सार्या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥
गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती ।
जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥
अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार ।
यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥
कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित ।
कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥
कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा ।
लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥
याचें आतां पूजन । करुं अवघे आपण ।
जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥
पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी ।
परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥
कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली ।
कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥
कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार ।
दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥
गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन ।
कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥
ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला ।
अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥
दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून ।
मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥
कदाचित् आपणांसी । पाहण्या येतील काननासी ।
तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥
या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत ।
शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥
तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले ।
गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥
पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी ।
समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥
जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला ।
भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥
म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी ।
आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥
कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले ।
आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥
हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल ।
ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥
बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर ।
समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥
ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली ।
त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥
ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर ।
पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥
मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले ।
समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥
घंटाघड्याळे वाजती । लोक अवघे भजन करिती ।
जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥
मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत ।
बसविले आणून सद्गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥
तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला ।
आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥
ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती ।
गजानन श्रीसद्गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥
मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां ।
प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥
नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं ।
पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥
त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार ।
हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥
पुढें दुसर्या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी ।
आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥
ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी ।
आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥
अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी ।
धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥
आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा ।
निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥
शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात ।
बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥
बंकटलाल पत्नीसहित । गेला पिंपळगांवांत ।
समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥
आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण ।
त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥
गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन ।
शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥
गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी ।
मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥
कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित ।
त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥
तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी ।
आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥
बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले ।
शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥
जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला ।
तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥
पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती ।
नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥
वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे ।
जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥
बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा ।
मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥
चुरमुर्याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ ।
महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥
पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती ।
ही का साहूची होय रीति । माल दुसर्याचा बळें न्यावा ! ॥७०॥
मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं ।
तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥
लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता ।
जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥
तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन ।
जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥
ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें ।
विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥
बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता ।
आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥
जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? ।
आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥
तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर ।
माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥
घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? ।
जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥
इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती ।
धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥
तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें ।
परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥
ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन ।
तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥
ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां।
अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्हाड प्रांतीं ॥८२॥
त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन ।
प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥
महाराजांची चालगती । वायुचिया समान होती ।
अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥
मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क ।
क्वचित् कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥
माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला ।
हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥
तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान ।
करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥
अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा ।
अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥
ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी ।
घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥
शेतकर्याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती ।
कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥
अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण ।
बिचार्यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥
त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत ।
एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥
आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी ।
आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥
पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर ।
ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥
ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली ।
त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥
समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला ।
पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥
पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें ।
पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥
धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती ।
याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥
भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर ।
तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥
अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी ।
वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥
ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण ।
आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥
भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? ।
वा जागा चोरट्याला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥
तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर ।
भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥
मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर ।
त्या आयत्या पिठावर । रेघोट्या तूं ओढूं नको ॥४॥
तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी ।
जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥
तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं ।
म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥
हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून ।
थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥
थोड्या दूर अंतरावर । एक होती साच विहीर ।
तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥
स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां ।
उच्च स्वरें वेड्या वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥
ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य ।
पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥
समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी ।
विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्न ॥११॥
तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण ।
तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥
तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी ।
साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥
समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं ।
हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥
डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण ।
जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्गुरु ॥१५॥
समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा ।
प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥
देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली ।
वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥
मानवी यत्न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें ।
पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥
तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य ।
मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥
प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा ।
बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥
कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी ।
तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥
दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार ।
चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥
उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला ।
तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥
तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें ।
नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥
ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा ।
उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥
साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत ।
ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥
तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें ।
चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥
वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस ।
तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥
यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी ।
बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥
शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून ।
धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥
हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।
लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥
तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून ।
आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥
टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी ।
दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥
त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून ।
भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥
तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर ।
तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥
कांहीं असो सद्गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां ।
लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥
खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया ।
आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥
भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं ।
आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥
तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण ।
आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥
पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां ।
भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥
माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार ।
होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥
ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्न केला ।
साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥
तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक ।
आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥
वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही ।
सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥
सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे ।
हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥
पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती ।
केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥
खर्या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून ।
तुकारामें केलें वर्णन । “संतचरणरजा” चे अभंगीं ॥४७॥
तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा ।
आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥
पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास ।
पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥
मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा ।
वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥
तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले ।
विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥
उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार ।
करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥
असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत ।
महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ६
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी ।
अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥
त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा ।
मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥
आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष ।
आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥
म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा ।
रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥
बालकांचें हीनपण । मातेलागीं दूषण ।
हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥
असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी ।
तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥
गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।
महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥
बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी ।
विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥
विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार ।
गर्द छायेचे वृक्ष थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥
आगट्या पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा ।
तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥
त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें ।
चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा उठल्या कीं ॥११॥
त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी ।
कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥
त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा ।
घोंगड्याचा करुन बुरखा । कोणी गेले पळून ॥१३॥
प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती ।
अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥
ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले ।
विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥
माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों ।
कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥
ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत ।
अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥
वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची ।
योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥
माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी ।
त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥
यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर ।
बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥
कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला ।
कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥
अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण ।
झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥
बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी ।
हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥
जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन ।
माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥
जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त ।
जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥
ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या ।
बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥
महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी ।
वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥
अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी ।
माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥
याचा करी विचार । संकट आल्या कोणावर ।
कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥
जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती ।
ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥
बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर ।
महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥
महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया ।
आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥
गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार ।
याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥
बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले ।
अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥
मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा ।
त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥
माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा ।
पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६॥
हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन ।
कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥
सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले ।
कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥
महाराज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना ।
करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥
त काढण्या चिमट्याची । गती नाहीं मुळींच साची ।
साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥
ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें ।
तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥
तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार ।
कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥
पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं ।
अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥
असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला ।
आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥
हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा ।
कंठमणी विठ्ठलाचा । भक्तिबलानें झाला असे ॥४५॥
त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्तलीलामृतांत ।
वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥
हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार ।
आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥
मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्गुरु ।
जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥
अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी ।
नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥
हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण ।
निंब अश्वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥
लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती ।
तृण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥
ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत ।
म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥
सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं ।
विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥
गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें ।
स्वामी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥
एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्वर ।
एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥
एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ ।
एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥
एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार ।
एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥
दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा ।
बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥
अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले ।
नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥
मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा ।
या सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥
या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत ।
ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥
त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां ।
उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥
तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन ।
कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥
फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें ।
परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥
योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा ।
तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥
योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून ।
कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥
याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची ।
आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥
गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते ।
तैसेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥
यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें ।
चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥
म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी ।
एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥
नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया ।
ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥
प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत ।
दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥
तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं ।
मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥
देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें ।
तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥
तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें ।
तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥
आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी ।
देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥
नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात ।
तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥
तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया ।
अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥
पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत ।
क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥
ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें ।
भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥
खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत ।
दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥
दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु ।
पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥
दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला ।
तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥
संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत।
संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥
दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।
गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥
ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी ।
नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥
नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन ।
ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥
तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले ।
नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥
एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती ।
गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥
त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी ।
या महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥
तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले ।
नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥
पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण ।
दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥
दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी ।
असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥
श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा ।
ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥
या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित ।
चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥
कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्हाडीं पसरली साची ।
याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥
प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार ।
उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥
पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला ।
सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥
तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी ।
मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥
त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला ।
वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥
चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी ।
समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥
ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही ।
कुक्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥
चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें ।
भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥
भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां ।
जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥
ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति ।
बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥
सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार ।
ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥
तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां ।
तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥
सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती ।
दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥
ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं ।
संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥
अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं ।
प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥
मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः ।
ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥
शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली ।
न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥
प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर ।
मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥
माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें ।
दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥
नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला ।
तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥
(श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? ।
झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥
ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन ।
योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥
माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला ।
तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥
मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर ।
सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥
कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको ।
मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥
आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ ।
त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥
तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं ।
प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥
ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला ।
त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥
ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव ।
अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥
तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्हाडांत ।
सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥
महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले ।
हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥
आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? ।
चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥
ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला ।
उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥
हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार ।
पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥
पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला ।
जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥
चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर ।
अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥
या उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी ।
जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥
श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण ।
तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥
गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं ।
म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥
त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी ।
श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥
बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी ।
राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥
गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर ।
योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥
मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी ।
तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढ्यापुरता येईन तेथ ॥३७॥
हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला ।
स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥
गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर ।
प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥
छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी ।
ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥
त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर ।
परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥
याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा ।
माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥
निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार ।
तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥
मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां ।
भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ७
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा ।
संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥
तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर ।
ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥
तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी ।
जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥
भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला ।
तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥
ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला ।
याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥
नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती ।
ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥
मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत ।
नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥
मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला ।
तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥
तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची ।
ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥
पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण ।
जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥
या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन ।
देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥
रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा ।
दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥
हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव ।
याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥
हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन ।
घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥
पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी ।
आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥
महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस ।
थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥
कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका ।
गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥
पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण ।
कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥
कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन ।
कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥
कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत ।
अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥
पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार ।
याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥
या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती ।
गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥
आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार ।
पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥
बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती ।
कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥
उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा ।
म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥
नेहमीं कटकटी मारामार्या । शेगांवांत होती खर्या ।
पाटील एक्या मापीं सार्या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥
हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत ।
वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥
असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी ।
महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥
कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? ।
ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥
कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती ।
तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥
त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार ।
याचा करी विचार । बर्या बोलानें येधवां ॥३१॥
त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें ।
अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित् ॥३२॥
ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर ।
म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥
नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं ।
हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥
हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले ।
सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥
गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी ।
ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥
मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा ।
शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥
हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं ।
कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥
जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण ।
काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥
तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा ।
अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥
गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल ।
पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥
एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं ।
महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥
तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत ।
उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥
तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं ।
मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥
तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले ।
समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥
खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून ।
असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥
हरी पाटील उठवावया । लागला यत्न करावया ।
परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥
घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली ।
पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥
हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? ।
अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥
हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी ।
खोड्या आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥
त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान ।
आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥
जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला ।
श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥
कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई ।
आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥
समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला ।
ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥
कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी ।
कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥
मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर ।
वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥
पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार ।
तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥
तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं ।
गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥
तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें ।
ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥
हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज ।
येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥
हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास ।
शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥
ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें ।
जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥
असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून ।
अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥
ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती ।
हरी तूं त्या जोगड्याप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥
आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार ।
तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥
त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड ।
त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥
ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे ।
पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥
मैंद साधूचे वेष घेती । वेड्यावांकड्या कृत्या करिती ।
बाया बापड्या भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥
सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा ।
तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥
ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला ।
परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥
चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची ।
मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥
हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला ।
अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥
जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची ।
तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥
आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर ।
त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥
ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले ।
लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥
मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार ।
ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥
मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती ।
त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥
तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले ।
समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥
तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर ।
ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥
भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी ।
या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥
तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य ।
तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥
हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं ।
तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥
अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी ।
उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥
मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली ।
उगीच नाहीं चाल केली । झोंपड्या पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥
यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें ।
गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥
म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग ।
यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥
ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत ।
जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥
परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले ।
कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥
तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं ।
म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥
महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला ।
असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥
त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस ।
तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥
ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला ।
हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥
त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली ।
आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥
श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस ।
तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥
लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती ।
योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥
पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते ।
सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥
हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं ।
करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥
समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून ।
खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥
दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात् ।
