गजानन विजय ग्रंथ सर्व अध्याय | Gajanan vijay granth sarv adhyay

गजानन विजय ग्रंथ सर्व अध्याय

अध्याय १

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।

जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥

कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।

मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥

तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।

कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥

म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां ।

सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥

मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति ।

परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥

आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती ।

जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥

त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन ।

मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥

तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी ।

मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥

त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला ।

साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥

आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा ।

सच्चिदानंदा रमेशा । “पाहि माम्” दिनबंधो ॥१०॥

तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर ।

कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥

जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण ।

सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥

ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा ।

तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥

रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली ।

गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥

तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन ।

चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥

ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा ।

म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥

हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया ।

माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥

हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा ।

ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥

तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर ।

लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥

तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास ।

साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥

तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं ।

लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥

माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता ।

तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥

हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी ।

ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥

आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया ।

गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥

आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर ।

ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥

आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा ।

दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥

गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर ।

हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥

हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता ।

दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥

तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें ।

दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥

जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते ।

तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥

लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर ।

ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥

दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत ।

ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥

आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण ।

करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥

संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर ।

वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥

संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची ।

संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥

त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश ।

आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥

ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे ।

हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥

संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत ।

आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥

भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी ।

ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥

जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन ।

कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥

याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण ।

अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥

नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर ।

महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥

शंकराचार्य जगद्गुरु । जे पदनतांचे कल्पतरु ।

जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥

मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज ।

ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥

नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास ।

गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥

राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं ।

जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥

गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर ।

ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥

ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती ।

ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥

चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष ।

ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥

मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन ।

ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥

म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत ।

नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥

त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले ।

ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥

त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा ।

या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥

मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं ।

तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥

आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग ।

मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥

जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला ।

तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥

माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती ।

तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥

शेगांव नामें वर्हाडांत । ग्राम आहे प्रख्यात ।

खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥

ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर ।

ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥

त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें ।

जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥

हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा ।

प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥

तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा ।

येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥

गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर ।

चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥

शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी ।

म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्न ॥६४॥

जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण ।

संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥

रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी ।

पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥

माझ्या मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा ।

परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥

त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं ।

केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥

खऱ्या संताचें धोरण । न कळे कोणालागोन ।

महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥

या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा ।

वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥

जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून ।

ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥

जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण ।

तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥

तेथ त्या हिर्याची । खाण आहे कोणाचि ।

हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥

ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं ।

शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥

कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान ।

त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥

परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा ।

परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥

लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले ।

त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥

जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार ।

धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥

कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी ।

ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥

गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत ।

चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥

तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी ।

गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥

हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून ।

योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥

शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं ।

हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥

त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां ।

एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥

हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण ।

शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥

त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची ।

त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥

उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार ।

घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥

तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं ।

एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥

कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें ।

पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥

कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत ।

कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥

नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत ।

प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥

मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर ।

आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥

ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।

शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥

शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत ।

हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥

कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती ।

“अन्नम् ब्रह्मेति” ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥

त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन ।

त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥

बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला ।

त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥

दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी ।

दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥

आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य ।

कीं याची करणी विपरीत । वेड्यापरी दिसतसे ॥९९॥

हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता ।

देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥

द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख ।

कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥

बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्त्यासी ।

आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥

खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी ।

ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥

कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा ।

वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥

ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार ।

रत्न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥

पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले ।

या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥

हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं ।

पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिऱ्यातें ॥७॥

प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला ।

गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥

ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना ।

क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥

त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें ।

नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥

तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार ।

भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥

निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला ।

मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥

देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी ।

तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥

देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें ।

पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥

ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी ।

चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥

अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला ।

तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥

जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार ।

अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥

अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली ।

जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥

बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण ।

ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥

सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला ।

व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥

तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं ।

वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥

धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव ।

“निरिच्छा” हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥

सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला ।

पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥

ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत ।

हा ब्रह्मची होय साक्षात् । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥

हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी ।

तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥

पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर ।

मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥

ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें ।

उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥

तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी ।

एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥

तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित ।

परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥

अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी ।

हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥

म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची ।

तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥

हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां ।

बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥

पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार ।

तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥

कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं ।

जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥

तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले ।

तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥

हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं ।

तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥

मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार ।

वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥

ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां ।

व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥

हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार ।

तेथें गढुळ, निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥

पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे ।

सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥

पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा ।

ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥

तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन ।

यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥

ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी ।

अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥

तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत ।

वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥

यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं ।

अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥

हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत ।

हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥

श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥

॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय २

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा ।

पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥

तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण ।

कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढ्याते ॥२॥

सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा ।

रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥

तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी ।

पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥

मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून ।

तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥५॥

गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं ।

न हाले दृष्टीपासोनी । गजाननाचें रुप तें ॥६॥

जिकडे पहावें तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास ।

याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥७॥

चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धि करी साची ।

तैसी बंकटलालाची । स्थिति झाली विबुध हो ! ॥८॥

हें हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठें तया ।

वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥९॥

ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें ।

शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥१०॥

घरीं येतां वडील पुसती । भवानी राम सन्मती ।

बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥११॥

चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा ।

ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ? ॥१२॥

तूं पोर्‍या तरणा ज्वान । नाहीं कशाची तुला वाण ।

ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥१३॥

किंवा शरीरीं कांहीं व्याधी । होतसे ती सांग आधीं ।

चोरुन पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला ॥१४॥

कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान ।

पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥१५॥

बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी ।

घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥१६॥

ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत ।

बंकटलालानें इत्यंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥१७॥

ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला ।

तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥१८॥

योग्यावांचुनी ऐशा क्रिया । मिळती न कोठें पाहावया ।

पूर्वसुकृता वांचोनिया । होणें न दर्शन अशाचें ॥१९॥

तूं घेतलें दर्शन । जन्म तुझा धन्य धन्य ।

भेटतां ते तुजलागून । ने मलाही दर्शना ॥२०॥

ऐशा स्थितींत दिवस चार । गेले निघून साचार ।

बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥२१॥

गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार ।

ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥२२॥

लौकिक यांचा वर्‍हाडांत । होता मोठया प्रमाणांत ।

ते आले फिरत फिरत । कीर्तन कराया शेगांवीं ॥२३॥

शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी ।

धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥२४॥

बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला ।

मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥२५॥

हा शिंपी पितांबर । भोळां भाविक होता फार ।

त्यासी समर्थाचा समाचार । बंकटलालें कथन केला ॥२६॥

दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले ।

मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥२७॥

मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून ।

जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥

वा चातकातें स्वातिघन । वा मोरासी मेघदर्शन ।

किंवा तो रोहिणीरमण । चकोर पाहातां आनंदें ॥२९॥

तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले ।

विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥३०॥

महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी ।

आण झुणकाभाकरी । माळणीच्या सदनांतून ॥३१॥

बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी ।

आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥

चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ ।

जा जावोनी ओढ्याप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥

पितांबर बोले गुरुराया । ओढ्यास पाणी अल्प सदया ।

पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥३४॥

इतुकें असून तें पाणी । खराब केलें गुरुंनीं ।

तेवीं जाणार्‍या येणार्‍यांनीं । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥३५॥

मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन ।

तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥३६॥

नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी ।

उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥३७॥

तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर ।

तुंबा भरेल ऐसें नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥३८॥

तळवे पदाचे भिजतील । इतुकेंच तेथें होतें जल ।

करुन हातांची ओंजळ । तुंब्यांत पाणी भरणें नसे ॥३९॥

ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर ।

हिय्या करुन अखेर । तुंवें स्पर्श केला जला ॥४०॥

तों ऐसें झालें अघटीत । तुंबा ठेवावा जेथ जेथ ।

तो बुडे तेथ तेथ । खळगा पाहून ओढ्याला ॥४१॥

नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान ।

आल तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥४२॥

तो म्हणे ही ऐशी स्थिति । कीं आज झाली निश्चिती ।

ती योगेश्वराची साच शक्ति । संशय येथें धरणें नको ॥४३॥

तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला ।

त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥४४॥

बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी ।

अरे माळिणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥४५॥

काढ सुपारी खिशांतून । फोडोन देई मजकारण ।

तें ऐकतां समाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥

सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी ।

ठेवितां झाला व्याघ्रांबरी । दुदंडी तांब्याचे ॥४७॥

खडकु दुदंडी व्याघ्रांबरी । हीं मुसलमानी नाणीं सारीं ।

चालत होतीं व्यवहारीं । तया वर्‍हाड प्रांतांत ॥४८॥

पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन ।

काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥४९॥

हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी ।

भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥५०॥

तें तुझ्याजवळ होतें । म्हणून भेटलों पुन्हां तूंतें ।

याचा विचार चित्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥

जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण ।

मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतों ॥५२॥

दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले ।

गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभींचें निरुपण ॥५३॥

निरुपणासी भागवतीचा । घेतला होता एक साचा ।

श्लोक एकादश स्कंधाचा । हंसगीतामधील ॥५४॥

बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ।

तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥५५॥

हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा ।

जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तनश्रवणास ॥५६॥

बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर ।

समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥५७॥

केली विनंती अवघ्यांनीं । श्रोते अती विनयांनीं ।

परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥५८॥

गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर ।

कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥५९॥

तुम्ही साक्षात्‌ शंकर । बरें न बसणें बाहेर ।

धन्यावांचून मंदिर । शून्य साच समर्था ॥६०॥

पूर्वजन्मींचें पुण्य भलें । माझें आज उदेलें ।

म्हणून हे दृष्टी पडले । साक्षात् चरण शिवाचे ॥६१॥

कीर्तनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती ।

वेळ न करा गुरुमूर्ती । चला मंदिरीं माझ्यासवें ॥६२॥

ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां ।

ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥६३॥

तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें ।

आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥६४॥

जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें ।

शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥६५॥

भागवताचा श्लोक सांगसी । आणि त्याच्या विरुद्ध वागसी ।

कथेकर्‍याची रीत ऐसी । बरवी नव्हे गोविंदा ॥६६॥

पोटभर्‍या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी ।

जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥६७॥

बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्यां बोलले ।

तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्‍न हें त्या सांभाळा ॥६८॥

हें न शेगांव राहिलें । पंढरपूर खचीत झालें ।

चालते बोलते येथ आले । साक्षात्‌ हे पांडुरंग ॥६९॥

यांची तरतूद ठेवावी । सेवा यांची करावी ।

यांची आज्ञा मानावी । वेदवाक्यापरी हो ॥७०॥

तरीच तुमचें कल्याण । होईल निःसंशय करुन ।

अनायासें हें निधान । जोडलें त्या दवडूं नका ॥७१॥

कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले ।

बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष मावेना ॥७२॥

आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेंसी ।

बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥

पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें ।

आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥७४॥

पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती ।

म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥७५॥

पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्‌गुरुनाथ ।

भेटले बंकटलाला प्रत । अस्तमानाचे समयाला ॥७६॥

दिनपति अस्ता गेला । इकडे बोधसूर्य उदेला ।

माणिक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥

गुराखी घेऊन धेनूस । येऊं लागले ग्रामास ।

समर्थांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥

त्या वाटले नंदसुत । आला येथें साक्षात ।

वृक्षावरी करितात । पक्षी किलकिलाट आनंदें ॥७९॥

दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी ।

अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥८०॥

पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अती आनंद झाला मनीं ।

नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरी बैसविलें ॥८१॥

आणि विनविलें जोडोन हात । कांहीं भोजन करा येथ ।

तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥८२॥

शिव आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली ।

ऐसी आहे ऐकिली । स्कंदपुराणीं गोष्ट म्यां ॥८३॥

ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें ।

समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥८४॥

करा येथें भोजन । ऐसें गेलों बोलून ।

परी स्वयंपाकाकारण । अवधी आहे कांहींसा ॥८५॥

स्वयंपाक होईपर्यंत । हे न थांबले जरी येथ ।

तरी प्रदोषकालीं पार्वतीकांत । गेला उपासी घरांतूनी ॥८६॥

त्यास करुं कैसी तोड । ऐसें संकट पडलें जड ।

जनसमुदाय प्रचंड । जमला मौज पाहावया ॥८७॥

विचार केला अखेरीं । दुपारच्या पुर्‍या आहेत घरीं ।

त्याच ठेवोन तबकांतरीं । पुढें ठेवूं समर्थांच्या ॥८८॥

ते अवघेच जाणती । कपट नाहीं माझ्या चित्तीं ।

भावें भेटतो उमापती । ऐसा आहे सिद्धान्त ॥८९॥

मी शिळें अवर्जुन । यास घालीत नाहीं अन्न ।

शिवाय पक्क्या रसोईकारण । शिळें म्हणणें उचित नसे ॥९०॥

चिंतिल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी ।

आणून ठेविलें समोरी । तबक एक समर्थांच्या ॥९१॥

पुर्‍या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा ।

भालाप्रती लाविला बुका । कंठीं घातिला पुष्पहार ॥९२॥

गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते ।

जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥

उदरीं सुमारें तीन शेर । अन्न सांठविलें साचार ।

तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥

बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगल स्नान समर्थांसी ।

घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवे ॥९५॥

घागरीं सुमारें शंभर । उष्णोदकाच्या साचार ।

पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥

कुणी शिकेकाई लाविती । कुणी साबण घेऊन हातीं ।

समर्थांतें घासीती । पदकमळ आवडीनें ॥९७॥

कोणी दवना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा ।

कोणी बेलियाच्या मर्दना । करुं लागले निजहस्तें ॥९८॥

अंगराग नानापरी । त्यांचें वर्णन कोण करी ।

बंकटलालाचिया घरीं । उणें नव्हतें कशाचे तें ॥९९॥

स्नानविधि संपला । पितांबर तो नेसविला ।

अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥१००॥

भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी ।

कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥१॥

नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे ।

भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥२॥

तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार ।

तया दिनीं सोमवार । वार शिवाचा होता हो ॥३॥

अवघ्या मंडळींनीं आपुले । मनोरथ ते पूर्ण केले ।

एक मात्र त्यांतून उरले । इच्छाराम शेटजी ॥४॥

हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा ।

भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥५॥

आज आहे सोमवार । मसी उपास साचार ।

घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६॥

त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनी ।

करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥

तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण ।

इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥८॥

पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन ।

त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनी ॥९॥

आणि विनंती केली वरी । झालें आहे दुपारीं ।

आपुलें तें भोजन जरी । परी आतां कांहीं खावें ॥११०॥

आपण जेवल्यावांचून । मी नाहीं घेणार अन्न ।

आहे मजला उपोषण । सोमवारचें गुरुराया ! ॥११॥

अवघ्या भक्तांचा हेत पुरला । माझा मात्र राहिला ।

तो पाहिजे पुरविला । तुम्ही कृपा करुन ॥१२॥

जन कुतूहल दृष्टींनीं । पाहूं लागले तया स्थानीं ।

इच्छाराम तो घेवोनी । नैवेद्य आला परातींत ॥१३॥

आंबेमोहर तांदळाचा । दोन मुदी भात साचा ।

नानाविध पक्वान्नांचा । थाट केला तयानें ॥१४॥

जिलबी राघवदास मोतीचूर । करंज्या अनारसे घीवर ।

शाखांचे नाना प्रकार । वर्णन करावे कोठवरी ? ॥१५॥

अगणित चटण्या कोशिंबिरी । वाडगा दह्याचा शेजारीं ।

तुपाची ती वाटी खरी । आदनाच्या सव्य भागा ॥१६॥

चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण ।

समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥१७॥

पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी ।

खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्पा ॥१८॥

खा हें आतां अवघें अन्न । अघोर्‍या न करी अनमान ।

पाहों आले अवघे जन । तुझ्या अघोर वृत्तीला ॥१९॥

महाराज भोजना बैसले । अन्न अवघें पार केलें ।

पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेंही पाहा ॥१२०॥

आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर ।

हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥२१॥

खणाणून उलटी झालि । खाल्ल्या अन्नाची ती भली ।

ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥२२॥

खिरीची झाली वासना । रामदासाचीया मना ।

तिची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले कीं ॥२३॥

उलटीं होतां परत । ती भक्षूं लागले सद्‌गुरुनाथ ।

श्रीरामदासस्वामी समर्थ । वासनेसी जिंकावया ॥२४॥

तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा ।

हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥२५॥

सत्‌पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन ।

होतें कराया संरक्षण । निसर्गाच्या धर्माचें ॥२६॥

तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें ।

आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥२७॥

असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी ।

नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥२८॥

नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती ।

तों भजन करण्याप्रती । दिंड्या आल्या दोन तेथें ॥२९॥

आवाज ज्यांचे सुस्वर । खडे पहाडी मनोहर ।

विठ्ठलाचा नामगजर । करुं लागले आवडीनें ॥१३०॥

इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं ।

भजनाचिया मिषांनीं । “गणगण गणांत बोते” ॥३१॥

हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून ।

ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥३२॥

’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून ।

लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥३३॥

जो स्वयमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? ।

नामरुपाचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥

अस्ति-भाति-प्रिया ठायीं । योगेश्वर निमग्न राही ।

त्या आनंदा न वर्णवे कांहीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥

आषाढीसी पंढरपूर । वा सिंहस्थीं गोदातीर ।

वा कुंभमेळ्यासी साचार । गर्दी होते हरिद्वारीं ॥३६॥

त्यापरि शेगांवांत । बंकटलालाच्या घरांत।

लांबलांबून असंख्यात । जन येती दर्शना ॥३७॥

स्वामी समर्थ गजानन । हेच विठ्ठल नारायण ।

निश्चय विटेस ठेवून । पाय उभे राहिले ॥३८॥

त्यांचें वचन गोदातीर । आनंद हा हरिद्वार ।

गजबजलें शेगांव नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥

जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? ।

सूर्याचिया प्रकाशाला । अवघेंच आहे सारखें ॥१४०॥

नित्य यात्रा नवी येई । समाराधना होती पाही ।

त्यांतें वाणितां शेषही । थकून जाईल निःसंशय ॥४१॥

तेथें माझा पाड कोण । मी कीटकासमान ।

अवघें वदे गजानन । निमित्त करुन माझ्या मुखा ॥४२॥

समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां ।

अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥

कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन ।

कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥४४॥

त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा ।

प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥४५॥

चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी ।

नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥४६॥

असो आतां पुढीलाध्याया । भाव ठेवा ऐकावया ।

आली पर्वणी साधावया । वेळ करुं नका हो ! ॥४७॥

हें श्रीगजाननचरित्र । आदर्श होवो भाविकांप्रत ।

हेंच विनवी जोडोन हात । दासगणू ईशातें ॥१४८॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ३

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी ।

तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥

तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर ।

तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥

ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा ।

दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥

असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी ।

दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥

लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती ।

मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥

एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें ।

महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥

ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला ।

पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥

कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन ।

वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥

उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन ।

तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥

परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं ।

वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥

ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास ।

येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥

तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी ।

कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥

भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस ।

होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥

मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला ।

ऐसा गोसावी बैसला । कोपर्‍यांत एकीकडे ॥१४॥

दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार ।

अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥

तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन ।

म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥

समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला ।

आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥

तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ ।

या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥

गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा ।

मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥

माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? ।

येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥

जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी ।

आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥

ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार ।

झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥

तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ ।

बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥

तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला ।

हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥

आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत ।

मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥

ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही ।

कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥

त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार ।

धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥

न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष ।

त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥

मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला ।

तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥

जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत ।

त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥

गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला ।

गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥

महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस ।

पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥

नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली ।

आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥

गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत ।

जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥

मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों ।

परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥

आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची ।

हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥

तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण ।

परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥

भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत ।

अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥

अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी ।

कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥

तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले ।

अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥

तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण ।

तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥

त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर ।

म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥

ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें ।

ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥

महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले ।

माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥

गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली ।

चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥

ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित ।

तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥

कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन ।

आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥

ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां ।

परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥

पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी ।

नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥

वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित ।

कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥

वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं ।

याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥

कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून ।

एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥

चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया ।

ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥

कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन ।

कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥

कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं ।

कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥

असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात ।

होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥

व्याधी शरीरीं बळावली । शक्ति पार निघून गेली ।

प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥

नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार ।

प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥

आम्हीं प्रयत्‍न केले अती । परी यश ना आलें तिळरती ।

यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥

तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत ।

जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥

तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले ।

परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥

वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित ।

आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥

बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी ।

यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥

साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत ।

सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥

त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर ।

नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमयाची ॥६५॥

तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत ।

जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥

जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा ।

आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥

महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत ।

तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥

बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं ।

तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥

जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें ।

भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥

भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण ।

दुसर्‍याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥

प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं ।

आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥

समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन ।

जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥

हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला ।

उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥

तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर ।

सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥

मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली ।

ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥

आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी ।

भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥

पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत ।

संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥७८॥

येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा ।

श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥

मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा ।

यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥

संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती ।

परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥

सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी ।

परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥

याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे ।

तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥

मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार ।

त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥

आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक ।

त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥

आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी ।

नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥

त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर ।

त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥

मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा ।

औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥

एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश ।

तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥

हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे ।

भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥

मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख।

पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥

तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा ।

होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥

म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण ।

तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥

कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं ।

परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥

श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी ।

श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥

चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे ।

वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥

साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी ।

माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥

षड्‌विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना ।

आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥

म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण ।

उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥

गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी ।

म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥

देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर ।

साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥

तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला ।

त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥

कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना ।

स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥

त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान ।

स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥

हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना ।

परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥

जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर ।

परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥

वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर ।

तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥

असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी ।

कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥

चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर ।

वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥

वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला ।

तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥

जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो ।

जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥

जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण ।

हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥

स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान ।

तेज हिर्‍याचें हिर्‍यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥

गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई ।

ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्‍याला ॥१४॥

श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद ।

संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥

तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं ।

मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥

भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें ।

प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥

मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा ।

कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥

चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी ।

निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥

ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे ।

त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥

महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर ।

हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥

तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं ।

कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥

परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली ।

तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥

हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना ।

मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥

ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले ।

विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥

काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार ।

महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥

त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना ।

हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥

तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त ।

तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥

ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं ।

त्यानें जाऊन तत्‌क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥

मंडळींचे काम झालें । परी संकट ओढवलें ।

घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥

समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी ।

तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥

म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला ।

या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥

मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं ।

घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥

त्या घुमर्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास ।

तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥

सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये ।

तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥

ऐशा रीतीं ठोकला । छड्याखाली घाटोळाला ।

विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥

खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात ।

ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥

म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन ।

संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥

मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती ।

भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥

तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई ।

परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥

खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त ।

त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥

पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? ।

सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥

संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती ।

ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥

ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन ।

जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥

मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं ।

परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥

मोगर्‍याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन ।

चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥

तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी ।

किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥

नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें ।

पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥

जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता ।

संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥

कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी ।

वा मागितली करवंटी । कामधेनूपासून ॥१५०॥

ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें ।

तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥

हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ ।

तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥

श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ४

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।

 महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥

तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।

 तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥

तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।

 जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥

अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।

 माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥

मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।

 तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥

बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।

 प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥

वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।

 पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥

अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।

 विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥

त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।

 महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥

बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।

 तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥

सकाळपासून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।

 त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥

ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।

 चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥

विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।

 कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥

पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।

 कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥

मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।

 अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं आपुल्या ॥१५॥

त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।

 दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥

आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।

 ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥

पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।

 विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥

जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।

 अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥

पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।

 नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥

महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।

 त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥

साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।

 उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥

आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।

 ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥

विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।

 चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥

तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।

 ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥

सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।

 त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥

गांजा तंबाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।

 वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥

जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।

 मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥

बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।

 नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥

तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।

 आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥

साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।

 परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥

जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।

 नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥

पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।

 हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥

ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।

 नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥

ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।

 बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥

बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।

 विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥

काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।

 म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥

महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।

 नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥

बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।

 चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥

तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।

 प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥

काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।

 हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥

काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।

 कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥

याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।

 आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥

या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।

 जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥

असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।

 तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥

त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।

 बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥

लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।

 सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥

चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।

 मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥

मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।

 गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥

गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।

 गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥

त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।

 कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥

गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।

 गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥

हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।

 माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥

मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।

 जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥

आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।

 सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥

कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।

 पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥

ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।

 बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥

अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।

 पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥

माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।

 हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥

आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।

 पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥

त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।

 तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥

तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।

 म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥

सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।

 नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥

जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।

 चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥

आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।

 मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥

क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।

 साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥

समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।

 घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥

आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।

 मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥

तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।

 ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥

माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें करुन ।

 समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥

जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।

 तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥

महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।

 तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥

तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।

 पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥

अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।

 हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥

ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।

 कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥

चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।

 निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥

श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।

 अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥

कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।

 कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥

कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।

 कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥

तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।

 दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥

चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।

 इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥

तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।

 पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥

जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।

 गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥

त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।

 जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥

चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।

 दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥

तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।

 आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥

अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।

 ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥

मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।

 ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥

तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।

 नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥

चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।

 जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥

समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।

 आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥

ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।

 करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥

कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।

 उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥

दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।

 त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥

त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।

 ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥

ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।

 कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥

आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।

 कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥

बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।

 बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥

कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।

 धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥

चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।

 लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥

लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।

 भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥

चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।

 राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥

शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।

 तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥

वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।

 तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥

प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।

 ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥

माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।

 म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥

जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।

 म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥

म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।

 आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥

आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।

 माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥

ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।

 गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥

आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।

 वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥

ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।

 तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥

हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।

 प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥

तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।

 अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥

जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।

 घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥

ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।

 ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥

अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।

 त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥

तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।

 दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥

तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।

 यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥

शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।

 भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥

तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।

 समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥

रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।

 निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥

आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।

 कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥

रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।

 आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥

तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।

 धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥

बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।

 ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥

आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।

 तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥

त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।

 तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥

माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।

 यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥

नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।

 हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥

यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।

 आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥

माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।

 परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥

कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।

 संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।

 महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥

श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।

 जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥

किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।

 ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥

माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।

 ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥

तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।

 आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥

ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।

 झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥

इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।

 कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥

म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।

 उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥

असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।

 चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥

असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।

 ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥

वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।

 वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥

पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।

 एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥

ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।

 ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥

सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।

 ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥

महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।

 ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥

मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।

 झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥

सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।

 आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥

दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।

 जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥

थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडळी आनंदली ।

 दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥

संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।

 कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥

बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।

 अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।

 साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ५

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया ।

दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥

मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार ।

सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥

परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी ।

पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥

तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा ।

हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥

सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे ।

आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥

जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं ।

देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्‍या उड्या ॥६॥

गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी ।

ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥

महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर ।

ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥

महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें ।

कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥

श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी ।

गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥

त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत ।

शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥

ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी ।

बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥

गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे ।

घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥

मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता ।

तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥

कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत ।

तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥

मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी ।

पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥

कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले ।

कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥

परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना ।

याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥

कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला ।

शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥

कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी ।

थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥

ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर ।

भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥

परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना ।

म्हणून सार्‍या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥

गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती ।

जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥

अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार ।

यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥

कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित ।

कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥

कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा ।

लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥

याचें आतां पूजन । करुं अवघे आपण ।

जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥

पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी ।

परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥

कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली ।

कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥

कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार ।

दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥

गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन ।

कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥

ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला ।

अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥

दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून ।

मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥

कदाचित्‌ आपणांसी । पाहण्या येतील काननासी ।

तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥

या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत ।

शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥

तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले ।

गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥

पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी ।

समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥

जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला ।

भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥

म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी ।

आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥

कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले ।

आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥

हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल ।

ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥

बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर ।

समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥

ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली ।

त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥

ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर ।

पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥

मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले ।

समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥

घंटाघड्याळे वाजती । लोक अवघे भजन करिती ।

जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥

मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत ।

बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥

तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला ।

आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥

ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती ।

गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥

मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां ।

प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥

नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं ।

पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥

त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार ।

हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥

पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी ।

आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥

ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी ।

आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥

अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी ।

धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥

आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा ।

निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥

शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात ।

बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥

बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत ।

समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥

आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण ।

त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥

गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन ।

शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥

गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी ।

मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥

कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित ।

त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥

तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी ।

आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥

बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले ।

शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥

जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला ।

तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥

पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती ।

नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥

वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे ।

जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥

बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा ।

मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥

चुरमुर्‍याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ ।

महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥

पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती ।

ही का साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥७०॥

मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं ।

तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥

लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता ।

जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥

तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन ।

जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥

ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें ।

विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥

बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता ।

आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥

जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? ।

आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥

तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर ।

माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥

घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? ।

जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥

इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती ।

धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥

तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें ।

परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥

ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन ।

तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥

ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां।

अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥८२॥

त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन ।

प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥

महाराजांची चालगती । वायुचिया समान होती ।

अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥

मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क ।

क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥

माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला ।

हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥

तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान ।

करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥

अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा ।

अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥

ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी ।

घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥

शेतकर्‍याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती ।

कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥

अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण ।

बिचार्‍यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥

त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत ।

एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥

आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी ।

आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥

पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर ।

ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥

ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली ।

त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥

समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला ।

पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥

पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें ।

पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥

धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती ।

याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥

भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर ।

तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥

अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी ।

वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥

ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण ।

आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥

भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? ।

वा जागा चोरट्याला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥

तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर ।

भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥

मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर ।

त्या आयत्या पिठावर । रेघोट्या तूं ओढूं नको ॥४॥

तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी ।

जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥

तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं ।

म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥

हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून ।

थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥

थोड्या दूर अंतरावर । एक होती साच विहीर ।

तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥

स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां ।

उच्च स्वरें वेड्या वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥

ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य ।

पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥

समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी ।

विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥११॥

तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण ।

तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥

तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी ।

साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥

समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं ।

हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥

डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण ।

जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥१५॥

समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा ।

प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥

देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली ।

वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥

मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें ।

पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥

तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य ।

मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥

प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा ।

बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥

कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी ।

तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥

दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार ।

चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥

उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला ।

तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥

तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें ।

नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥

ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा ।

उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥

साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत ।

ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥

तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें ।

चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥

वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस ।

तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥

यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी ।

बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥

शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून ।

धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥

हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।

लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥

तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून ।

आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥

टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी ।

दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥

त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून ।

भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥

तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर ।

तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥

कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां ।

लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥

खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया ।

आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥

भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं ।

आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥

तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण ।

आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥

पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां ।

भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥

माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार ।

होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥

ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्‍न केला ।

साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥

तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक ।

आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥

वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही ।

सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥

सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे ।

हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥

पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती ।

केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥

खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून ।

तुकारामें केलें वर्णन । “संतचरणरजा” चे अभंगीं ॥४७॥

तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा ।

आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥

पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास ।

पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥

मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा ।

वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥

तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले ।

विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥

उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार ।

करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥

असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत ।

महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ६

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी ।

अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥

त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा ।

मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥

आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष ।

आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥

म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा ।

रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥

बालकांचें हीनपण । मातेलागीं दूषण ।

हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥

असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी ।

तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥

गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।

महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥

बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी ।

विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥

विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार ।

गर्द छायेचे वृक्ष थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥

आगट्या पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा ।

तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥

त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें ।

चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा उठल्या कीं ॥११॥

त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी ।

कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥

त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा ।

घोंगड्याचा करुन बुरखा । कोणी गेले पळून ॥१३॥

प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती ।

अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥

ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले ।

विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥

माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों ।

कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥

ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत ।

अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥

वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची ।

योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥

माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी ।

त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥

यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर ।

बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥

कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला ।

कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥

अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण ।

झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥

बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी ।

हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥

जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन ।

माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥

जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त ।

जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥

ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या ।

बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥

महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी ।

वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥

अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी ।

माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥

याचा करी विचार । संकट आल्या कोणावर ।

कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥

जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती ।

ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥

बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर ।

महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥

महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया ।

आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥

गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार ।

याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥

बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले ।

अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥

मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा ।

त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥

माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा ।

पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६॥

हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन ।

कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥

सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले ।

कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥

महाराज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना ।

करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥

त काढण्या चिमट्याची । गती नाहीं मुळींच साची ।

साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥

ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें ।

तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥

तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार ।

कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥

पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं ।

अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥

असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला ।

आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥

हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा ।

कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥४५॥

त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्‍तलीलामृतांत ।

वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥

हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार ।

आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥

मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्‌गुरु ।

जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥

अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी ।

नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥

हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण ।

निंब अश्‍वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥

लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती ।

तृण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥

ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत ।

म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥

सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं ।

विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥

गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें ।

स्वामी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥

एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्‍वर ।

एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥

एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ ।

एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥

एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार ।

एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥

दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा ।

बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥

अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले ।

नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥

मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा ।

या सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥

या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत ।

ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥

त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां ।

उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥

तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन ।

कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥

फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें ।

परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥

योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा ।

तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥

योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून ।

कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥

याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची ।

आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥

गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते ।

तैसेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥

यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें ।

चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥

म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी ।

एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥

नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया ।

ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥

प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत ।

दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥

तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं ।

मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥

देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें ।

तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥

तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें ।

तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥

आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी ।

देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥

नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात ।

तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥

तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया ।

अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥

पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत ।

क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥

ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें ।

भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥

खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत ।

दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥

दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु ।

पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥

दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला ।

तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥

संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत।

संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥

दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।

गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥

ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी ।

नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥

नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन ।

ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥

तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले ।

नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥

एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती ।

गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥

त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी ।

या महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥

तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले ।

नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥

पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण ।

दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥

दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी ।

असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥

श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा ।

ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥

या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित ।

चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥

कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची ।

याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥

प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार ।

उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥

पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला ।

सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥

तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी ।

मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥

त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला ।

वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥

चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी ।

समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥

ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही ।

कुक्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥

चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें ।

भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥

भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां ।

जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥

ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति ।

बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥

सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार ।

ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥

तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां ।

तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥

सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती ।

दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥

ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं ।

संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥

अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं ।

प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥

मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः ।

ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥

शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली ।

न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥

प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर ।

मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥

माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें ।

दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥

नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला ।

तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥

(श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? ।

झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥

ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन ।

योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥

माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला ।

तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥

मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर ।

सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥

कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको ।

मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥

आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ ।

त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥

तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं ।

प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥

ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला ।

त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥

ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव ।

अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥

तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्‍हाडांत ।

सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥

महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले ।

हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥

आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? ।

चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥

ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला ।

उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥

हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार ।

पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥

पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला ।

जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥

चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर ।

अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥

या उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी ।

जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥

श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण ।

तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥

गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं ।

म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥

त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी ।

श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥

बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी ।

राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥

गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर ।

योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥

मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी ।

तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढ्यापुरता येईन तेथ ॥३७॥

हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला ।

स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥

गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर ।

प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥

छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी ।

ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥

त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर ।

परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥

याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा ।

माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥

निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार ।

तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥

मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां ।

भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।

मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ७

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा ।

 संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥

तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर ।

 ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥

तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी ।

 जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥

भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला ।

 तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥

ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला ।

 याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥

नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती ।

 ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥

मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत ।

 नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥

मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला ।

 तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥

तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची ।

 ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥

पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण ।

 जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥

या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन ।

 देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥

रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा ।

 दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥

हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव ।

 याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥

हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन ।

 घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥

पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी ।

 आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥

महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस ।

 थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥

कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका ।

 गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥

पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण ।

 कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥

कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन ।

 कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥

कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत ।

 अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥

पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार ।

 याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥

या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती ।

 गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥

आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार ।

 पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥

बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती ।

 कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥

उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा ।

 म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥

नेहमीं कटकटी मारामार्‍या । शेगांवांत होती खर्‍या ।

 पाटील एक्या मापीं सार्‍या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥

हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत ।

 वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥

असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी ।

 महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥

कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? ।

 ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥

कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती ।

 तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥

त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार ।

 याचा करी विचार । बर्‍या बोलानें येधवां ॥३१॥

त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें ।

 अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥३२॥

ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर ।

 म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥

नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं ।

 हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥

हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले ।

 सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥

गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी ।

 ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥

मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा ।

 शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥

हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं ।

 कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥

जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण ।

 काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥

तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा ।

 अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥

गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल ।

 पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥

एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं ।

 महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥

तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत ।

 उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥

तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं ।

 मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥

तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले ।

 समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥

खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून ।

 असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥

हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया ।

 परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥

घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली ।

 पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥

हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? ।

 अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥

हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी ।

 खोड्या आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥

त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान ।

 आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥

जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला ।

 श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥

कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई ।

 आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥

समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला ।

 ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥

कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी ।

 कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥

मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर ।

 वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥

पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार ।

 तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥

तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं ।

 गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥

तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें ।

 ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥

हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज ।

 येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥

हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास ।

 शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥

ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें ।

 जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥

असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून ।

 अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥

ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती ।

 हरी तूं त्या जोगड्याप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥

आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार ।

 तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥

त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड ।

 त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥

ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे ।

 पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥

मैंद साधूचे वेष घेती । वेड्यावांकड्या कृत्या करिती ।

 बाया बापड्या भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥

सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा ।

 तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥

ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला ।

 परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥

चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची ।

 मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥

हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला ।

 अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥

जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची ।

 तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥

आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर ।

 त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥

ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले ।

 लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥

मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार ।

 ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥

मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती ।

 त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥

तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले ।

 समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥

तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर ।

 ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥

भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी ।

 या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥

तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य ।

 तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥

हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं ।

 तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥

अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी ।

 उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥

मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली ।

 उगीच नाहीं चाल केली । झोंपड्या पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥

यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें ।

 गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥

म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग ।

 यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥

ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत ।

 जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥

परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले ।

 कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥

तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं ।

 म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥

महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला ।

 असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥

त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस ।

 तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥

ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला ।

 हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥

त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली ।

 आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥

श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस ।

 तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥

लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती ।

 योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥

पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते ।

 सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥

हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं ।

 करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥

समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून ।

 खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥

दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ ।

 त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥

ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी ।

 ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥

मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला ।

 परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥१॥

गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें ।

 अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥

प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई ।

 आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥

हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला ।

 तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥

नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण ।

 करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥

अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची ।

 कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥

श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे ।

 श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥

गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं ।

 पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥

याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा ।

 वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥

कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं ।

 तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥

सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी ।

 मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥

तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ ।

 नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥

आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना ।

 म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥

तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ ।

 आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥

साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं ।

 संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥

तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें ।

 मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥

अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां ।

 इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥

तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती ।

 इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥

त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर ।

 तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥

ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले ।

 आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥

सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्‍नवादी असशी निगुती ।

 मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥

धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें ।

 मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥

तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढ्या अती ।

 तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्‍हाडांत ॥२३॥

मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? ।

 आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥

खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्‍नाधीन ।

 पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥

तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी ।

 दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥

मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर ।

 तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥

खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था ।

 तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥

याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख ।

 तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥

पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी ।

 परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥

तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड ।

 तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥

हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण ।

 आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥

हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें ।

 कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥

हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस ।

 तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥

कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची ।

 गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥

तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला ।

 कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥

त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं ।

 पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥

थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें ।

 पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥

आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण ।

 तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥

पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी ।

 पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥

हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा ।

 शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥

एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची ।

 अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥

प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात ।

 सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥

शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन ।

 एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥

तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत ।

 छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥

पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी ।

 पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥

तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन ।

 तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥

ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी ।

 तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥

ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण ।

 पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥

तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत ।

 ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥

हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ ।

 परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ८

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।

हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।

परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥

तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।

त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।

कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥

अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।

तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥

जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।

तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥

ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।

दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥

हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।

स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥

तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।

घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥

मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।

निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥

ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।

घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥

तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।

अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥

असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।

मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥

जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।

अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।

नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥

असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।

करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥

पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।

कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥

तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।

तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥

पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।

गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥

उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।

तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥

तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।

त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।

कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥

तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।

कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।

देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥

कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।

तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥

ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।

मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥

ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।

भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।

पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।

महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥

पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।

तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥

तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।

मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥

वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।

ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।

समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥

कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।

कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।

आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।

पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥

खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।

तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥

ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।

तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥

अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।

बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥

खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।

श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥

त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।

करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥

लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।

खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥

येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।

महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।

तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥

त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।

देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥

त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।

समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥

उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।

बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥

त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।

ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥

अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।

अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥

त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।

अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥

जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।

होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥

तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।

प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥

तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।

नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥

ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।

आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥

घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।

नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥

इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।

खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥

अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।

वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥

स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।

खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥

तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।

एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥

मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।

परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।

सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥

जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।

किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥

तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।

जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥

पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।

कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥

पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।

नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥

असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।

ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥

तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।

परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥

तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।

तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥

त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।

जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥

मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।

म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।

हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥

ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।

वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥

मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।

उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥

जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।

तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥

चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।

वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।

मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥

सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।

दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥

विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।

चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥

हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।

हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥

परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।

कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥

कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।

हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।

देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥

ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।

महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥

श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।

दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥

गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।

या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।

लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥

हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।

हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥

त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।

एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥

समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।

कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥

हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।

हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥

तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।

येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥

तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।

ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥

समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।

राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥

महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।

सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥

खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।

समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥

असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत ।

येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥

समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।

म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥

गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।

जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥

गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।

ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥

ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।

महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।

ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥

शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।

लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥

तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।

पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥

तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।

मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥

गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।

ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥

आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।

मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥

कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।

आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥

जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।

तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥

दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।

मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥

समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।

गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥

त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।

तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥

गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।

पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥

“नैनं छिन्दन्ति” हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।

ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥

निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें ।

ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥

सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।

गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥

लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।

येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥

तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।

या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥

अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।

त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥

पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।

चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥

त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।

ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥

कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।

पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥

तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा ।

पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥

लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।

तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥

तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।

कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥

अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।

तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।

ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥

“नैनं छिन्दन्ति” श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।

आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।

आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥

ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।

ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥

भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार ।

तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥

पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।

परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥

श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।

हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥

त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।

मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥

ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।

महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥

तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।

उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥

’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।

ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥

गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत ।

शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।

केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥

तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।

मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥

शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।

आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥

तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।

अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥

म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥

गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥

लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।

तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥

अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।

तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥

ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।

स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥

मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।

आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥

ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।

अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥

नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।

तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥

गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।

ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥

स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।

प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥

स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।

होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥

उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।

सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥

ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।

प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥

ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।

जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।

तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय ९

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।

हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥

तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।

परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥

तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।

त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥

गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।

कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥

अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।

तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥

जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।

तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥

ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।

दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥

हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।

स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥

तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।

घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥

मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।

निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥

ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।

घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥

तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।

अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥

असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।

मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥

जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।

अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥

क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।

नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥

असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।

करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥

पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।

कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥

तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।

तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥

पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।

गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥

उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।

तुझ्यासारख्या नकट्याचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥

तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।

त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥

बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।

कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥

तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।

कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥

तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।

देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥

कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।

तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥

ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।

मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥

ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।

भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥

त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।

पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥

त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।

महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥

पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।

तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥

तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।

मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥

वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।

ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥

त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।

समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥

कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।

कांट्यांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥

फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।

आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥

शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।

पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकड्या ॥३६॥

खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।

तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥

ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।

तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥

अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।

बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥

खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।

श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥

त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।

करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥

लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।

खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥

येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।

महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥

सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।

तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥

त्याचा ऐसा परिणाम झाला । कांट्याचा नायटा केला ।

देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥

त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।

समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥

उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।

बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥

त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।

ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥

अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।

अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥

त्या अपराधरुपी खड्याचा । हा डोंगर झाला साचा ।

अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥

जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।

होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥

तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।

प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥

तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।

नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥

ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।

आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥

घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।

नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥

इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।

खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥

अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।

वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥

स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।

खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥

तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।

एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥

मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।

परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥

म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।

सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥

जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।

किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥

तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।

जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥

पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।

कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥

पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।

नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥

असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।

ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥

तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।

परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥

तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।

तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥

त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।

जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥

मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।

म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥

आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।

हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥

ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।

वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥

मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।

उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥

जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।

तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥

चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।

वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥

तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।

मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥

सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।

दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥

विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।

चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥

हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।

हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥

परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।

कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥

कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।

हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥

असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।

देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥

ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।

महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥

श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।

दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥

गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।

या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥

एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।

लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥

हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।

हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥

त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।

एका ओट्यावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥

समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।

कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥

हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।

हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥

तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।

येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥

तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।

ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥

समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।

राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥

महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।

सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥९४॥

खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।

समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥

असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत ।

येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥

समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।

म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥

गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।

जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥

गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।

ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥

ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।

महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।

ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥

शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।

लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥

तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।

पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥

तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।

मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥

गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।

ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥

आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।

मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥

कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।

आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥

जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।

तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥

दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।

मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥

समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।

गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥

त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।

तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥

गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।

पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥

“नैनं छिन्दन्ति” हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।

ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥

निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें ।

ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥

सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।

गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥

लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।

येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥

तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।

या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥

अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।

त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥

पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।

चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥

त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।

ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥

कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।

पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥

तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा ।

पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥

लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।

तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥

तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।

कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥

अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।

तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥

त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।

ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥

“नैनं छिन्दन्ति” श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।

आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥

जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।

आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥

ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।

ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥

भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार ।

तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥

पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।

परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥

श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।

हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥

त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।

मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥

ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।

महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥

तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।

उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥

’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।

ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥

गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत ।

शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥

माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।

केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥

तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।

मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥

शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।

आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥

तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।

अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥

म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥

गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥

लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।

तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥

अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।

तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥

ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।

स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥

मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।

आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥

ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।

अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥

नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।

तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥

गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।

ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥

स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।

प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥

स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।

होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥

उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।

सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥

ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।

प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥

ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।

जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।

तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १०

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया ।

सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥

देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं ।

माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥

माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून ।

फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥

ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी ।

ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥

तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें ।

पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥

तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत ।

रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥

असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी ।

जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥

हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत ।

मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥

कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित ।

सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥

त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले ।

मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥

उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं ।

वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥

कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा ।

भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥

कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार ।

दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥

धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली ।

दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥

प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें ।

यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥

इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली ।

सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥

तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें ।

कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥

गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे ।

वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥

दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत ।

हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥

त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं ।

तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥

गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी ।

चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥

ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला ।

कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥

आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन ।

होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥

गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला ।

हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥

पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं ।

श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥

चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां ।

सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥

तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति ।

गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥

परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना ।

बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥

महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर।

तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥

तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें ।

अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥

ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता ।

हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥

समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं ।

आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥

असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत ।

त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥

तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा ।

राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥

तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला ।

भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥

त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान ।

म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥

प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त ।

केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥

कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण ।

अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥

म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला ।

होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥

असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी ।

मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥

त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस ।

गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥

बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची ।

त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥

म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य ।

महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥

डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी ।

वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥

तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? ।

शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥

पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर ।

महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥

ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां ।

माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥

ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची ।

एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥

मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं ।

तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥

कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन ।

हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥

तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले ।

निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥

महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी ।

येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥

तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण ।

वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥

जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार ।

मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥

जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी ।

तो नाहीं रागावला ॥५५॥

तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर ।

आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥

बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत ।

यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥

माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें ।

आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥

सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार ।

तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥

सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा ।

म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥

समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं ।

परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥

समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार ।

भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥

रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी ।

हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥

वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची ।

पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥

पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं ।

परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥

भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया ।

म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥

तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर ।

रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥

लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड ।

मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥

एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण ।

परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥

बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी ।

कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥

ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर ।

त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥

तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति ।

झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥

हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण ।

त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥

एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती ।

ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥

मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली ।

मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥

तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले ।

कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥

परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला ।

कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥

भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार ।

परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥

तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी ।

मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥

जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार ।

तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥

मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला ।

कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥

बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं ।

समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥

बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त ।

पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून ।

हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥

मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें ।

निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥

महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी ।

या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥

ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला ।

लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥

तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं ।

तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥

त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला ।

मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥

सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते ।

आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥

सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला ।

श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥

तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें ।

सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥

वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित ।

धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥

वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें ।

तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥

घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां ।

सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥

ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण ।

लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥

गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना ।

कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥

लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला ।

किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥

सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी ।

वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥

एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला ।

गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें ।

तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥

मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून ।

परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥

ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति ।

गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥

तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला ।

अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥

साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें ।

आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥

तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें ।

तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥

एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला ।

हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥

ती खायालागून । गाय आली धांवून ।

ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥

साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी ।

आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥

जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें ।

स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥

समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी ।

तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥

महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा ।

गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥

चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत ।

शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥

ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत ।

ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥

अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय ।

तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥

तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत ।

परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥

जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें ।

आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥

बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली ।

पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥

खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन ।

समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥

ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला ।

समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥

समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास ।

तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥

ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार ।

उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥

बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली ।

गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥

त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण ।

सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥

अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते ।

जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥

असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा ।

विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥

त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत ।

परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥

त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती ।

म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥

रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा ।

दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥

करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर ।

त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥

आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या ।

माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥

अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण ।

माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥

त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी ।

तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥

जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया ।

तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥

यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले ।

श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥

भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं ।

आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥

प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला ।

तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥

यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम ।

लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥

बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला ।

प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥

निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले ।

शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥

बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून ।

आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥

आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं ।

आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥

त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें।

हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥

अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय ।

आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥

माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें ।

निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥

तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला ।

पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥

ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले ।

जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥

परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य ।

रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥

शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली ।

पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥

निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी ।

तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥

लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर ।

म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥

मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी ।

मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥

आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला ।

तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥

घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली ।

अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥

परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य ।

महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥

म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? ।

लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥

मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें ।

फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥

लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला ।

परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥

भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर ।

खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥

आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें ।

ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥

हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन ।

बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥

जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान ।

परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥

सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी ।

दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥

तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची ।

गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥

परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला ।

खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥

जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें ।

भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥

मी कृपा करावया । आलों होतों या ठायां ।

याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥

तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत ।

अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥

म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् ।

याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥

श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? ।

वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ ।

सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥

 