त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥
ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी ।
ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥
मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला ।
परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित् ॥१॥
गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें ।
अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥
प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई ।
आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥
हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला ।
तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥
नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण ।
करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥
अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची ।
कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥
श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे ।
श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥
गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं ।
पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥
याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा ।
वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥
कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं ।
तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥
सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी ।
मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥
तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ ।
नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥
आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना ।
म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥
तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ ।
आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥
साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं ।
संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥
तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें ।
मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥
अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां ।
इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥
तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती ।
इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥
त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर ।
तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥
ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले ।
आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥
सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्नवादी असशी निगुती ।
मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥
धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें ।
मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥
तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढ्या अती ।
तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्हाडांत ॥२३॥
मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? ।
आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥
खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्नाधीन ।
पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥
तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी ।
दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥
मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर ।
तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥
खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था ।
तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥
याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख ।
तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥
पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी ।
परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥
तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड ।
तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥
हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण ।
आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥
हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें ।
कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥
हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस ।
तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥
कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची ।
गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥
तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला ।
कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥
त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं ।
पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥
थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें ।
पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥
आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण ।
तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥
पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी ।
पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥
हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा ।
शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥
एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची ।
अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥
प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात ।
सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥
शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन ।
एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥
तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत ।
छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥
पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी ।
पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥
तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन ।
तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥
ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी ।
तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥
ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण ।
पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥
तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत ।
ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥
हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ ।
परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ८
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥
तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥
तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥
गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥
अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥
जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥
ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥
हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥
तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥
मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥
ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥
तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥
असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।
मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥
जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।
अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥
क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।
नेतसे यमसदनाला । प्रयत्न पडती लुळे तेथ ॥१५॥
असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।
करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥
पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।
कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥
तो असे मर्या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।
तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥
पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।
गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥
उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।
तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥
तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।
त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥
बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।
कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥
तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।
कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥
तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।
देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥
कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।
तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥
ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।
मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥
ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।
भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥
त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।
पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥
त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।
महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥
पाटील दुसर्या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।
तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥
तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।
मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥
वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।
ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥
त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।
समाजविलें अधिकार्यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥
कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।
कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥
फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।
आज्ञा झाली अधिकार्याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥
शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।
पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥
खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।
तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥
ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।
तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥
अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।
बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥
खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।
श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥
त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।
करणारा न कोणी आन । राहिला या वर्हाडीं ॥४१॥
लौकिकीं यत्न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।
खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥
येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।
महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥
सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।
तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥
त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।
देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥
त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।
समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥
उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।
बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥
त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।
ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥
अब्रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।
अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥
त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।
अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥
जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।
होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥
तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।
प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥
तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।
नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥
ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।
आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥
घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।
नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥
इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।
खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥
अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।
वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥
स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।
खर्या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥
तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।
एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥
मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।
परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥
म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।
सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥
जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।
किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥
तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।
जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥
पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।
कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥
पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।
नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥
असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।
ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥
तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।
परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥
तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।
तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥
त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।
जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥
मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।
म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥
आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।
हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥
ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।
वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥
मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।
उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥
जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।
तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥
चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।
वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥
तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।
मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥
सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।
दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥
विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥
हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।
हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥
परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।
कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥
कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।
हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥
असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।
देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥
ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।
महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥
श्रोते खर्या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।
दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥
गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।
या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥
एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।
लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥
हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।
हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥
त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।
एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥
समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।
कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥
हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।
हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥
तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।
येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥
तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।
ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥
समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।
राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥
महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।
सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥
खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।
समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥
असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्भुत ।
येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥
समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।
म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥
गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।
जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥
गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।
ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥
ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।
महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥
हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।
ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥
शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।
लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥
तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।
पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥
तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।
मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥
गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।
ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥
आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।
मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥
कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।
आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥
जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।
तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥
दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।
मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥
समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।
गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥
त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।
तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥
गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।
पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥
“नैनं छिन्दन्ति” हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।
ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥
निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्यास नाहीं पटलें ।
ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥
सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।
गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥
लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।
येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥
तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।
या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥
अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।
त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥
पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।
चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥
त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।
ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥
कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।
पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥
तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्गुरुनाथा ।
पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥
लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।
तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥
तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।
कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥
अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।
तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥
त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।
ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥
“नैनं छिन्दन्ति” श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।
आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥
जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।
आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥
ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।
ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥
भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्त पिळदार ।
तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥
पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।
परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥
श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।
हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥
त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।
मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥
ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।
महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥
तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।
उभा केला समोर । आपल्या सद्गुरुरायाच्या ॥३५॥
’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।
ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥
गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्या आहे संत ।
शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥
माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।
केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥
तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।
मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥
शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।
आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥
तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।
अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥
म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥
गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥
लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।
तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥
अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।
तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥
ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।
स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥
मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।
आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥
ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।
अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥
नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।
तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥
गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।
ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥
स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।
प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥
स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।
होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥
उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।
सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥
ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥
ही गोष्ट दुसर्या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।
जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय ९
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥
तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥
तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥
गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥
अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥
जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥
ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥
हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥
तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥
मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥
ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥
तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥
असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।
मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥
जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।
अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥
क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।
नेतसे यमसदनाला । प्रयत्न पडती लुळे तेथ ॥१५॥
असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।
करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥
पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।
कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥
तो असे मर्या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।
तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥
पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।
गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥
उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।
तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥
तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।
त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥
बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।
कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥
तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।
कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥
तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।
देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥
कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।
तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥
ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।
मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥
ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।
भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥
त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।
पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥
त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।
महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥
पाटील दुसर्या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।
तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥
तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।
मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥
वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।
ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥
त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।
समाजविलें अधिकार्यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥
कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।
कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥
फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।
आज्ञा झाली अधिकार्याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥
शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।
पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥
खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।
तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥
ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।
तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥
अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।
बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥
खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।
श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥
त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।
करणारा न कोणी आन । राहिला या वर्हाडीं ॥४१॥
लौकिकीं यत्न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।
खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥
येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।
महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥
सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।
तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥
त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।
देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥
त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।
समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥
उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।
बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥
त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।
ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥
अब्रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।
अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥
त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।
अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥
जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।
होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥
तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।
प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥
तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।
नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥
ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।
आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥
घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।
नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥
इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।
खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥
अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।
वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥
स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।
खर्या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥
तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।
एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥
मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।
परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥
म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।
सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥
जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।
किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥
तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।
जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥
पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।
कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥
पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।
नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥
असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।
ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥
तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।
परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥
तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।
तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥
त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।
जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥
मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।
म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥
आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।
हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥
ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।
वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥
मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।
उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥
जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।
तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥
चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।
वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥
तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।
मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥
सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।
दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥
विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥
हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।
हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥
परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।
कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥
कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।
हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥
असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।
देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥
ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।
महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥
श्रोते खर्या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।
दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥
गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।
या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥
एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।
लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥
हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।
हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥
त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।
एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥
समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।
कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥
हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।
हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥
तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।
येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥
तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।
ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥
समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।
राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥
महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।
सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥
खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।
समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥
असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्भुत ।
येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥
समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।
म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥
गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।
जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥
गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।
ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥
ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।
महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥
हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।
ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥
शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।
लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥
तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।
पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥
तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।
मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥
गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।
ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥
आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।
मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥
कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।
आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥
जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।
तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥
दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।
मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥
समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।
गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥
त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।
तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥
गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।
पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥
“नैनं छिन्दन्ति” हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।
ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥
निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्यास नाहीं पटलें ।
ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥
सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।
गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥
लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।
येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥
तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।
या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥
अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।
त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥
पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।
चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥
त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।
ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥
कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।
पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥
तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्गुरुनाथा ।
पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥
लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।
तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥
तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।
कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥
अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।
तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥
त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।
ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥
“नैनं छिन्दन्ति” श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।
आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥
जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।
आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥
ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।
ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥
भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्त पिळदार ।
तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥
पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।
परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥
श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।
हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥
त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।
मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥
ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।
महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥
तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।
उभा केला समोर । आपल्या सद्गुरुरायाच्या ॥३५॥
’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।
ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥
गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्या आहे संत ।
शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥
माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।
केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥
तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।
मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥
शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।
आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥
तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।
अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥
म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥
गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥
लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।
तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥
अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।
तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥
ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।
स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥
मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।
आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥
ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।
अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥
नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।
तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥
गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।
ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥
स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।
प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥
स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।
होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥
उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।
सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥
ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥
ही गोष्ट दुसर्या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।
जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १०
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया ।
सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥
देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं ।
माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥
माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून ।
फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥
ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी ।
ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥
तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें ।
पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित् ॥५॥
तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत ।
रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥
असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी ।
जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥
हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत ।
मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥
कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित ।
सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥
त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले ।
मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥
उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं ।
वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥
कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा ।
भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥
कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार ।
दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥
धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली ।
दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥
प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें ।
यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥
इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली ।
सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥
तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें ।
कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥
गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे ।
वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥
दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्हाडांत ।
हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥
त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं ।
तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥
गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी ।
चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥
ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला ।
कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥
आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन ।
होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥
गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला ।
हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥
पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं ।
श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥
चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां ।
सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥
तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति ।
गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥
परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना ।
बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥
महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर।
तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥
तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें ।
अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥
ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता ।
हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥
समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं ।
आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥
असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत ।
त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥
तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा ।
राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥
तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला ।
भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥
त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान ।
म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥
प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त ।
केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥
कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण ।
अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥
म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला ।
होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥
असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी ।
मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥
त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस ।
गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥
बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची ।
त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥
म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य ।
महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥
डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी ।
वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥
तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? ।
शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥
पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर ।
महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥
ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां ।
माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥
ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची ।
एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥
मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं ।
तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥
कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन ।
हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥
तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले ।
निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥
महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी ।
येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥
तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण ।
वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥
जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार ।
मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥
जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी ।
तो नाहीं रागावला ॥५५॥
तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर ।
आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥
बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत ।
यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥
माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें ।
आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥
सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार ।
तो जागा देण्यास इन्कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥
सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा ।
म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥
समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं ।
परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥
समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार ।
भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥
रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी ।
हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥
वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची ।
पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित् आपुल्या ॥६४॥
पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं ।
परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥
भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया ।
म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥
तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर ।
रत्न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥
लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड ।
मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥
एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण ।
परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥
बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी ।
कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥
ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर ।
त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥
तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति ।
झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥
हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण ।
त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥
एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती ।
ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥
मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली ।
मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥
तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले ।
कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥
परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला ।
कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥
भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार ।
परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥
तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी ।
मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥
जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार ।
तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥
मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला ।
कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥
बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं ।
समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥
बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त ।
पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥
ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून ।
हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥
मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें ।
निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥
महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी ।
या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥
ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला ।
लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥
तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं ।
तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥
त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला ।
मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥
सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते ।
आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥
सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला ।
श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥
तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें ।
सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥
वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित ।
धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥
वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें ।
तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥
घरीं बांधून ठेवितां । चर्हाटें तोडी हां हां म्हणतां ।
सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥
ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण ।
लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥
गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना ।
कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥
लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला ।
किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥
सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी ।
वाटेल त्या प्रयत्नासी । करुन या विबुध हो ॥९९॥
एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्न केला ।
गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥
तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें ।
तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥
मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून ।
परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥
ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति ।
गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥
तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला ।
अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥
साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें ।
आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥
तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें ।
तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्न नानापरीचे ॥६॥
एकही यत्न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला ।
हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥
ती खायालागून । गाय आली धांवून ।
ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥
साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी ।
आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥
जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें ।
स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥
समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी ।
तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥
महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा ।
गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥
चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत ।
शिंगांचीही तीच गत । केली चर्हाटें काथ्याच्या ॥१३॥
ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत ।
ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥
अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय ।
तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥
तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत ।
परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥
जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें ।
आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥
बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली ।
पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥
खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन ।
समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥
ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला ।
समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥
समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास ।
तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥
ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार ।
उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥
बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली ।
गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥
त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्हाट जाण ।
सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥
अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते ।
जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥
असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा ।
विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥
त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत ।
परि न आला गुण किंचित् । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥
त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती ।
म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥
रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा ।
दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥
करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर ।
त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥
आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या ।
माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥
अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण ।
माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥
त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी ।
तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥
जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया ।
तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥
यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले ।
श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥
भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं ।
आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥
प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला ।
तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥
यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम ।
लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥
बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला ।
प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥
निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले ।
शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥
बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून ।
आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥
आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं ।
आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥
त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें।
हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥
अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय ।
आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥
माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें ।
निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥
तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला ।
पत्नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥
ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले ।
जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्नीस ॥४७॥
परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य ।
रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥
शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली ।
पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥
निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी ।
तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥
लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर ।
म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥
मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी ।
मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥
आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला ।
तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥
घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली ।
अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥
परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य ।
महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥
म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? ।
लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥
मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें ।
फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥
लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला ।
परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥
भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर ।
खजिन्याच्या उमर्यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥
आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें ।
ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥
हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन ।
बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥
जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान ।
परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥
सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी ।
दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥
तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची ।
गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥
परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला ।
खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥
जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें ।
भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥
मी कृपा करावया । आलों होतों या ठायां ।
याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥
तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत ।
अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥
म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् ।
याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥
श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? ।
वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ ।
सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥
अध्याय ११
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति ।
ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥
तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर ।
जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥
तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया ।
म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥
जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत ।
नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥
शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती ।
रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥
उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें ।
परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥
तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार ।
क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥
नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत ।
त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥
तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर ।
तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥
त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन ।
माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥
देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला ।
मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥
बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी ।
त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥
सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून ।
निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥
या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर ।
बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥
उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा ।
दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥
एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें ।
तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥
उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख
कोणी म्हणती निःशंक । डाँक्टरा धाडा बोलवणें ॥१७॥
भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी ।
माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥
त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें ।
ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥
गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर ।
बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥
तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून ।
हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥
सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही ।
तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥
तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण ।
तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥
तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना ।
इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥
दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड ।
नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥
हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें ।
आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥
जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी ।
तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेड्या करीन ॥२७॥
परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी
या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥
बोल आतां झडकर । काय तुझा विचार ।
ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥
भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी ।
जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥
लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत ।
ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥
मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? ।
तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥
ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन ।
खर्याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥
कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया ।
या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥
महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान ।
अरे वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥
जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी ।
परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥
त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा ।
प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥
संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून ।
या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥
पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें ।
आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥
या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें ।
असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥
पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य ।
तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥
म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका ।
काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥
पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं ।
म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥
त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला ।
तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥
तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास ।
कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥
म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें ।
या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥
आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों ।
याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥
तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी ।
दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥
ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें ।
मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥
भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण ।
चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥
ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं ।
भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥
बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत ।
माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥
महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा ।
या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥
त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही ।
तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥
पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर ।
पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥
त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया ।
तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥
ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत ।
परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥
हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती ।
परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥
त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें
एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥
बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी ।
जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥
श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार ।
आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ
मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला ।
माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥
माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास ।
भव्य व्हावें वर्हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥
तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना ।
होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥
संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं
इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥
स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें ।
पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥
ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची ।
ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥
तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें ।
यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥
उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती ।
जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥
माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास ।
चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥
तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर ।
जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥
तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार ।
नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥
भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी ।
जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥
त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ ।
ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥
वेड्या कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी ।
तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥
भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? ।
तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥
आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें ।
आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥
म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती ।
त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात् ॥७८॥
गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान ।
अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥
ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी ।
हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥
चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर
बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥
मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली ।
शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥
कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन ।
गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥
वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा ।
तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥
हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत ।
धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥
राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार ।
शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥
गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला ।
आज माझा बंधु आला । वर्हाडांतून गजानन ॥८७॥
जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन ।
माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥
हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् ।
देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥
शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले ।
कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥
नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर
ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥
हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी ।
माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥
माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें ।
म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥
महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत ।
बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥
त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा ।
म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥
तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास ।
तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥
त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर ।
रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥
आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत ।
श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥
तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला ।
पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥
उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित ।
आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥
अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी ।
एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥
छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन ।
लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥
बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्गुरुनाथा ।
भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥
तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर ।
माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥
लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या ।
अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥
पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्हाडासी ।
त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥
बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले ।
भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥
आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत ।
तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥
तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं ।
शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥
तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां ।
ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥
उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार ।
काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥
उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला ।
एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥
भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण ।
पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥
चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी ।
वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥
इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन ।
“विठ्ठल विठ्ठल नारायण” । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥
हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला ।
त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥
भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून ।
वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥
भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती ।
तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥
भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर ।
महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥
त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला ।
संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥
लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस ।
या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥
समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती ।
ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥
ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं ।
केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥
आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर ।
मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥
सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा ।
लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥
दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण ।
होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥
स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें ।
अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥
जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची ।
झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥
निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर ।
ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥
अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी ।
तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥
दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन ।
तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥
चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत ।
तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥
काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती ।
मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥
यायोगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले ।
भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥
तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून ।
नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥
या भंडार्यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा ।
प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥
कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार ।
हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥
दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत ।
राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥
त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं ।
काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥
त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें ।
म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥
आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा ।
तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥
या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें ।
म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥
जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती ।
कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥
म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें ।
भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥
म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्याचा ।
ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥
तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा ।
अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥
तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण ।
ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥
आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण ।
मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥
ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें ।
परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥
ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी ।
ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥
पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? ।
पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥
हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती ।
आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥
अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें ।
उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥
दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ ।
तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥
मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले ।
बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥
चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं ।
येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥
श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित ।
ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥
होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें ।
काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥
विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार ।
खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥
म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून ।
सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥
चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार ।
दारु ठासिली अखेर । आंत दोर्या घालुनी ॥६१॥
एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्यांतून ।
तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्याचीया गांठीवरी ॥६२॥
पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना ।
पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥
तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं ।
सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥
म्हणून गणू जवर्याला । मिस्तरी तो बोलला ।
तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोड्या सरकीव ॥६५॥
आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी ।
बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥
त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी ।
म्हणून या गणू जवर्यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥
काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां ।
त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥
या गणू जवर्याची । निष्ठा समर्थावरी साची ।
आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥
एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली ।
दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥
दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत ।
तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥
गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून ।
माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥
विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा ।
दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥
तों गणू जवर्या भली । कपार हातां लागली ।
त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्याची ॥७४॥
एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं ।
उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥
छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार ।
डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्याला ॥७६॥
तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना ।
दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥
त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत ।
पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥
मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला ।
अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥
गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं ।
बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥
परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला ।
त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥
गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले ।
लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥
दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं ।
गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥
वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत ।
समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥
गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी ।
गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥
त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला ।
कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥
पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी ।
मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥
जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार ।
गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥
गणू म्हणे सद्गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां ।
तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥
म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों ।
ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥
ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें ।
तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १२
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।
माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥
तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।
विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥
तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।
आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥
माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।
लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥
असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला ।
धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥
त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची ।
कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥
तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास ।
तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥
येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी ।
कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥
बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला ।
आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥
ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान ।
जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥
बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी ।
षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥
प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून ।
मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥
शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी ।
एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥
गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत ।
कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥
बहुमोल हिर्याची । वामकरीं घातिली पौची ।
रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥
जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे ।
त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥
अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार ।
त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥
एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं ।
ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥
बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार ।
ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥
श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण ।
महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥
या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी ।
मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥
त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता ।
ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥
त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन ।
श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥
असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें ।
हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥
मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्याचा ।
मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥
अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श ।
या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥
अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण ।
केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥
जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी ।
मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥
हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला ।
तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥
माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी ।
तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥
ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले ।
चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥
दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन ।
हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥
त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे ।
ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥
त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं ।
परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥
वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून ।
ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥
जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची ।
पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥
‘ शर्कराखंडखाद्यानि ‘ । ऐसें म्हणोनिया वदनीं ।
कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥
अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें ।
वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥
हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण ।
तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥
आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला ।
संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥
बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास ।
परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥
असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा ।
होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥
त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली ।
एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥
फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर ।
तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥
अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर ।
ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥
नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं ।
नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥
तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार ।
हें फाटकें धोतर । पोतेर्यांच्या उपयोगी ॥४७॥
तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी ।
हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥
तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून ।
यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥
पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना ।
भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥
तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार ।
गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥
श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत ।
परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥
पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी ।
त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥
त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें ।
काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥
हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान ।
जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥
तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं ।
तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥
तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला ।
उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥
वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें ।
तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥
ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली ।
ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥
पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर ।
जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥
माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी ।
जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥
डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन ।
मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥
पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी ।
चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥
तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर ।
जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥
अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी ।
लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥
परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा ।
हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥
ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? ।
ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥
लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला ।
परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥
दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं ।
श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥
यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा ।
चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥
गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले ।
आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥
म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार ।
बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥
शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा ।
झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥
समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? ।
वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥
पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें ।
मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥
एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला ।
तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥
पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार ।
मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥
त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण ।
म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥
तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी ।
म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥
ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण ।
अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥
काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची ।
खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥
देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा ।
तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥
स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान ।
त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥
अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली ।
ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥
त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं ।
नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥
हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा ।
तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥
ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील ।
खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥
कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे ।
बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥
नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार ।
तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥
बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका ।
एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥
तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं ।
बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥
गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष ।
मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥
शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर ।
संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥
मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी ।
तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥
ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार ।
झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥
त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी ।
काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥
निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर ।
स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥
हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा ।
पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥
माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला ।
आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥
माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी ।
नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥
प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला ।
जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥
जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर ।
संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥
देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् ।
मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥
माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं ।
पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥
तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य ।
तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥
आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई ।
या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥
लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर ।
जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥
लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती ।
जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥
कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून ।
पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥
चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति ।
यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥
गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य ।
खापर्या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥
तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला ।
फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥
मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली ।
श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥
आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं ।
चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥
याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन ।
येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥
तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें ।
ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥
जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला ।
कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥
तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें ।
उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥
श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत ।
इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥
त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी ।
जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥
मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा ।
आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥
आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत ।
एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥
शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून ।
महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥
तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला ।
जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥
त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान ।
आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥
राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी ।
म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥
ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता ।
महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥
म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण ।
चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥
ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला ।
श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥
मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून ।
तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥
तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत ।
परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥
तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी ।
मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥
जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल ।
तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥
ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली ।
समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥
कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत ।
सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥
भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें ।
बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥
सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला ।
भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥
म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची ।
आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥
समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान ।
जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥
राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी ।
जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥
व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून ।
त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥
जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां ।
हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥
हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली ।
त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥
बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ‘ करी ‘ ।
त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥
आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला ।
परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥
तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित ।
तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥
तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा ।
समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥
मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला ।
द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥
यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत ।
सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥
विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा ।
जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
अध्याय १३
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।
हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥
तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।
गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥
तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।
ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥
दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।
रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥
तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।
दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥
मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।
मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥
ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।
माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥
आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।
विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥
भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली ।
वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥
गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत ।
मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥
कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? ।
चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥
ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन ।
या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्यासाठीं ॥१२॥
श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं ।
ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥
स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा ।
अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥
अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं ।
तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥
सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून ।
प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥
तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं ।
हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥
इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची ।
ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥
रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली ।
प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥
रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास ।
जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥
तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा ।
पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥
संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार ।
त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥
म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा ।
पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥
वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार ।
त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥
अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा ।
तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥
संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन ।
स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥
संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा ।
एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥
त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती
तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥
ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर ।
खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥
नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार ।
क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥
असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं ।
झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥
बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें ।
दगड चुना रेतीचें । सामान गाड्या वाहती ॥३२॥
त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी ।
त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥
आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाट्यानें ।
म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥
एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी ।
तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥
तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? ।
आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥
महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं ।
मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥
मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला ।
तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥
बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी ।
बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥
बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले ।
गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥
समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले ।
तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥
ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत ।
त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥
महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी ।
मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥
त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन ।
साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥
एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला
समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥
त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण ।
जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥
पुढार्यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्यांनीं ।
आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥
यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास ।
परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥
यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं ।
त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥
अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा ।
एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥
हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला ।
जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥
त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती ।
चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥
कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला ।
दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥
मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी ।
या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥
म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला ।
तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥
तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें ।
मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥
त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी ।
तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥
तेंच खरें अखेर । घडून आलें साचार ।
तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥
समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें ।
असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥
आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार ।
म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥
मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला ।
त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥
यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग ।
उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥
करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली ।
कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥
म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती ।
समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥
श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत ।
तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥
महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई ।
कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥
हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्टर ।
सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥
परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती ।
येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥
डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर ।
मारिली त्याच्या डोक्यावर ।अति जोरानें विबुध हो ॥६९॥
म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला ।
स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥
फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ ।
खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥
तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला ।
बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥
तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं ।
लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥
तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता ।
तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥
आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें ।
त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥
तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला ।
जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥
हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर ।
त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥
त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो ।
तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥
यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून ।
आलास कीं रे धांवून । या वेड्यापिशापाशीं ॥७९॥
गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा ।
म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥
अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी ।
कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥
तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा ।
कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥
तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास ।
हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥
त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही ।
मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥
तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां ।
समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥
त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार ।
स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥
समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी ।
थल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥
ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला ।
तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥
मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची ।
तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥
कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! ।
दुर्गंधीही किंचित् । येत होती तियेला ॥९०॥
तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं ।
कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥
असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें ।
हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥
आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा ।
अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥
ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें ।
लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥
चाफे झाले पूर्ववत् । भेगा पदींच्या निमाल्या समस्त ।
दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥
गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन ।
प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥
बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची ।
ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥
संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर ।
येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥
तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली ।
समर्थ साक्षात् चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥
मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला ।
पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥
गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर ।
आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥
ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली ।
त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥
राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत ।
केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥
ऐसें संकेतें बोलले । थापट्या मारुन जागें केलें ।
आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥
हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा ।
येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥
हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी ।
ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥
मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा ।
पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥
मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत् ।
म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥
आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों ।
नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥
हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा ।
चुकेल चौर्यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥
समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती ।
या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥
ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला ।
दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥
पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची ।
त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥
प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा ।
समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥
ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन ।
वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥
हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला ।
मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥
असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी ।
बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥
मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला ।
मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥
ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां ।
नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥
त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत ।
मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥
मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी ।
मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥
झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर ।
दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥
झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा ।
मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥
पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत ।
भजनी दिंड्या अमित । आल्या भजन करावया ॥२४॥
आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका ।
तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥
झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी ।
भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥
झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार ।
लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥
स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें ।
योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥
झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण ।
तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥
पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा ।
भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥
चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी ।
कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥
घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें ।
मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥
आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी ।
हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥
निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा ।
आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥
आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल ।
वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥
झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून ।
तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्हा पुण्याची ॥३६॥
तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा ।
तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥
आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी ।
पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥
मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें ।
हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥
दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला ।
तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥
झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली ।
महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥
लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त ।
पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्या असे ॥४२॥
हा उकिरड्या नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा ।
भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥
हें उकीर्डा नाम वर्हाडांत । पोर नसल्या वांचत ।
लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥
तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत ।
तैसा उकीर्डा वर्हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥
हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी ।
येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥
जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं ।
जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥
तैसाच हा वर्हाडांत । वारी वद्यपक्षांत ।
करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥
असो एकदां वर्हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात ।
बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥
या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते ।
अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥
आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर ।
ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥
मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे ।
तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥
पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत ।
त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥
ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली ।
त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥
त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी।
तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥
कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली ।
शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥
येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर ।
एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥
गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत ।
ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥
पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला ।
गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥
शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं ।
काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥
हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना ।
दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥
वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर ।
जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥
माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी ।
ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥
शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर ।
बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥
तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला ।
देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥
उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास ।
आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥
पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी।
उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥
मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास ।
नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥
बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला ।
पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥
तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली ।
कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥
आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर |
टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥
तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी ।
गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥
कंप अशक्ततेनें । राहिला देहाकारणें ।
करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥
घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें ।
कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥
पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्तता राहिली किंचित् ।
हें गुरुभक्तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥
गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी ।
कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥
सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला ।
हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥
संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी ।
मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १४
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया ।
सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥
ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली ।
शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥
भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन ।
वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥
शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी ।
बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥
जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा ।
दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥
हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें ।
बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥
तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु ।
भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥
एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा ।
बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥
हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न
उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥
श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात ।
परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥
या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी ।
तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥
ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला ।
आली पाळी बिचार्याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥
घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण ।
लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥
विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें ।
भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥
तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर ।
भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥
कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान ।
पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥
ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला ।
पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥
जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन ।
संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥
बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी ।
अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥
जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी ।
तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥
जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल ।
सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥
यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया ।
आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥
ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर ।
अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥
एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली ।
तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥
श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं ।
भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥
बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी ।
अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥
तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा ।
तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥
तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें ।
व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥
आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी ।
याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥
ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला ।
तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥
आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें ।
घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥
आपल्या वर्हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत ।
आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥
संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी ।
उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥
ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून ।
म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥
किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें ।
कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥
कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी ।
ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥
दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून ।
कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥
अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये ।
प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥
आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून ।
तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥
नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया ।
परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥
तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला ।
ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥
जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ ।
बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥
त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी ।
खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥
काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें ।
खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥
त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा ।
नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥
ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण ।
आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥
रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला ।
बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥
तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर ।
एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥
त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत ।
पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥
करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया ।
जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥
त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण ।
मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥
घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची ।
वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥
जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां ।
वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥
बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले ।
मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥
दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला ।
गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥
तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? ।
ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥
आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून ।
उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥
जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती ।
त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥
ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला ।
बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥
एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती ।
जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥
या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन ।
या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥
म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली ।
तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥
मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल ।
यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥
बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी ।
घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥
चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले ।
ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥
तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर ।
घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥
हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना ।
आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥
तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून ।
बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥
महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं ।
उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥
मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान ।
तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥
तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली ।
होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥
श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार ।
तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥
जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला ।
मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥
आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून ।
ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥
कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी ।
लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥
महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक ।
नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥
तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान ।
तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥
म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें ।
माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥
मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण ।
आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥
समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत ।
मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥
ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले ।
पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥
नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट ।
मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥
कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले ।
कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥
कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा ।
थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्यांचा ॥८४॥
पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत ।
गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥
रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी ।
पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥
चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले ।
आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥
कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर ।
बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥
खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला ।
गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥
ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून ।
पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥
परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत ।
म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥
गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं ।
ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥
तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा ।
मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥
ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें ।
गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥
तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी ।
फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥
छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर ।
नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥
परी महाराज निर्धास्त होते । ‘ गिनगिन गणांत बोते ‘ ।
ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥
मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती ।
उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥
चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले ।
आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥
त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ ।
नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥
गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी ।
वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥
ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत ।
नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥
कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें ।
आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥
तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण ।
तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥
ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें ।
हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥
श्लोक ( अनुष्टुप छंद )
नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी ।
मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥
ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें ।
नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥
नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी ।
नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥
कोळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश ।
भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥
नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली ।
आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥
ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण ।
बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥
सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें ।
तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥
मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका ।
आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥
मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर ।
ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥
क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी ।
वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥
तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार ।
कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥
बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? ।
तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥
तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां ।
तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥
कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर ।
माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥
अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा ।
संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥
म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार ।
जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥
ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण ।
समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥
परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात ।
होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥
सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले ।
शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥
या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण ।
हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥
या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत ।
ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥
सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला ।
तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥
सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण ।
गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥
वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं ।
अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥
त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत ।
मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥
थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी ।
भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥
आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले ।
विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥
वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन ।
पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥
रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला ।
जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥
तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला ।
त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥
मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा ।
आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥
म्हणा ” साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा ।
तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास ” ॥३६॥
हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें ।
घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥
माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत ।
महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥
गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें ।
भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥
ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा ।
येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥
त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न ।
हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥
बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला ।
जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥
पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं ।
खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥
संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी ।
सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥
ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा ।
स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥
योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी ।
भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत ।
आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥
ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी ।
हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥
जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत ।
वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥
खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना ।
हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥
योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर ।
करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥
श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥
अध्याय १५
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।
तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥
राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।
तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥
आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।
आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥
या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।
देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥
एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।
पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥
अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।
कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥
शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।
देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥
देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।
आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥
तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।
मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥
टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।
दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥
निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।
ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥
करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।
सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥
वाक्चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।
धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥
कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।
ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥
तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।
लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥
झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।
मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥
दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान् बडेबडे ।
जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥
अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।
नांव ऐकतां टिळकांचें । वर्हाड सारें आनंदलें ॥१८॥
शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।
झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥
शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।
ती वर्हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥
त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।
वर्हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥
माता होती वर्हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।
अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥
आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।
आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥
आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।
ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥
अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।
तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥
या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।
श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥
शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।
समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥
टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्न ।
त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥
ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।
ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥
तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।
तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥
फिरेल नागवा सभेंत । “गिण गिण गणांत” ऐसा म्हणत ।
मारील वाटे कदाचित् । तो लोकमान्याला ॥३१॥
कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।
गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥
त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेड्याकारण ।
जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेड्यापरी ॥३३॥
खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।
तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥
खर्याखोट्याची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।
म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥
ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।
आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥
येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।
आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥
वेड्यापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।
सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥
करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।
याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥
स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।
शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥
त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।
तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥
पाहा पाहा कोल्हटकरा । वर्हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।
यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥
यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।
खर्या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥
बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।
तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥
मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।
चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥
खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।
आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥
वर्हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।
कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥
शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।
वर्हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥
सण अक्षय्यतृतीयेचा । वर्हाडप्रांतीं महत्त्वाचा ।
परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥
तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।
लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥
शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।
ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥
मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।
म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥
परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।
साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥
सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।
गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥
सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।
त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥
श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।
खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥
दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।
सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥
आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।
त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥
सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।
मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥
“दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।
स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥
त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।
जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥
त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।
म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥
तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।
श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥
म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।
अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥
स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।
स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥
यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्न ।
ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥
ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।
तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?” ॥६७॥
ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।
गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥
आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।
जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥
त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।
आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥
अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।
ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥
सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।
खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥
भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।
दोर्या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥
राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।
वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥
प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।
त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥
दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।
ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥
अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।
बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥
तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।
सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥
मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।
तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥
लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।
येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥
तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।
तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित् ॥८१॥
कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।
जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥
कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।
कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥
जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।
ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥
चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।
तुम्ही अलोट प्रयत्न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥
अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।
होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥
सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।
कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥
ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।
टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥
या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।
जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥
ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।
समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥
ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।
वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥
तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।
स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥
यश तुमच्या प्रयत्नासी । नाहीं निश्चयेंसी ।
आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥
जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।
हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥
माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।
ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥
भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।
आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥
प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।
दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥
झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।
तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥
हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।
मान जगत्-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥
या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।
त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥
बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।
केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥
कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।
कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥
हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।
या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥
येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।
कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥
स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।
पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥
स्वातंत्र्य हे साचार । येतें जातें वरच्यावर ।
त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥
गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।
आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥
यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।
चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥
असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्पावन जातीचा ।
श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥
तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।
आंग्लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥
पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।
म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥
तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।
तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥
आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।
उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥
टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।
अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥
तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।
ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥
द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।
घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥
तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्यासी ।
जो मन्रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥
त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।
तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥
मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।
दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥
चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।
त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥
दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।
उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥
पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।
आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥
दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।
बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥
मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।
म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेड्या करुं नको ॥२४॥
अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।
सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥
त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।
कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥
ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।
बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥
तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।
याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥
ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।
हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥
अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।
या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥
तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।
योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥
तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।
ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥
पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।
विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥
एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।
कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥
महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।
कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥
जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।
तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥
श्रीधर बी.ए.एम्.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।
शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥
संत साक्षात् ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।
त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥
पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।
म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥
हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।
वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १६
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा ।
परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥
तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण ।
ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥
आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? ।
काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥
म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका ।
आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण ।
आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥
गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत ।
महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥
हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी ।
हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥
त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही ।
निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥
ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार ।
भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥
ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला ।
कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥
गजाननाच्या वार्या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी ।
परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥
अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण ।
शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥
तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला ।
या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥
‘ गिन गिन गणातें ‘ हें भजन । पिशापरी आचरण ।
कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥
म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें ।
केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥
उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण ।
तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥
गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी ।
गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥
यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं ।
म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥
तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक ।
भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥
त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला ।
जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥
ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण ।
अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥
दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला ।
तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥
पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर ।
उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥
पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? ।
गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥
जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ ।
तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥
कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला ।
लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥
मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे ।
नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥
तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण ।
‘ गण गण ‘ ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥
आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास ।
ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥
पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून ।
तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥
पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया ।
नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥
बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार ।
पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥
पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला ।
तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥
जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार ।
तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥
उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना ।
म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥
स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण ।
कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥
तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी ।
ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥
किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन ।
ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥
मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या ।
त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥
ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं ।
तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥
अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां ।
दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥
पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं ।
मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥
मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला ।
तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥
तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही ।
आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥
झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत ।
दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥
तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला ।
तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥
या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी ।
समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥
करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा ।
भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥
त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन ।
तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥
झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत ।
पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥
प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? ।
हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥
सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला ।
खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥
पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची ।
ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥
लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या ।
त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥
दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण ।
मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥
पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त ।
आडमार्गानें किंचित् । जाऊं न देती तयांला ॥५६॥
निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात ।
तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥
एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून ।
होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥
सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार ।
मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥
या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती ।
म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥
या कवराकारण । दोन पुत्र होते जाण ।
गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥
कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती ।
तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥
लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान ।
म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥
कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी ।
राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥
एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून ।
त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥
तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं ।
जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥
पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे ।
परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥
भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां ।
मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥
घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी ।
जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥
माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी ।
आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥
भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची ।
ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥
हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? ।
हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥
ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत ।
तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥
नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? ।
मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥
भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? ।
माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥
पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण ।
म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥
नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार ।
तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥
ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी ।
मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥
तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला ।
नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥
गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे ।
आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥
तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल ।
पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥
तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं ।
यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥
सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? ।
कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥
मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही ।
तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥
भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर ।
ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥
भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्याचें चून जाण ।
लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥
नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला ।
वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥
ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी ।
भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥
ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां ।
पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥
तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची ।
तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥
अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला ।
म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥
मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? ।
आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥
अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं ।
म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥
हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा ।
माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥
ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी ।
नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥
गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी ।
ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥
थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार ।
मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥
मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों ।
म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥
तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण ।
तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥
ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित ।
चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥
कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा ।
न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥
नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत ।
पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥
कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर ।
कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्या कोणाच्या ॥३॥
परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला ।
वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥
आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून ।
आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥
त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति ।
त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥
तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा ।
आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥
मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें ।
नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥
ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला ।
समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥
दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी ।
झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥
समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार ।
उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥
त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन ।
बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥
तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों ।
नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥
ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता ।
म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥
कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं ।
काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥
ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी ।
कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥
त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण ।
एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥
तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां ।
कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥
जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत ।
सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥
तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें ।
भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥
भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला ।
सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥
समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी ।
पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥
भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया ।
यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥
आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान ।
सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥
ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला ।
समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥
शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार ।
एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥
घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं ।
अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥
चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन ।
कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥
ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा ।
घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥
जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत ।
एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥
तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी ।
नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥
ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला ।
तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥
तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला ।
ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्याच्या दृष्टीसी ॥३३॥
त्याची शिकार करण्या भली । शिकार्यानें आपुली ।
नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥
त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला ।
त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥
छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर ।
थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥
कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना ।
होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥
मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित ।
नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥
ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत ।
एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥
डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता ।
नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥
कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास ।
झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥
तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल ।
कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥
मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी ।
शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥
तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें ।
अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥
ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली ।
तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥
झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून ।
जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥
तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें ।
दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥
ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची ।
प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥
ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर ।
संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १७
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला ।
जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥
हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर ।
तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥
प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं ।
रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥
दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर ।
नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥
त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची ।
पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥
तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया ।
ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥
तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत ।
पुरविशी भक्तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥
त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी ।
दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥
गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत ।
तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥
चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण ।
गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥
जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत ।
त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥
एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ ।
खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥
एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी ।
त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥
त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला ।
हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥
तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ ।
विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥
भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी ।
भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥
मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे ।
आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥
तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा ।
येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥
फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील ।
याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥
दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण ।
मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥
भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं ।
चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥
मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका ।
मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥
ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी ।
चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥
ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन ।
मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥
भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी ।
बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥
महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले ।
जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥
तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा ।
डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥
जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।
योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥
आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार ।
त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥
पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं ।
महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥
अरे वेड्या नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा ।
बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥
हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां ।
अधिकार्याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥
मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला ।
म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥
दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें ।
योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥
मास्तर पोलिसाच्या अधिकार्याला । ऐशा रीतीं बोलला ।
तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥
हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर ।
याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥
तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी ।
मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥
आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित ।
मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥
स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी ।
बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥
तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें ।
कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥
महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती ।
कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥
त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली ।
शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥
बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर ।
डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥
व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही ।
तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥
महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि ।
म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥
तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष ।
तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥
जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें ।
कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥
तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून ।
पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥
त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं ।
म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥
हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न ।
बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥
श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची ।
मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥
तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना ।
तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥
खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली ।
ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥
जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला ।
याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥
कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें।
तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥
तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी ।
अधिकार्यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥
बर्या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें ।
ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥
तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून ।
तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥
शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला ।
रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥
हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ ।
करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥
शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला ।
त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥
जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें ।
लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥
इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर ।
बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥
मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले ।
या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥
ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं ।
तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥
गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य ।
जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥
या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत ।
कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥
नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा ।
म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥
ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून ।
आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥
तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी ।
उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥
तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन ।
जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥
हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा ।
किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥
हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त ।
नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥
जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा ।
परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥
अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून ।
तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥
तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान ।
म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥
वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही ।
तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥
ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला ।
आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥
महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित ।
भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥
म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला ।
ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥
समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी ।
करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥
भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला ।
तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥
समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं ।
विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥
हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास ।
भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥
या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी ।
बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥
याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा ।
होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥
त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं ।
जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥
अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥
तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले ।
अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥
अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास ।
जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥
तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं ।
त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥
तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला ।
आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥
पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून ।
कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥
महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते ।
अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥
दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला ।
महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥
महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास ।
त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥
यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण ।
यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥
या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी ।
मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥
तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव ।
दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥
हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर ।
याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥
ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा ।
साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥
जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले ।
कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥
महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं ।
जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥
शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून ।
तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥
म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना ।
या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥
दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत ।
मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥
परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं ।
तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥
तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत ।
मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥
काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले ।
याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥
त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत ।
मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥
महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले ।
भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥
आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी ।
म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥
तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें ।
महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥
श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी ।
परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥
अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे ।
मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥
तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला ।
तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥
ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण ।
काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥
महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं ।
आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥
गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला ।
आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥
समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण ।
होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥
धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य ।
तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥
खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची ।
ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥
सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें ।
आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥
यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? ।
पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥
तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान ।
हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥
धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी ।
परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥
हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी ।
जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥
महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले ।
या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥
पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी ।
परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥
शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा ।
हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥
असो या बापुरावाची । कांता एक होती साची ।
तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥
मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात ।
घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥
बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार ।
कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥
या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी ।
क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥
भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला ।
आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥
खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित ।
अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥
महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला ।
केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥
तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! ।
तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥
ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन ।
तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥
जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली ।
गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥
ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन ।
केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥
त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची ।
नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥
असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत ।
नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥
त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी ।
जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥
पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले ।
आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥
पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं ।
नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥
गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती ।
आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥
तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! ।
या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥
त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा ।
ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥
खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! ।
जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥
तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित ।
श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥
हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी ।
वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥
लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून ।
नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥
गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी ।
स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥
भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान ।
घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥
संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी।
त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥
स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें ।
विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥
नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन ।
शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥
शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १८
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।
हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥
हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।
हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥
काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।
तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥
भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।
ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्णन बहुसाळ ॥४॥
म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।
सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥
अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं ।
तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥
हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य ।
शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥
बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी ।
ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥
बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत ।
घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥
परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला ।
तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥
बायजेकडे पाहून । जननी करी रोदन ।
माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥
भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी ।
दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥
शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर ।
हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥
कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं ।
बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥
नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी ।
तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥
ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून ।
आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥
बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा ।
तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥
डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर ।
जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥
तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी ।
इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥
त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना ।
म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥
हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं ।
आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥
झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन ।
वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥
ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें ।
कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥
परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना ।
ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥
बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण ।
त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥
जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला ।
दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥
बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही ।
कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥
ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं ।
आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥
तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर ।
कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥
तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार ।
सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥
ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना ।
होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥
अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत ।
तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥
खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी ।
बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥
बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा ।
अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥
मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन ।
अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥
त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला ।
पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥
भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी ।
महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥
तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी ।
महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥
बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर ।
कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥
तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले ।
अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥
जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात ।
उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥
तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला ।
घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥
परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं ।
निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥
समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत ।
त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥
पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला ।
शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥
त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले ।
तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥
पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी ।
ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥
पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी ।
तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥
हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें ।
तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥
बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य ।
यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥
परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी ।
भोगण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥
पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता ।
बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥
पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं ।
म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥
या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार ।
नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥
भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं ।
पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥
ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? ।
कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥
वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला ।
कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥
भुलाई म्हणे नवर्यासी । हिला नका ठेवूं ऐसी ।
लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥
ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते ।
एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥
जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस ।
सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥
संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते ।
पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥
भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्या आला तोही ।
चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥
पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन ।
कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥
लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती ।
दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥
भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष ।
हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥
शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला ।
ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥
ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी ।
जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥
तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला ।
माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥
ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून ।
गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥
घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला ।
पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥
महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात ।
ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥
भाऊ राजाराम कवर । एक होता डाँक्टर ।
पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥
त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला ।
औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥
बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती ।
शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥
नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं ।
शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥
कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला ।
वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥
भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी ।
शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥
आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय ।
याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥
पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ ।
या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥
ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं ।
रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥
तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र ।
कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥
तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली ।
गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्या बैलांची ॥८२॥
कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा ।
मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥
दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी ।
डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥
तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला ।
दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥
डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं ।
प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥
ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान ।
तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥
डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला ।
हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥
प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत ।
मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥
तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण ।
त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥
परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला ।
भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥
फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा ।
येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥
एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार ।
पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्याचा ? ॥९३॥
भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली ।
हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥
दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास ।
माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥९५॥
हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून ।
हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥
त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन ।
लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥
कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण ।
अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥
असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं ।
त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥
होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार ।
स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥
जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी ।
सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥
त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार ।
येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥
झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे ।
आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥
हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा ।
प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥
म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे ।
रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥
या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन ।
अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥
हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी ।
बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥
आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा ।
समुदाय वारकर्यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥
मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी ।
पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥
तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार ।
भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥
प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी ।
‘ जय जय रामकृष्ण हरी ‘ । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥
शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला ।
ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥
नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार ।
श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥
या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा ।
भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥
त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत ।
सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥
श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला ।
उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥
हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं ।
दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥
पोलिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं ।
पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥
एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर ।
बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥
बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला ।
म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥
स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी ।
दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥
मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत ।
राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥
मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना ।
केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥
बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी ।
कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥
तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून ।
तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥
‘ अरण ‘ होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास ।
मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥
तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ ।
मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥
ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला ।
परत बिर्हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥
मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण ।
बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥
शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी ।
फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥
बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण ।
हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥
शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा ।
येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥
याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? ।
ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥
कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला ।
तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥
त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत ।
वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥
आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन ।
बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥
मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? ।
कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥
अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती ।
शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥
सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान ।
न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥
ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा ।
अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥
तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत ।
ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥
गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे ।
सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥
समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना ।
ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥
तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें ।
पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥
तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी ।
बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥
पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी ।
तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥
धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला ।
तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥
इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस ।
होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥
ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।
बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥
तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।
ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥
म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।
निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥
पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला ।
कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥
संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात ।
गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥
काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी ।
बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥
याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण ।
रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥
पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें ।
म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥
कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा ।
तो वर्हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥
तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी ।
त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥
प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत ।
यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥
वारकर्याला ओढिती । गाडीमाजीं बसविती ।
चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥
हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी ।
ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥
गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी ।
कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥
पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत ।
शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥
वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला ।
कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥
लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती ।
तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥
तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर ।
म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥
लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया ।
याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥
पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार ।
मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥
अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं ।
चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥
तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? ।
आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥
ऐसें वाटून जवल गेले । वारकर्याला करा धरलें ।
त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥
चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्हाडप्रांता ।
वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्हाड कशाचें हो ? ॥७२॥
समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त ।
तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥
तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर ।
त्या वारकर्याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥
वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती ।
संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥
घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी ।
चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥
आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी ।
म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥
ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार ।
आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥
पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी ।
मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥
एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन ।
त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥
तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती ।
म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥
सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती ।
खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥
व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत ।
हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥
सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें ।
अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥
तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत ।
पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥
त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न ।
आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥
याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती ।
या वेड्यातें वंदिताती । ” महाराज, महाराज, ” म्हणून ॥८७॥
जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून ।
झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥
त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां ।
येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥
आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित ।
कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥
तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला ।
अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥
कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर ।
पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥
ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला ।
आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥
परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर ।
घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥
ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी ।
स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥
तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर ।
म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥
मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली ।
ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥
माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा ।
वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥
तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर ।
करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥
श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली ।
कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥
प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत ।
समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय १९
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।
माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥
हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।
माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
खर्या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।
याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥
मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।
हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥
महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।
जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥
तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।
मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥
माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्ताचीं लक्षणें ।
लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥
माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।
आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥
तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।
काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥
जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।
या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥
म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।
तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥
त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।
निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥
तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।
तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥
तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्रुर ।
मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥
तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।
त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥
असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।
गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥
ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।
त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥
स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।
परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥
गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।
रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥
असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।
वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥
त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्गुरुनाथ ।
जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥
बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।
महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥
अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।
तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥
शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥
कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।
तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥
तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।
बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥
टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।
येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥
जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।
जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥
तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।
आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥
इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।
जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥
महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।
या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥
तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।
अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥
बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।
श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥
रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।
परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥
जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।
बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥
शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।
परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥
इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।
घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥
बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।
त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥
अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।
तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥
तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।
तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥
तुझ्या धनाच्या जोरावरी । उड्या या जाण निर्धारी ।
तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥
हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।
परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥
गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।
पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥
ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।
होत्या पातळ पदार्थांस । वाट्या जवळ चांदीच्या ॥४४॥
नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।
मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥
ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।
ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥
असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।
तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥
वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।
तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥
चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।
तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥
समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।
अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥
विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।
दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥
तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।
तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥
येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।
पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥
आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।
आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥
भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।
शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥
भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।
दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥५६॥
कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।
परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥
तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।
माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥
तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।
ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥
आणखी एक पुत्र तुला । परम सद्गुणी होईल भला ।
अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥
ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।
त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥
हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।
ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥
त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।
शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥
उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।
त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥
तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।
शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥
धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।
होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥
अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।
त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥
श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।
कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥
ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।
बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥
अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।
मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥
तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।
चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥
चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।
जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥
तो कर्हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।
हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥
ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।
तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥
एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।
हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥
एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।
एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥
एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।
एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥
स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।
आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥
स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।
तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥
फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।
स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥
बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।
संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥
त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।
ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥
ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।
बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥
ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।
हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥
स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।
तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥
सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।
या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥
हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।
तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥
अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।
म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥
येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।
परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥
आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।
भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥
मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।
त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥
दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।
श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥
मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।
ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥
या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।
भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥
परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।
जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥
आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।
या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥
परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।
योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥
जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।
त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥
आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।
धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥
कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।
आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥
या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।
परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥
जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।
म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥
काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।
हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥
आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।
शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥
तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।
बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥
मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।
जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥
पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।
अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥
या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।
मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥
वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।
हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥
व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।
उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥
श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।
हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥
जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।
तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥
तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।
कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥
नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।
ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥
नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।
दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥
शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।
सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥
तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।
मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥
पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।
जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥
खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।
गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥
पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।
आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥
मुर्हा गांवचें संतरत्न । झिंगाजी तो होय जाण ।
तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥
या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।
परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥
मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।
जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥
आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।
कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥
जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।
आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥
आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।
निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥
ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।
त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥
ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।
उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥
कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।
तरीच भेटे जगन्नाथ । जगद्गुरु जगदात्मा ॥२९॥
ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।
प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥
अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।
वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥
मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।
वर्हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥
साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।
ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥
तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।
डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥
जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।
येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥
ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।
जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥
प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।
तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥
खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।
त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥
पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।
होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥
या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।
तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥
प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।
गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥
श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।
शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥
चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।
बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥
आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।
विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥
स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।
हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥
तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।
आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥
त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।
आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥
ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।
न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्याची ॥४८॥
शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।
मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥
प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।
चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥
समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।
पूजा अर्चा करण्याप्रत । सद्गुरुच्या समाधीची ॥५१॥
मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।
शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥
इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।
येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥
भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।
तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥
स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।
निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥
ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।
ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥
मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।
तेथील मारुतीपंत पटवार्याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥
श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।
पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥
तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।
गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥
उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।
खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥६०॥
राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।
ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥
हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।
म्हणून सद्गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥
क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।
अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥
ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।
महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥
तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।
म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥
पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।
विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥
तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।
रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥
आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।
पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥
ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।
नफातोट्याची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥
तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।
म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांड्याकारणें ॥१७०॥
कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।
उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥
ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।
तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥
महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।
दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥
ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।
खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥
मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।
वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥
दर्शन घेऊन सद्गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।
उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥
ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।
दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥
महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।
बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥
मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।
तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥
तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।
झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥
मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।
गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥
म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।
रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥
ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।
मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥
आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।
लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥
आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।
सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥
खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।
तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥
ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।
लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥
मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।
खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥
ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।
आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥
ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।
आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥
छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।
नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥
तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।
दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥
रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।
आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥
तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।
उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥
ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।
पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥
गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।
तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥
शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।
असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥
तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।
त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥
मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।
त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥
तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।
त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥
नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।
समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥
तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।
साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥
ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।
लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥
हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।
ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥
वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।
परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥
ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।
आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥
तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।
उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥
कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।
वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥
या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।
आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥
तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।
अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥
हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।
कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥
हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।
तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥
ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।
तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥
तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।
त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥
एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त ।
होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥
म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।
वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥
नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।
गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥
अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।
तेथील हरी जाखड्याचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥
हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।
गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥
तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।
बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥
तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।
कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥
तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।
येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥
कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।
निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥
आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।
ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥
संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।
मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥
हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।
संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥
ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।
प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥
ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।
थुंकते झाले सद्गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥
या हरी जाखड्यानें । बावंच्या मागला मजकारणें ।
म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥
संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।
यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥
पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।
सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥
ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखड्यासी पाहिलें ।
जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥
तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।
होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥
जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।
करीत असावा परमेश्वर । आठव वेड्या ! विसरुं नको ॥३४॥
ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।
दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥
हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।
महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥
ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।
रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥
बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।
तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥
हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।
इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥
वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।
हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥
फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।
वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥
असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्यासी ।
एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥
तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।
लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥
असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।
योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥
तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।
गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥
नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।
तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥
काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।
कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥
तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।
ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥
उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।
त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥
बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।
अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥
पोटीं ना अन्न तिळभर । बिर्हाड राहिलें बहु दूर ।
कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥
तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।
ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥
तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।
हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥
षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।
त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥
मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।
योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥
गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।
सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥
नेटाचा केला यत्न । ब्रह्मचर्य संभाळून ।
येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥
जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।
ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥
तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।
तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥
त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।
शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥
महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।
आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥
महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।
तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥
नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।
तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥
म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।
मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥
धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।
पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥
ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।
भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥
कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।
तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥
मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।
कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥
तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।
तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥
हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।
सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥
जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।
करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥
योगाभ्यास ही समोरी । त्या खेड्याच्या आदरें करी ।
त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥
तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।
आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥
एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।
त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥
म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।
जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥
तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।
मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥
दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।
आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥
तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।
औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥
नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।
धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥
ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।
नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥
तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।
अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥
ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।
हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥
व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।
आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥
तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।
बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥
हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।
शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥
असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।
घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥
जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।
जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥
जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।
जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥
पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।
गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥
हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।
हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥
तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।
जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥
आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।
पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥
देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।
अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥
ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।
अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥
हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।
अश्रु कां हो सद्गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥
किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।
म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥
महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।
सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥
तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।
इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥
चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।
तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥
पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।
चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥
तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।
संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥
पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।
पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥
गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।
आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥
कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।
चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥
त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।
दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥
तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।
या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥
दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।
तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥
हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।
ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥
जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।
शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥
चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।
बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥
मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।
कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥
ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।
दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥
शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।
भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥
प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।
सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥
देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।
स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥
पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।
ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥
गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।
गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥
गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।
विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्यानें ॥१८॥
अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।
कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥
मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।
ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥
श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।
विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥
आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।
हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥
आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।
अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥
ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।
नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥
गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।
ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥
त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।
तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥
त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।
पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥
लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।
जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥
तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।
एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥
निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।
आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥
तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।
भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥
दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।
आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥
तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।
लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥
रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।
सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥
रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।
दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥
मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।
रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥
वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।
होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥
तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।
फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥
बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।
कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥
ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।
उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥
समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।
रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥
पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।
भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥
जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।
अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥
ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।
उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥
अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।
’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥
मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।
शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥
दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।
घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥
खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।
सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥
स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।
भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय २०
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥
तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।
मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥
माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।
राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥
यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।
खर्या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥
म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।
पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥
असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।
म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥
शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।
आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥
समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।
कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥
आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।
देव नसतां देव्हार्यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥
ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।
महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥
जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।
ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥
तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।
ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥
ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।
गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥
हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।
नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥
अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।
बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥
एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।
उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥
केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।
शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥
तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।
हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥
उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।
कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥
हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।
दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥
फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।
गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥
हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।
तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥
तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।
उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥
त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।
प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥
यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।
येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥
अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।
त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥
पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।
म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥
ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।
तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥
आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।
सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥
मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।
तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥
असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।
त्या दसर्याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥
या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।
जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥
लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।
बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥
कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।
हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥
घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।
कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥
असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।
तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥
आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।
ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥
तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।
ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥
तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।
चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥
गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।
यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥
पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।
तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥
पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।
अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥
उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।
हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥
खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।
म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥
लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।
तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥
मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।
प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥
अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।
भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥
एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।
आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥
हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।
त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥
दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।
अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥
आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।
ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥
जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।
रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥
तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।
आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥
मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।
पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥
जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।
जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥
शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।
जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥
दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।
जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥
झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।
मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥
मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।
शेतकर्यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥
शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।
तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥
तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।
बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥
हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।
अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥
कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।
त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥
तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।
करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥
दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।
मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥
तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।
तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥
जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।
वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥
कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।
तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥
ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।
उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥
ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।
पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥
पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।
जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥
वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।
दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥
बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।
कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥
साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।
हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥
कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।
ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥
एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।
हा करीतसे व्यापार । वर्हाडांत कापसाचा ॥७६॥
यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।
त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥
परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।
फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥
फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।
स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥
हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।
उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥
तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।
भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥
पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।
डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥
कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।
त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥
जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।
नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥
परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।
येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥
घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।
भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥
यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।
नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥
त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।
सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥
दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।
फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥
तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।
तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥
हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।
आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥
कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्याकारण ।
श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥
पैसे घेतले भिकार्यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।
श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥
ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।
तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥
त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।
रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥
ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।
कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥
भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।
होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥
पुन्हां रुपये काढिले । भिकार्यासी अर्पिले ।
तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥
यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।
तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥
संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।
कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥
तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।
माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥
तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।
ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥
फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।
तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥
रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।
यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥
परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।
ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥
सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।
फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥
तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।
विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥
विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।
तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥
आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।
तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥
समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।
निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥
भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।
त्याची तेल्हार्याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥
म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।
सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥
गाडी केली तेल्हार्याची । तयारी केली निघण्याची ।
वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥
बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।
अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥
तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।
आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥
ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।
कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥
आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।
नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥
बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्यासी डाँक्टर भला ।
घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥
रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।
वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥
तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्याचा रस्ता चुकला ।
कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥
गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।
गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥
म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।
हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥
खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।
अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥
तूं तेल्हार्याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।
आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥
काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।
वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥
तेल्हार्याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।
मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥
ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।
कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥
मी हमेश भाडें करतों । तेल्हार्याहून येथें येतों ।
वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥
बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।
तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्याचा ॥२९॥
मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।
प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥
बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।
म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥
हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।
गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥
तों तळ्याच्या दुसर्या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।
डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥
गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।
या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥
तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।
नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥
हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।
तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥
हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।
मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥
सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।
वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥
मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।
व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥
आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।
करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥
समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।
मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥
संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।
भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥
दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्यासी ।
आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥
एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।
तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥
त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।
बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥
दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।
वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥
मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।
ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥
वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।
हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥
शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।
उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥
ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।
शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥
येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।
पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥
दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।
घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥
हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।
मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥
ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।
घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥
आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।
शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥
तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।
मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥
माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।
तरी अवघ्या वर्हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥
अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।
हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥
पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।
तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥
अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।
नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥
त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।
मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥
नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।
तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥
समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।
सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥
दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।
नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥
दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।
आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥
कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।
ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥
ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।
प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥
लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।
प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥
मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।
तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥
तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।
औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥
थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।
परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥
चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।
एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥
वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।
कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥
मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।
मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥
तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।
तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥
पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।
हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥
तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।
पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्याचें ॥७७॥
निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।
उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥
रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।
परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥
वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।
पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥
औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।
ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥
त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।
मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥
वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।
कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥
कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।
कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥
कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।
दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥
औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।
गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥
पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।
म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥
कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।
कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥
तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।
विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥
वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।
देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥
माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।
आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥
तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।
मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥
तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।
समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥
गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।
वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥
खर्या खर्या संतांची । सेवा न जाई वायां साची ।
परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥
समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।
बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥
हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।
त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥
बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।
नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥
हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।
रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥
ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।
म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥
कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।
यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥
पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।
संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥
श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।
अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥
मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।
मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥
त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।
लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥
ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।
निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥
तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।
लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥
त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।
येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥
शुभं भवतु ॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥
अध्याय २१
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा ।
जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥
देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास ।
सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥
पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य ।
पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥
म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी ।
धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥
म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा ।
काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥
तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन ।
या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥
सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत ।
कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥
तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई ।
अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥
पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा ।
आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥
कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी ।
दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥
तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत ।
अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥
श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण ।
तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥
एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची ।
त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥
बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर ।
एक होता मजूर । हाताखालीं गवंड्यांच्या ॥१४॥
तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला ।
तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥
तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला ।
उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥
परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत ।
जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥
सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी ।
तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥
मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला ।
तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥
पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी ।
हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥
अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा ।
हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥
या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें ।
तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥
असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची ।
बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥
तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला ।
तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥
तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्गुरुनाथ ।
ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥
या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन ।
रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥
प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला ।
अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥
काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें ।
खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥
दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा ।
प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥
उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें ।
खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥
श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला ।
जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥
त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं ।
होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥
म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया ।
गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥
तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला ।
तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥
तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? ।
लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥
दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी ।
पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥
ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण ।
ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥
तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला ।
लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥
हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर ।
त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥
आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला ।
हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥
खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं ।
त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥
बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत ।
नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥
ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्याच्या मस्तकांसी ।
सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥
तोही गोल थोर होता । परी स्वामीची अगाध सत्ता ।
कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥
पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा ।
परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥
एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी ।
ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥
भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? ।
ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥
पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक ।
गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥
निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी ।
स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥
गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत ।
दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥
गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला ।
कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥
कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं ।
अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥
तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर ।
कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥
उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं ।
कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥
आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन ।
मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥
पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा ।
तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥
परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख ।
त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥
आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं ।
पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥
तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला ।
तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥
तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं ।
ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥
समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना ।
योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥
तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी ।
तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥
बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत ।
बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥
का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी ।
पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥
पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण ।
त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥
द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये ।
राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥
साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून ।
दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥
हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास ।
होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥
आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी ।
साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥
अपमान खर्या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा ।
होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥
आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें।
सोयर्याधायर्यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥
कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं ।
जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥
मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस ।
ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥
दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला ।
पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥
पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार ।
हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥
श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला ।
घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥
रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन ।
ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥
श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र ।
अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥
या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका ।
वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन ।
केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥
माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी ।
देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥
बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर ।
त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥
कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य ।
गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥
पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला ।
बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥
कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला ।
गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥
त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली ।
तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥
जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें ।
देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥
मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर ।
विठोबासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥
कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही ।
जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥
किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य ।
सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥
त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत् केले चिंचवण्याला ।
जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥
होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले ।
तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥
चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला ।
शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥
कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत ।
बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥
गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली ।
महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥
हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला ।
महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥
समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ ।
पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥
कोरड्या ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला ।
एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरड्या विहिरी ठायीं ॥९८॥
भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती ।
शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥
षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्गुरुनाथा ।
मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥
गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत ।
पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥
बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची ।
घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥
नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला ।
जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥
कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले ।
नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥
चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं ।
कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥
मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत ।
समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥
गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली ।
हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥
हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले ।
मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥
उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार ।
अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥
भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत ।
आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥
ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही ।
निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥
कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत ।
अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥
खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें ।
निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥
तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला ।
आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥
कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी ।
मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥
ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला ।
“नैनं छिन्दन्ति” श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥
जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर ।
न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्या संताला ॥१७॥
कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला ।
खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥
दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी ।
घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥
बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन ।
संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥
दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक ।
उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥
गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं ।
भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामीच्या ॥२२॥
गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला ।
छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥
द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची ।
दांभिक भक्ति घुड्याची । कशी ती कथन केली ॥२४॥
एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान ।
आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥
झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी ।
येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥
निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला ।
द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥
आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला ।
वांचविले गणु जवर्याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥
शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची ।
मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥
स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला ।
स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥
पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी ।
वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥
पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ ।
नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥
विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी ।
महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥
झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला ।
पर्जन्यानें घोटाळा । भंडार्याचा केला असे ॥३४॥
झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली ।
पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥
कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा ।
हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥
बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें ।
कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥
नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास ।
नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥
विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला ।
या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥
अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा ।
आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥
भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला ।
मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥
श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश ।
नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥
कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी।
जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥
पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला ।
कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥
छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा ।
ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥
सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास ।
जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥
नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं ।
केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥
महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला ।
हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥
बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची ।
भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥
कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची ।
कवर डाँक्टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥
महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला ।
तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥
कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी ।
त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥
एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला ।
दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥
कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी ।
आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥
गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला ।
श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥
त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत ।
परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥
धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत ।
समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥
श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति ।
दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥
तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला ।
तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥
केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून ।
समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥
गजाननाचे कृपें भलें । जाखड्याचें लग्न झालें ।
कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥
तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला ।
नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥
पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन ।
महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥
पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं ।
आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥
विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर ।
जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥
जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी ।
दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥
आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा ।
अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥
प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर ।
म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥
वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें ।
मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥
ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर ।
धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥
या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला ।
त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥
मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन ।
कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥
सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी ।
बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥
भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई ।
सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥
पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी ।
पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥
बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल ।
त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥
किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर ।
हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥
या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी ।
केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥
कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें ।
बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥
लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या ।
परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥
त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली ।
योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥
बसविला शेतसार्यावर । समर्थांचा धार्मिक कर ।
कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥
तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी ।
जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥
गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना ।
कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥
समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार ।
परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥
शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण ।
केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥
अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें ।
अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥
कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत ।
काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥
वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा ।
भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥
पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी ।
व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥
लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न ।
शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥
बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं ।
माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥
तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें ।
पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥
माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न ।
भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥
तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें ।
एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥
बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार ।
कसुर्याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥
चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन ।
यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥
ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी ।
खरे खरेच साक्षात्कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥
यावत् कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत ।
तावत् कालपर्यंत । वर्हाड होता सुखी बहु ॥९९॥
जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली ।
अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्हाडाच्या ॥२००॥
विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले ।
नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्हाडांत ॥१॥
वर्हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना ।
म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥
तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन ।
तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥
म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें ।
म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥
सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्हाड व्हावा निर्धारी ।
ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्हाडी जनांच्या ॥५॥
तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं ।
पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥
ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल ।
वर्हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥
गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।
कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥
या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य ।
तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥
दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं ।
याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥
कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा ।
त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥
धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून ।
दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥
भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना ।
तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥
सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका ।
शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥
ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस ।
या वर्हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥
एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन ।
एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥
हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा ।
नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥
वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर ।
पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥
सद्भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा ।
प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥
मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर ।
अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥
तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा ।
साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥
हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी ।
येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥
श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य ।
त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥
हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती ।
महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥
वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत ।
पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥
जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव ।
संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥
हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी ।
दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥
जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा ।
तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥
दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण ।
साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥
निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र ।
चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥
दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला ।
अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥
गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी ।
बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥
त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा ।
कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥
जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत ।
लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥
ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत ।
कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥
मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा ।
तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥
पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर ।
नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥
उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत ।
वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥
तेवींच हा वर्हाडांत । गजाननस्वामी सद्गुरुनाथ ।
फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥
आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती ।
अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥
म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार ।
होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥
आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।
दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥
मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट ।
दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥
आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो ।
अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥
प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा ।
समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥
मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज ।
हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥
जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा ।
हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥
शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र ।
ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥
त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला ।
म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥
झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन ।
करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥
शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत ।
चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥
हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला ।
तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥
॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥
॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥
॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥
॥समाप्त॥