अध्याय ११

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति ।

ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥

तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर ।

जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥

तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया ।

म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥

जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत ।

नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥

शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती ।

रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥

उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें ।

परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥

तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार ।

क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥

नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत ।

त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥

तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर ।

तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥

त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन ।

माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥

देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला ।

मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥

बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी ।

त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥

सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून ।

निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥

या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर ।

बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥

उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा ।

दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥

एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें ।

तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥

उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख

कोणी म्हणती निःशंक । डाँक्‍टरा धाडा बोलवणें ॥१७॥

भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी ।

माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥

त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें ।

ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥

गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर ।

बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥

तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून ।

हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥

सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही ।

तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥

तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण ।

तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥

तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना ।

इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥

दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड ।

नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥

हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें ।

आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥

जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी ।

तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेड्या करीन ॥२७॥

परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी

या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥

बोल आतां झडकर । काय तुझा विचार ।

ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥

भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी ।

जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥

लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत ।

ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥

मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? ।

तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥

ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन ।

खर्‍याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥

कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया ।

या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥

महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान ।

अरे वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥

जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी ।

परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥

त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा ।

प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥

संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून ।

या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥

पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें ।

आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥

या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें ।

असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥

पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य ।

तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥

म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका ।

काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥

पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं ।

म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥

त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला ।

तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥

तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास ।

कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥

म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें ।

या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥

आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों ।

याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥

तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी ।

दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥

ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें ।

मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥

भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण ।

चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥

ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं ।

भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥

बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत ।

माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥

महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा ।

या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥

त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही ।

तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥

पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर ।

पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥

त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया ।

तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥

ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत ।

परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥

हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती ।

परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥

त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें

एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥

बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी ।

जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥

श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार ।

आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ

मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला ।

माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥

माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास ।

भव्य व्हावें वर्‍हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥

तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना ।

होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥

संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं

इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥

स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें ।

पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥

ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची ।

ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥

तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें ।

यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥

उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती ।

जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥

माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास ।

चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥

तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर ।

जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥

तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार ।

नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥

भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी ।

जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥

त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ ।

ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥

वेड्या कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी ।

तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥

भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? ।

तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥

आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें ।

आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥

म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती ।

त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात्‌ ॥७८॥

गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान ।

अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥

ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी ।

हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥

चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर

बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥

मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली ।

शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥

कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन ।

गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥

वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा ।

तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥

हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत ।

धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥

राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार ।

शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥

गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला ।

आज माझा बंधु आला । वर्‍हाडांतून गजानन ॥८७॥

जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन ।

माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥

हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् ।

देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥

शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले ।

कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥

नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर

ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥

हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी ।

माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥

माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें ।

म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥

महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत ।

बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥

त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा ।

म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥

तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास ।

तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥

त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर ।

रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥

आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत ।

श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥

तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला ।

पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥

उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित ।

आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥

अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी ।

एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥

छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन ।

लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥

बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्‌गुरुनाथा ।

भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥

तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर ।

माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥

लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या ।

अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥

पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्‍हाडासी ।

त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥

बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले ।

भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥

आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत ।

तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥

तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं ।

शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥

तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां ।

ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥

उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार ।

काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥

उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला ।

एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥

भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण ।

पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥

चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी ।

वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥

इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन ।

“विठ्ठल विठ्ठल नारायण” । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥

हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला ।

त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥

भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून ।

वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥

भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती ।

तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥

भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर ।

महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥

त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला ।

संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥

लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस ।

या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥

समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती ।

ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥

ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं ।

केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥

आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर ।

मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥

सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा ।

लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥

दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण ।

होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥

स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें ।

अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥

जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची ।

झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥

निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर ।

ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥

अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी ।

तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥

दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन ।

तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥

चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत ।

तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥

काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती ।

मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥

यायोगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले ।

भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥

तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून ।

नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥

या भंडार्‍यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा ।

प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥

कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार ।

हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥

दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत ।

राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥

त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं ।

काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥

त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें ।

म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥

आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा ।

तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥

या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें ।

म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥

जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती ।

कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥

म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें ।

भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥

म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्‍याचा ।

ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥

तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा ।

अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥

तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण ।

ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥

आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण ।

मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥

ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें ।

परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥

ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी ।

ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥

पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? ।

पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥

हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती ।

आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥

अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें ।

उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥

दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ ।

तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥

मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले ।

बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥

चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं ।

येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥

श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित ।

ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥

होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें ।

काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥

विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार ।

खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥

म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून ।

सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥

चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार ।

दारु ठासिली अखेर । आंत दोर्‍या घालुनी ॥६१॥

एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्‍यांतून ।

तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्‍याचीया गांठीवरी ॥६२॥

पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना ।

पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥

तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं ।

सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥

म्हणून गणू जवर्‍याला । मिस्तरी तो बोलला ।

तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोड्या सरकीव ॥६५॥

आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी ।

बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥

त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी ।

म्हणून या गणू जवर्‍यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥

काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां ।

त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥

या गणू जवर्‍याची । निष्ठा समर्थावरी साची ।

आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥

एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली ।

दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥

दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत ।

तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥

गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून ।

माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥

विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा ।

दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥

तों गणू जवर्‍या भली । कपार हातां लागली ।

त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्‍याची ॥७४॥

एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं ।

उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥

छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार ।

डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्‍याला ॥७६॥

तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना ।

दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥

त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत ।

पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥

मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला ।

अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥

गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं ।

बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥

परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला ।

त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥

गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले ।

लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥

दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं ।

गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥

वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत ।

समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥

गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी ।

गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥

त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला ।

कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥

पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी ।

मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥

जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार ।

गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥

गणू म्हणे सद्‌गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां ।

तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥

म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों ।

ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥

ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें ।

तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १२

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।

माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥

तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।

विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥

तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।

आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥

माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।

लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥

असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला ।

धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥

त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची ।

कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥

तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास ।

तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥

येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी ।

कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥

बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला ।

आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान ।

जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥

बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी ।

षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥

प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून ।

मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥

शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी ।

एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥

गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत ।

कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥

बहुमोल हिर्‍याची । वामकरीं घातिली पौची ।

रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥

जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे ।

त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥

अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार ।

त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥

एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं ।

ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥

बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार ।

ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥

श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण ।

महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥

या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी ।

मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥

त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता ।

ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥

त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन ।

श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥

असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें ।

हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥

मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा ।

मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥

अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श ।

या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥

अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण ।

केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥

जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी ।

मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥

हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला ।

तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥

माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी ।

तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥

ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले ।

चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥

दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन ।

हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥

त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे ।

ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥

त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं ।

परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥

वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून ।

ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥

जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची ।

पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥

‘ शर्कराखंडखाद्यानि ‘ । ऐसें म्हणोनिया वदनीं ।

कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥

अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें ।

वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥

हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण ।

तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥

आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला ।

संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥

बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास ।

परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥

असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा ।

होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥

त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली ।

एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥

फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर ।

तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥

अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर ।

ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥

नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं ।

नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥

तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार ।

हें फाटकें धोतर । पोतेर्‍यांच्या उपयोगी ॥४७॥

तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी ।

हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥

तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून ।

यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥

पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना ।

भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥

तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार ।

गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥

श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत ।

परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥

पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी ।

त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥

त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें ।

काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥

हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान ।

जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥

तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं ।

तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥

तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला ।

उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥

वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें ।

तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥

ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली ।

ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥

पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर ।

जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥

माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी ।

जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥

डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन ।

मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥

पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी ।

चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥

तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर ।

जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥

अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी ।

लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥

परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा ।

हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥

ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? ।

ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥

लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला ।

परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥

दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं ।

श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥

यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा ।

चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥

गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले ।

आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥

म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार ।

बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥

शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा ।

झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥

समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? ।

वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥

पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें ।

मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥

एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला ।

तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥

पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार ।

मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥

त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण ।

म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥

तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी ।

म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥

ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण ।

अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥

काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची ।

खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥

देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा ।

तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥

स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान ।

त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥

अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली ।

ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥

त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं ।

नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥

हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा ।

तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥

ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील ।

खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥

कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे ।

बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥

नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार ।

तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥

बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका ।

एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥

तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं ।

बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥

गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष ।

मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥

शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर ।

संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥

मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी ।

तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥

ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार ।

झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥

त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी ।

काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥

निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर ।

स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥

हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा ।

पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥

माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला ।

आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥

माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी ।

नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥

प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला ।

जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥

जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर ।

संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥

देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् ।

मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥

माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं ।

पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥

तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य ।

तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥

आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई ।

या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥

लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर ।

जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥

लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती ।

जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥

कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून ।

पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥

चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति ।

यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥

गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य ।

खापर्‍या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥

तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला ।

फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥

मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली ।

श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥

आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं ।

चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥

याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन ।

येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥

तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें ।

ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥

जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला ।

कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥

तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें ।

उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥

श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत ।

इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥

त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी ।

जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥

मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा ।

आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥

आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत ।

एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥

शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून ।

महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥

तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला ।

जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥

त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान ।

आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥

राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी ।

म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥

ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता ।

महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥

म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण ।

चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥

ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला ।

श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥

मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून ।

तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥

तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत ।

परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥

तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी ।

मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥

जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल ।

तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥

ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली ।

समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥

कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत ।

सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥

भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें ।

बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥

सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला ।

भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥

म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची ।

आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥

समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान ।

जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥

राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी ।

जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥

व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून ।

त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥

जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां ।

हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥

हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली ।

त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥

बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ‘ करी ‘ ।

त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥

आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला ।

परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥

तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित ।

तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥

तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा ।

समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥

मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला ।

द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥

यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत ।

सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥

विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा ।

जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १३

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।

हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥

तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।

गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥

तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।

ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥

दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।

रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥

तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।

दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥

मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।

मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥

ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।

माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥

आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।

विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥

भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली ।

वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥

गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत ।

मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥

कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? ।

चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥

ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन ।

या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्‍यासाठीं ॥१२॥

श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं ।

ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥

स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा ।

अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥

अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं ।

तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥

सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून ।

प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥

तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं ।

हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥

इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची ।

ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥

रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली ।

प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥

रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास ।

जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥

तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा ।

पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥

संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार ।

त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥

म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा ।

पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥

वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार ।

त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥

अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा ।

तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥

संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन ।

स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥

संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा ।

एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥

त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती

तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥

ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर ।

खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥

नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार ।

क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥

असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं ।

झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥

बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें ।

दगड चुना रेतीचें । सामान गाड्या वाहती ॥३२॥

त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी ।

त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥

आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाट्यानें ।

म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥

एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी ।

तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥

तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? ।

आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥

महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं ।

मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥

मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला ।

तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥

बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी ।

बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥

बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले ।

गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥

समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले ।

तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥

ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत ।

त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥

महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी ।

मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥

त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन ।

साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥

एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला

समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥

त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण ।

जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥

पुढार्‍यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्‍यांनीं ।

आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥

यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास ।

परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥

यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं ।

त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥

अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा ।

एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥

हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला ।

जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥

त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती ।

चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥

कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला ।

दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥

मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी ।

या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥

म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला ।

तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥

तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें ।

मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥

त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी ।

तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥

तेंच खरें अखेर । घडून आलें साचार ।

तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥

समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें ।

असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥

आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार ।

म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥

मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला ।

त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥

यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग ।

उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥

करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली ।

कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥

म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती ।

समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥

श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत ।

तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥

महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई ।

कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥

हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्‍टर ।

सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥

परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती ।

येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥

डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर ।

मारिली त्याच्या डोक्यावर ।अति जोरानें विबुध हो ॥६९॥

म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला ।

स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥

फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ ।

खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥

तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला ।

बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥

तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं ।

लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥

तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता ।

तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥

आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें ।

त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥

तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला ।

जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥

हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर ।

त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥

त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो ।

तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥

यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून ।

आलास कीं रे धांवून । या वेड्यापिशापाशीं ॥७९॥

गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा ।

म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥

अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी ।

कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥

तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा ।

कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥

तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास ।

हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥

त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही ।

मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥

तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां ।

समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥

त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार ।

स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥

समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी ।

थल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥

ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला ।

तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥

मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची ।

तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥

कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! ।

दुर्गंधीही किंचित्‌ । येत होती तियेला ॥९०॥

तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं ।

कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥

असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें ।

हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥

आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा ।

अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥

ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें ।

लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥

चाफे झाले पूर्ववत्‌ । भेगा पदींच्या निमाल्या समस्त ।

दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥

गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन ।

प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥

बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची ।

ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥

संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर ।

येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥

तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली ।

समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥

मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला ।

पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥

गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर ।

आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥

ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली ।

त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥

राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत ।

केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥

ऐसें संकेतें बोलले । थापट्या मारुन जागें केलें ।

आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥

हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा ।

येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥

हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी ।

ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥

मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा ।

पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥

मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत्‌ ।

म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥

आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों ।

नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥

हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा ।

चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥

समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती ।

या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥

ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला ।

दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥

पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची ।

त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥

प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा ।

समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥

ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन ।

वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥

हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला ।

मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥

असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी ।

बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥

मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला ।

मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥

ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां ।

नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥

त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत ।

मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥

मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी ।

मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥

झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर ।

दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥

झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा ।

मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥

पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत ।

भजनी दिंड्या अमित । आल्या भजन करावया ॥२४॥

आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका ।

तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥

झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी ।

भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥

झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार ।

लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥

स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें ।

योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥

झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण ।

तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥

पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा ।

भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥

चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी ।

कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥

घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें ।

मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥

आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी ।

हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥

निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा ।

आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥

आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल ।

वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥

झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून ।

तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्‍हा पुण्याची ॥३६॥

तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा ।

तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥

आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी ।

पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥

मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें ।

हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥

दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला ।

तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥

झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली ।

महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥

लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त ।

पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्‍या असे ॥४२॥

हा उकिरड्या नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा ।

भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥

हें उकीर्डा नाम वर्‍हाडांत । पोर नसल्या वांचत ।

लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥

तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत ।

तैसा उकीर्डा वर्‍हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥

हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी ।

येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥

जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं ।

जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥

तैसाच हा वर्‍हाडांत । वारी वद्यपक्षांत ।

करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥

असो एकदां वर्‍हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात ।

बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥

या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते ।

अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥

आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर ।

ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥

मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे ।

तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥

पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत ।

त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥

ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली ।

त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥

त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी।

तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥

कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली ।

शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥

येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर ।

एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥

गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत ।

ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥

पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला ।

गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥

शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं ।

काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥

हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना ।

दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥

वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर ।

जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥

माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी ।

ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥

शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर ।

बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥

तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला ।

देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥

उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास ।

आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥

पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी।

उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥

मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास ।

नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥

बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला ।

पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥

तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली ।

कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥

आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर |

टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥

तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी ।

गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥

कंप अशक्‍ततेनें । राहिला देहाकारणें ।

करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥

घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें ।

कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥

पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्‍तता राहिली किंचित् ।

हें गुरुभक्‍तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥

गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी ।

कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥

सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला ।

हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥

संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी ।

मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १४

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया ।

सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥

ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली ।

शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥

भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन ।

वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥

शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी ।

बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥

जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा ।

दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥

हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें ।

बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥

तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु ।

भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥

एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा ।

बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥

हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न

उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥

श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात ।

परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥

या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी ।

तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥

ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला ।

आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥

घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण ।

लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥

विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें ।

भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥

तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर ।

भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥

कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान ।

पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥

ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला ।

पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥

जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन ।

संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥

बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी ।

अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥

जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी ।

तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥

जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल ।

सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥

यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया ।

आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥

ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर ।

अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥

एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली ।

तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥

श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं ।

भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥

बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी ।

अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥

तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा ।

तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥

तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें ।

व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥

आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी ।

याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥

ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला ।

तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥

आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें ।

घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥

आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत ।

आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥

संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी ।

उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥

ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून ।

म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥

किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें ।

कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥

कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी ।

ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥

दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून ।

कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥

अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये ।

प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥

आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून ।

तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥

नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया ।

परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥

तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला ।

ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥

जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ ।

बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥

त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी ।

खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥

काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें ।

खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥

त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा ।

नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥

ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण ।

आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥

रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला ।

बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥

तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर ।

एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥

त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत ।

पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥

करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया ।

जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥

त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण ।

मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥

घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची ।

वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥

जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां ।

वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥

बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले ।

मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥

दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला ।

गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥

तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? ।

ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥

आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून ।

उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥

जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती ।

त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥

ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला ।

बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥

एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती ।

जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥

या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन ।

या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥

म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली ।

तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥

मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल ।

यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥

बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी ।

घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥

चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले ।

ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥

तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर ।

घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥

हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना ।

आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥

तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून ।

बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥

महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं ।

उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥

मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान ।

तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥

तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली ।

होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥

श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार ।

तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥

जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला ।

मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥

आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून ।

ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥

कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी ।

लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥

महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक ।

नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥

तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान ।

तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥

म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें ।

माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥

मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण ।

आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥

समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत ।

मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥

ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले ।

पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥

नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट ।

मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥

कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले ।

कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥

कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा ।

थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्‍यांचा ॥८४॥

पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत ।

गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥

रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी ।

पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥

चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले ।

आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥

कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर ।

बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥

खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला ।

गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥

ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून ।

पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥

परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत ।

म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥

गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं ।

ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥

तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा ।

मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥

ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें ।

गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥

तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी ।

फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥

छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर ।

नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥

परी महाराज निर्धास्त होते । ‘ गिनगिन गणांत बोते ‘ ।

ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥

मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती ।

उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥

चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले ।

आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥

त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ ।

नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥

गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी ।

वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥

ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत ।

नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥

कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें ।

आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥

तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण ।

तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥

ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें ।

हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥

श्लोक ( अनुष्टुप छंद )

नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी ।

मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥

ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें ।

नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥

नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी ।

 नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥

कोळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश ।

भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥

नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली ।

आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥

ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण ।

बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥

सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें ।

तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥

मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका ।

आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥

मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर ।

ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥

क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी ।

वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥

तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार ।

कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥

बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? ।

तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥

तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां ।

तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥

कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर ।

माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥

अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा ।

संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥

म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार ।

जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥

ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण ।

समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥

परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात ।

होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥

सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले ।

शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥

या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण ।

हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥

या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत ।

ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥

सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला ।

तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥

सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण ।

गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥

वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं ।

अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥

त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत ।

मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥

थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी ।

भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥

आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले ।

विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥

वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन ।

पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥

रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला ।

जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥

तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला ।

त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥

मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा ।

आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥

म्हणा ” साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा ।

तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास ” ॥३६॥

हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें ।

घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥

माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत ।

महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥

गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें ।

भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥

ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा ।

येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥

त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न ।

हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥

बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला ।

जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥

पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं ।

खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥

संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी ।

सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥

ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा ।

स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥

योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी ।

भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥

शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत ।

आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥

ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी ।

हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥

जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत ।

वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥

खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना ।

हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥

योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर ।

करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १५

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा ।

तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥

राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें ।

तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥

आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला ।

आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥

या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार ।

देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥

एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता ।

पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥

अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।

कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥

शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा ।

देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥

देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें ।

आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥

तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार ।

मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥

टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर ।

दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥

निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी ।

ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥

करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य ।

सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥

वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें ।

धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥

कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।

ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥

तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला ।

लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥

झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची ।

मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥

दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे ।

जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥

अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे ।

नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥

शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं ।

झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥

शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती ।

ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥

त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला ।

वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥

माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी ।

अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥

आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा ।

आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥

आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी ।

ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥

अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले ।

तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥

या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला ।

श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥

शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा ।

समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥

टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न ।

त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥

ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें ।

ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥

तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां ।

तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥

फिरेल नागवा सभेंत । “गिण गिण गणांत” ऐसा म्हणत ।

मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥

कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें ।

गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥

त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेड्याकारण ।

जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेड्यापरी ॥३३॥

खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक ।

तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥

खर्‍याखोट्याची परीक्षा । साधूच हे करिती देखा ।

म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥

ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली ।

आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥

येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी ।

आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥

वेड्यापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं ।

सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥

करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर ।

याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥

स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा ।

शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥

त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास ।

तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥

पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा ।

यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥

यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें ।

खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥

बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास ।

तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥

मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला ।

चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥

खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार ।

आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥

वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें ।

कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥

शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।

वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥

सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा ।

परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥

तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण ।

लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥

शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी ।

ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥

मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला ।

म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥

परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं ।

साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥

सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी ।

गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥

सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा ।

त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥

श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान ।

खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥

दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई ।

सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥

आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार ।

त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥

सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला ।

मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥

“दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।

स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥

त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची ।

जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥

त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला ।

म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥

तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले ।

श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥

म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी ।

अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥

स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।

स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥

यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न ।

ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥

ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती ।

तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?” ॥६७॥

ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले ।

गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥

आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत ।

जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥

त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला ।

आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत ।

ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥

सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली ।

खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥

भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला ।

दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥

राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें ।

वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥

प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची ।

त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥

दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे ।

ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥

अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं ।

बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥

तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी ।

सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥

मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें ।

तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥

लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त ।

येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥

तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते ।

तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥

कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं ।

जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥

कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची ।

कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥

जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड ।

ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥

चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले ।

तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥

अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला ।

होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥

सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।

कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥

ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर ।

टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥

या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी ।

जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥

ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर ।

समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥

ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला ।

वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥

तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत ।

स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥

यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी ।

आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥

जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो ।

हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥

माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी ।

ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥

भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन ।

आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥

प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी ।

दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥

झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास ।

तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥

हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी ।

मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥

या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।

त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥

बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी ।

केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥

कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर ।

कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥

हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी ।

या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥

येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर ।

कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥

स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते ।

पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥

स्वातंत्र्य हे साचार । येतें जातें वरच्यावर ।

त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥

गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।

आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥

यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।

चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥

असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा ।

श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥

तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत ।

आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥

पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला ।

म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥

तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र ।

तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥

आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला ।

उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥

टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून ।

अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥

तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें ।

ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥

द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत ।

घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥

तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी ।

जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥

त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला ।

तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥

मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें ।

दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥

चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला ।

त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥

दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त ।

उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥

पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं ।

आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥

दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत ।

बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥

मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा ।

म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेड्या करुं नको ॥२४॥

अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत ।

सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥

त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं ।

कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥

ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे ।

बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥

तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती ।

याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥

ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी ।

हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥

अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन ।

या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥

तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला ।

योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥

तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई ।

ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥

पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला ।

विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥

एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन ।

कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥

महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही ।

कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥

जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत ।

तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥

श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें ।

शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥

संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।

त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥

पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।

म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥

हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें ।

वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १६

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा ।

परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥

तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण ।

ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥

आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? ।

काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥

म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका ।

आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥

तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण ।

आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥

गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत ।

महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥

हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी ।

हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥

त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही ।

निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥

ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार ।

भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥

ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला ।

कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥

गजाननाच्या वार्‍या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी ।

परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥

अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण ।

शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥

तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला ।

या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥

‘ गिन गिन गणातें ‘ हें भजन । पिशापरी आचरण ।

कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥

म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें ।

केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥

उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण ।

तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥

गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी ।

गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥

यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं ।

म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥

तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक ।

भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥

त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला ।

जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥

ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण ।

अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥

दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला ।

तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥

पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर ।

उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥

पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? ।

गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥

जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ ।

तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥

कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला ।

लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥

मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे ।

नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥

तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण ।

‘ गण गण ‘ ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥

आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास ।

ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥

पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून ।

तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥

पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया ।

नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥

बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार ।

पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥

पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला ।

तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥

जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार ।

तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥

उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना ।

म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥

स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण ।

कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥

तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी ।

ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥

किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन ।

ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥

मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या ।

त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥

ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं ।

तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥

अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां ।

दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥

पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं ।

मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥

मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला ।

तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥

तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही ।

आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥

झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत ।

दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥

तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला ।

तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥

या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी ।

समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥

करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा ।

भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥

त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन ।

तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥

झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत ।

पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥

प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? ।

हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥

सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला ।

खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥

पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची ।

ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥

लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या ।

त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥

दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण ।

मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥

पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त ।

आडमार्गानें किंचित्‍ । जाऊं न देती तयांला ॥५६॥

निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात ।

तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥

एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून ।

होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥

सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार ।

मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥

या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती ।

म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥

या कवराकारण । दोन पुत्र होते जाण ।

गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥

कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती ।

तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥

लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान ।

म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥

कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी ।

राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥

एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून ।

त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥

तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं ।

जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥

पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे ।

परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥

भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां ।

मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥

घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी ।

जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥

माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी ।

आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥

भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची ।

ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥

हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? ।

हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥

ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत ।

तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥

नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? ।

मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥

भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? ।

माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥

पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण ।

म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥

नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार ।

तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥

ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी ।

मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥

तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला ।

नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥

गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे ।

आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥

तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल ।

पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥

तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं ।

यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥

सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? ।

कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥

मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही ।

तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥

भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर ।

ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥

भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्‍याचें चून जाण ।

लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥

नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला ।

वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥

ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी ।

भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥

ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां ।

पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥

तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची ।

तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥

अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला ।

म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥

मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? ।

आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥

अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं ।

म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥

हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा ।

माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥

ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी ।

नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥

गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी ।

ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥

थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार ।

मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥

मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों ।

म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥

तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण ।

तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥

ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित ।

चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥

कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा ।

न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥

नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत ।

पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥

कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर ।

कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्‍या कोणाच्या ॥३॥

परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला ।

वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥

आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून ।

आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥

त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति ।

त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥

तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा ।

आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥

मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें ।

नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥

ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला ।

समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥

दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी ।

झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥

समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार ।

उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥

त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन ।

बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥

तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों ।

नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥

ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता ।

म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥

कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं ।

काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥

ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी ।

कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥

त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण ।

एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥

तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां ।

कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥

जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत ।

सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥

तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें ।

भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥

भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला ।

सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥

समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी ।

पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥

भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया ।

यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥

आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान ।

सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥

ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला ।

समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥

शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार ।

एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥

घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं ।

अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥

चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन ।

कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥

ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा ।

घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥

जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत ।

एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥

तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी ।

नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥

ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला ।

तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥

तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला ।

ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्‍याच्या दृष्टीसी ॥३३॥

त्याची शिकार करण्या भली । शिकार्‍यानें आपुली ।

नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥

त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला ।

त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥

छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर ।

थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥

कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना ।

होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥

मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित ।

नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥

ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत ।

एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥

डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता ।

नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥

कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास ।

झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥

तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल ।

कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥

मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी ।

शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥

तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें ।

अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥

ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली ।

तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥

झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून ।

जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥

तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें ।

दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥

ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची ।

प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥

ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर ।

संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १७

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला ।

जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥

हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर ।

तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥

प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं ।

रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥

दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर ।

नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥

त्या भयंकर रुपाची । भीति नसे भक्ता साची ।

पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥

तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया ।

ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥

तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत ।

पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥

त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी ।

दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥

गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत ।

तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥

चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण ।

गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥

जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत ।

त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥

एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ ।

खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥

एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी ।

त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥

त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला ।

हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥

तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ ।

विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥

भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी ।

भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥

मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे ।

आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥

तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा ।

येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥

फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील ।

याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥

दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण ।

मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥

भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं ।

चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥

मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका ।

मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥

ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी ।

चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥

ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन ।

मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥

भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी ।

बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥

महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले ।

जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥

तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा ।

डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥

जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला ।

योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥

आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार ।

त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥

पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं ।

महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥

अरे वेड्या नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा ।

बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥

हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां ।

अधिकार्‍याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥

मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला ।

म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥

दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें ।

योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥

मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीतीं बोलला ।

तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥

हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर ।

याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥

तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी ।

मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥

आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित ।

मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥

स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी ।

बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥

तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें ।

कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥

महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती ।

कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥

त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली ।

शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥

बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर ।

डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥

व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही ।

तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥

महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि ।

म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥

तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष ।

तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥

जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें ।

कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥

तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून ।

पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥

त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं ।

म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥

हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न ।

बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥

श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची ।

मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥

तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना ।

तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥

खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली ।

ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥

जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला ।

याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥

कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें।

तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥

तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी ।

अधिकार्‍यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥

बर्‍या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें ।

ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥

तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून ।

तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥

शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला ।

रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥

हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ ।

करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥

शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला ।

त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥

जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें ।

लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥

इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर ।

बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥

मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले ।

या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥

ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं ।

तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥

गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य ।

जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥

या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत ।

कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥

नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा ।

म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥

ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून ।

आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥

तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी ।

उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥

तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन ।

जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥

हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा ।

किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥

हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त ।

नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥

जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा ।

परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥

अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून ।

तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥

तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान ।

म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥

वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही ।

तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥

ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला ।

आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥

महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित ।

भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥

म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला ।

ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥

समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी ।

करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥

भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला ।

तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥

समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं ।

विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥

हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास ।

भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥

या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी ।

बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥

याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा ।

होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥

त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं ।

जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥

अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर ।

बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥

तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले ।

अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥

अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास ।

जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥

तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं ।

त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥

तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला ।

आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥

पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून ।

कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥

महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते ।

अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥

दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला ।

महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥

महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास ।

त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥

यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण ।

यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥

या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी ।

मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥

तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव ।

दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥

हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर ।

याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥

ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा ।

साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥

जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले ।

कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥

महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं ।

जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥

शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून ।

तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥

म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना ।

या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥

दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत ।

मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥

परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं ।

तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥

तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत ।

मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥

काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले ।

याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥

त्यांत होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत ।

मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥

महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले ।

भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥

आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी ।

म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥

तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें ।

महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥

श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी ।

परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥

अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे ।

मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥

तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला ।

तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥

ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण ।

काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥

महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं ।

आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥

गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला ।

आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥

समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण ।

होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥

धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य ।

तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥

खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची ।

ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥

सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें ।

आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥

यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? ।

पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥

तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान ।

हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥

धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी ।

परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥

हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी ।

जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥

महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले ।

या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥

पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी ।

परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥

शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा ।

हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥

असो या बापुरावाची । कांता एक होती साची ।

तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥

मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात ।

घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥

बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार ।

कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥

या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी ।

क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥

भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला ।

आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥

खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित ।

अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥

महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला ।

केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥

तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! ।

तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥

ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन ।

तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥

जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली ।

गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥

ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन ।

केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥

त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची ।

नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥

असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत ।

नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥

त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी ।

जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥

पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले ।

आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥

पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं ।

नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥

गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती ।

आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥

तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! ।

या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥

त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा ।

ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥

खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! ।

जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥

तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित ।

श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥

हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी ।

वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥

लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून ।

नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥

गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी ।

स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥

भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान ।

घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥

संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी।

त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥

स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें ।

विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥

नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन ।

शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥

शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १८

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा ।

हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥

हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना ।

हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥

काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी ।

तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥

भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी ।

ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्णन बहुसाळ ॥४॥

म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा ।

सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥

अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं ।

तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥

हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य ।

शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥

बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी ।

ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥

बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत ।

घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥

परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला ।

तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥

बायजेकडे पाहून । जननी करी रोदन ।

माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥

भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी ।

दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥

शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर ।

हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥

कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं ।

बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥

नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी ।

तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥

ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून ।

आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥

बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा ।

तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥

डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर ।

जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥

तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी ।

इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥

त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना ।

म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥

हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं ।

आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥

झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन ।

वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥

ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें ।

कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥

परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना ।

ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥

बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण ।

त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥

जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला ।

दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥

बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही ।

कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥

ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं ।

आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥

तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर ।

कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥

तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार ।

सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥

ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना ।

होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥

अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत ।

तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥

खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी ।

बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥

बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा ।

अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥

मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन ।

अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥

त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला ।

पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥

भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी ।

महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥

तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी ।

महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥

बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर ।

कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥

तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले ।

अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥

जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात ।

उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥

तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला ।

घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥

परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं ।

निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥

समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत ।

त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥

पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला ।

शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥

त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले ।

तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥

पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी ।

ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥

पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी ।

तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥

हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें ।

तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥

बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य ।

यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥

परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी ।

भोगण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥

पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता ।

बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥

पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं ।

म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥

या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार ।

नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥

भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं ।

पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥

ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? ।

कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥

वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला ।

कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥

भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी ।

लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥

ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते ।

एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥

जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस ।

सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥

संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते ।

पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥

भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही ।

चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥

पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन ।

कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥

लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती ।

दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥

भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष ।

हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥

शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला ।

ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥

ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी ।

जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥

तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला ।

माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥

ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून ।

गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥

घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला ।

पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥

महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात ।

ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥

भाऊ राजाराम कवर । एक होता डाँक्टर ।

पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥

त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला ।

औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥

बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती ।

शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥

नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं ।

शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥

कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला ।

वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥

भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी ।

शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥

आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय ।

याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥

पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ ।

या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥

ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं ।

रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥

तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र ।

कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥

तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली ।

गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥

कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा ।

मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥

दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी ।

डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥

तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला ।

दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥

डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं ।

प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥

ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान ।

तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥

डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला ।

हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥

प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत ।

मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥

तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण ।

त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥

परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला ।

भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥

फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा ।

येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥

एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार ।

पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥

भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली ।

हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥

दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास ।

माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥९५॥

हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून ।

हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥

त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन ।

लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥

कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण ।

अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥

असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं ।

त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥

होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार ।

स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥

जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी ।

सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥

त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार ।

येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥

झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे ।

आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥

हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा ।

प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥

म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे ।

रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥

या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन ।

अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥

हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी ।

बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥

आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा ।

समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥

मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी ।

पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥

तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार ।

भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥

प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी ।

‘ जय जय रामकृष्ण हरी ‘ । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥

शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला ।

ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥

नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार ।

श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥

या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा ।

भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥

त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत ।

सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥

श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला ।

उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥

हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं ।

दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥

पोलिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं ।

पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥

एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर ।

बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥

बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला ।

म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥

स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी ।

दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥

मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत ।

राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥

मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना ।

केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥

बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी ।

कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥

तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून ।

तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥

‘ अरण ‘ होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास ।

मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥

तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ ।

मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥

ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला ।

परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥

मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण ।

बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥

शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी ।

फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥

बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण ।

हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥

शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा ।

येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥

याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? ।

ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥

कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला ।

तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥

त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत ।

वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥

आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन ।

बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥

मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? ।

कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥

अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती ।

शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥

सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान ।

न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥

ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा ।

अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥

तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत ।

ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥

गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे ।

सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥

समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना ।

ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥

तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें ।

पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥

तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी ।

बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥

पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी ।

तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥

धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला ।

तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥

इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस ।

होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥

ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन ।

बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥

तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं ।

ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥

म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण ।

निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला ।

कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥

संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात ।

गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥

काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी ।

बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥

याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण ।

रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥

पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें ।

म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥

कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा ।

तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥

तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी ।

त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥

प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत ।

यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥

वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती ।

चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥

हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी ।

ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥

गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी ।

कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥

पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत ।

शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥

वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला ।

कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥

लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती ।

तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥

तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर ।

म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥

लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया ।

याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥

पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार ।

मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥

अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं ।

चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥

तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? ।

आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥

ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें ।

त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥

चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता ।

वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥

समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त ।

तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥

तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर ।

त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥

वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती ।

संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥

घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी ।

चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥

आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी ।

म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥

ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार ।

आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥

पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी ।

मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥

एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन ।

त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥

तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती ।

म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥

सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती ।

खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥

व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत ।

हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥

सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें ।

अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥

तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत ।

पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥

त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न ।

आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥

याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती ।

या वेड्यातें वंदिताती । ” महाराज, महाराज, ” म्हणून ॥८७॥

जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून ।

झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥

त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां ।

येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥

आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित ।

कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥

तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला ।

अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥

कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर ।

पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥

ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला ।

आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥

परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर ।

घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥

ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी ।

स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥

तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर ।

म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥

मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली ।

ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥

माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा ।

वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥

तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर ।

करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥

श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली ।

कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥

प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत ।

समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय १९

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा ।

माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥

हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती ।

माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥

खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता ।

याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥

मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका ।

हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥

महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ ।

जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥

तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां ।

मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥

माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें ।

लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥

माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण ।

आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥

तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली ।

काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥

जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।

या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥

म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं ।

तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥

त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना ।

निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥

तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही ।

तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥

तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर ।

मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥

तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला ।

त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥

असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी ।

गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥

ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी ।

त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥

स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला ।

परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥

गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार ।

रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥

असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा ।

वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥

त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ ।

जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥

बुटीचा ऐसा विचार । या सिताबर्डीवर ।

महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥

अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला ।

तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥

शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित ।

विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥

कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? ।

तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥

तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार ।

बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥

टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची ।

येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥

जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला ।

जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥

तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें ।

आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥

इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत ।

जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥

महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी ।

या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥

तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना ।

अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥

बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी ।

श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥

रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन ।

परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥

जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना ।

बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥

शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले ।

परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥

इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी ।

घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥

बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत ।

त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥

अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं ।

तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥

तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार ।

तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥

तुझ्या धनाच्या जोरावरी । उड्या या जाण निर्धारी ।

तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥

हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला ।

परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥

गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी ।

पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥

ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास ।

होत्या पातळ पदार्थांस । वाट्या जवळ चांदीच्या ॥४४॥

नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें ।

मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥

ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? ।

ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥

असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत ।

तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥

वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून ।

तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥

चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी ।

तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥

समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें ।

अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥

विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया ।

दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥

तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी ।

तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥

येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज ।

पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥

आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी ।

आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥

भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ ।

शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥

भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी ।

दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥५६॥

कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें ।

परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥

तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं ।

माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥

तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें ।

ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥

आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला ।

अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥

ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन ।

त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥

हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी ।

ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥

त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें ।

शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥

उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार ।

त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥

तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून ।

शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥

धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत ।

होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥

अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं ।

त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति ।

कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥

ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार ।

बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥

अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक ।

मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥

तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं ।

चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥

चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी।

जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥

तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न ।

हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥

ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी ।

तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥

एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां ।

हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥

एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर ।

एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥

एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती ।

एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥

स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले ।

आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥

स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली ।

तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥

फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान ।

स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥

बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां ।

संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥

त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून ।

ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥

ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला ।

बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥

ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे ।

हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥

स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण ।

तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥

सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान ।

या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥

हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं ।

तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥

अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां ।

म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥

येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी ।

परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥

आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें ।

भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥

मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही ।

त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥

दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां ।

श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥

मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून ।

ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥

या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी ।

भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥

परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण ।

जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥

आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा ।

या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥

परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं ।

योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥

जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत ।

त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥

आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख ।

धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥

कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा ।

आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥

या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें ।

परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥

जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण ।

म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥

काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर ।

हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३॥

आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक ।

शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥

तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची ।

बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥

मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार ।

जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥

पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला ।

अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥

या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत ।

मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥

वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी ।

हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥

व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर ।

उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥

श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर ।

हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥

जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला ।

तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥

तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं ।

कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥

नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार ।

ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥

नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार ।

दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥

शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत ।

सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥

तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत ।

मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥

पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा ।

जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥

खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई ।

गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥

पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा ।

आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥

मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण ।

तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥

या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें ।

परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥

मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं ।

जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥

आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी ।

कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥

जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल ।

आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥

आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही ।

निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥

ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल ।

त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥

ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला ।

उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥

कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत ।

तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥

ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला ।

प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥

अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले ।

वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥

मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर ।

वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥

साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची ।

ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥

तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी ।

डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥

जे येतील तयांना । साळु घाल भोजना ।

येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥

ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत ।

जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥

प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला ।

तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥

खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं ।

त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥

पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा ।

होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥

या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी ।

तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥

प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न ।

गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥

श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी ।

शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥

चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? ।

बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥

आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी ।

विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥

स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी ।

हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥

तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता ।

आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥

त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती ।

आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥

ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान ।

न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥

शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी ।

मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥

प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून ।

चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥

समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत ।

पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥

मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली ।

शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥

इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर ।

येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥

भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला ।

तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥

स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर ।

निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥

ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण ।

ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥

मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा ।

तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥

श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत ।

पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥

तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं ।

गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥

उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर ।

खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥६०॥

राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला ।

ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥

हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त ।

म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥

क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी ।

अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥

ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन ।

महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥

तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां ।

म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥

पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी ।

विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥

तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर ।

रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥

आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची ।

पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥

ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर ।

नफातोट्याची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥

तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता ।

म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांड्याकारणें ॥१७०॥

कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची ।

उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥

ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण ।

तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥

महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी ।

दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥

ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली ।

खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥

मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार ।

वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥

दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें ।

उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥

ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला ।

दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥

महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी ।

बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥

मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन ।

तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥

तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां ।

झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥

मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला ।

गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥

म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले ।

रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥

ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी ।

मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥

आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार ।

लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥

आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! ।

सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥

खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला ।

तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥

ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून ।

लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥

मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें ।

खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥

ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर ।

आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥

ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती ।

आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥

छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस ।

नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥

तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी ।

दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥

रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत ।

आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥

तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला ।

उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥

ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें ।

पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥

गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं ।

तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥

शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी ।

असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥

तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची ।

त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥

मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर ।

त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥

तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां ।

त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥

नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें ।

समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥

तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत ।

साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥

ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला ।

लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥

हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ ।

ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥

वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी ।

परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥

ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून ।

आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥

तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर ।

उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥

कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी ।

वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥

या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत ।

आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥

तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें ।

अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥

हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें ।

कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥

हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ ।

तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥

ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे ।

तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥

तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले ।

त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥

एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त ।

होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥

म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी ।

वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥

नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर ।

गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥

अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा ।

तेथील हरी जाखड्याचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥

हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण ।

गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥

तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी ।

बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥

तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन ।

कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥

तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी ।

येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥

कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार।

निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥

आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें ।

ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥

संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण ।

मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥

हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! ।

संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥

ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी ।

प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥

ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त ।

थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥

या हरी जाखड्यानें । बावंच्या मागला मजकारणें ।

म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥

संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया ।

यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥

पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।

सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥

ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखड्यासी पाहिलें ।

जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥

तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून ।

होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥

जा आतां परत घरा । सुखें करी संसारा ।

करीत असावा परमेश्वर । आठव वेड्या ! विसरुं नको ॥३४॥

ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन ।

दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥

हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं ।

महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥

ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार ।

रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥

बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर ।

तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥

हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत ।

इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥

वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती ।

हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥

फलभारें तरुवर । वांकले असती अपार ।

वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥

असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी ।

एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥

तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास ।

लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥

असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी ।

योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥

तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन ।

गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥

नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र ।

तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥

काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां ।

कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥

तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी ।

ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥

उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त ।

त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥

बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी ।

अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥

पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर ।

कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥

तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां ।

ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥

तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी ।

हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥

षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर ।

त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥

मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत ।

योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥

गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! ।

सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥

नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून ।

येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥

जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला ।

ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥

तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी ।

तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥

त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार ।

शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥

महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ।

आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥

महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण ।

तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥

नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती ।

तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥

म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! ।

मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥

धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत ।

पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥

ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले ।

भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥

कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं ।

तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥

मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण ।

कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥

तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला ।

तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥

हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची ।

सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥

जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी ।

करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥

योगाभ्यास ही समोरी । त्या खेड्याच्या आदरें करी ।

त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥

तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत ।

आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥

एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं ।

त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥

म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला ।

जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥

तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण ।

मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥

दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली ।

आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥

तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण ।

औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥

नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली ।

धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥

ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण ।

नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥

तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया ।

अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥

ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं ।

हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥

व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार ।

आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥

तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं ।

बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥

हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत ।

शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥

असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी ।

घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥

जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा ।

जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥

जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती ।

जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥

पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान ।

गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥

हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था ।

हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥

तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर ।

जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥

आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें ।

पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥

देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी ।

अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥

ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी ।

अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥

हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता ।

अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥

किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा ।

म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥

महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर ।

सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥

तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं ।

इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥

चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला ।

तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥

पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें ।

चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥

तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस ।

संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥

पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला ।

पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥

गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी ।

आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥

कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित ।

चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥

त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण ।

दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥

तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला ।

या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥

दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित ।

तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥

हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी।

ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥

जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले ।

शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥

चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास ।

बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥

मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका ।

कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥

ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण ।

दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥

शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास ।

भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥

प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला ।

सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥

देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन ।

स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥

पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ ।

ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥

गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी ।

गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥

गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा ।

विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥

अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? ।

कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥

मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल ।

ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥

श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी ।

विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥

आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस ।

हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥

आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती ।

अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥

ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल ।

नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥

गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे।

ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥

त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी ।

तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥

त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया ।

पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥

लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं ।

जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥

तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता ।

एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥

निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित ।

आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥

तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें ।

भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥

दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत ।

आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥

तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला ।

लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥

रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार ।

सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥

रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी ।

दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥

मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात ।

रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥

वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार ।

होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥

तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले ।

फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥

बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती ।

कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥

ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर ।

उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥

समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी ।

रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥

पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर ।

भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥

जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा ।

अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥

ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी ।

उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥

अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण ।

’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥

मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार ।

शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥

दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ ।

घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥

खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा ।

सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥

स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ ।

भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

 

अध्याय २०

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।

देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥

तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं ।

मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥

माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून ।

राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥

यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष ।

खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥

म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा ।

पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥

असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर ।

म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥

शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती ।

आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥

समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर ।

कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥

आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? ।

देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥

ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती ।

महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥

जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ।

ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥

तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ ।

ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥

ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां ।

गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥

हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा ।

नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥

अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी ।

बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥

एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस ।

उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥

केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी ।

शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥

तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां ।

हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥

उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी ।

कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥

हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें ।

दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥

फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती ।

गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥

हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण ।

तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥

तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी ।

उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥

त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें ।

प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥

यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर ।

येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥

अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य ।

त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥२६॥

पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी ।

म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥

ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस ।

तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥

आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार ।

सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥

मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची ।

तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥

असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें ।

त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥

या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची ।

जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥

लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां ।

बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥

कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत ।

हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥

घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या घेतला मनें ।

कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥

असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं ।

तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥

आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा ।

ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥

तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य ।

ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥

तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी ।

चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥

गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर ।

यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥

पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी ।

तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग तें ॥४१॥

पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? ।

अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥

उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास ।

हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥

खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण ।

म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥

लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला ।

तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥

मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी ।

प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥

अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी ।

भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥

एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी ।

आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥

हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर ।

त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥

दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली ।

अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥

आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन ।

ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥

जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी ।

रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥

तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून ।

आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥

मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें ।

पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥

जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार ।

जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥

शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी ।

जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥

दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात ।

जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥

झंझावात बळावला । कडकडाट करी चपला ।

मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥

मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा ।

शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥

शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण ।

तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥

तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं ।

बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥

हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां ।

अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥

कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।

त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥

तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन ।

करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥

दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन ।

मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥

तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर ।

तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥

जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता ।

वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥

कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन ।

तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥

ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी ।

उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥

ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां ।

पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥

पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें ।

जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥

वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा ।

दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥

बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी ।

कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥

साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन ।

हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥

कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही ।

ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥

एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार ।

हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥

यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला ।

त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥

परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना ।

फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥

फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी ।

स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥

हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त ।

उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥

तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला ।

भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥

पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी ।

डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥

कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर ।

त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥

जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी ।

नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥

परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे ।

येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥

घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी ।

भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥

यादव म्हणे मनांत । भिकारी हा लोचट बहुत ।

नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥

त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन ।

सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥

दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य ।

फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥

तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें ।

तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥

हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन ।

आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥

कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण ।

श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥

पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे ।

श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥

ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार ।

तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥

त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी ।

रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥

ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता ।

कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥

भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी ।

होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥

पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले ।

तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥

यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला ।

तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥

संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? ।

कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥

तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार ।

माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥

तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? ।

ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥

फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात ।

तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥

रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी ।

यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥

परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला ।

ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥

सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं ।

फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥

तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या ।

विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥

विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत ।

तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥

आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला ।

तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥

समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं ।

निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर ।

त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥

म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला ।

सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥

गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची ।

वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥

बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं ।

अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥

तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित ।

आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥

ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत ।

कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥

आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों ।

नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥

बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला ।

घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥

रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी ।

वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥

तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला ।

कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥

गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार ।

गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥

म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला ।

हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥

खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत ।

अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥

तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण ।

आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥

काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला ।

वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥

तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार ।

मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥

ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां ।

कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥

मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों ।

वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥

बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले ।

तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥

मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य ।

प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥

बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला ।

म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥

हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण ।

गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥

तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला ।

डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥

गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर ।

या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥

तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें ।

नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥

हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली ।

तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥

हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार ।

मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥

सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला ।

वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥

मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें ।

व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥

आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा ।

करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥

समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत ।

मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥

संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी ।

भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥

दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी ।

आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥

एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार ।

तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥

त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला ।

बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥

दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें ।

वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥

मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना ।

ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥

वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी ।

हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥

शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर ।

उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥

ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां ।

शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥

येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार ।

पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥

दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ ।

घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥

हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें ।

मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥

ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं ।

घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥

आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास ।

शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥

तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला ।

मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥

माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत ।

तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥

अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन ।

हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥

पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी ।

तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥

अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी ।

नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥

त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला ।

मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥

नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी ।

तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥

समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? ।

सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥

दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत ।

नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥

दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा ।

आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥

कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची ।

ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥

ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर ।

प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥

लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी ।

प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥

मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती ।

तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥

तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर ।

औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥

थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला ।

परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥

चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी ।

एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥

वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती ।

कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥

मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला ।

मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥

तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं ।

तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥

पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत ।

हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥

तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी ।

पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥

निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव ।

उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥

रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा ।

परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥

वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार ।

पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥

औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत ।

ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥

त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी ।

मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥

वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें ।

कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥

कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य ।

कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥

कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार ।

दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥

औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले ।

गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥

पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत ।

म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥

कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें ।

कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥

तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी ।

विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥

वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन ।

देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥

माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची ।

आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥

तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान ।

मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥

तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य ।

समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥

गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया ।

वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥

खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची ।

परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥

समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर ।

बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥

हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी ।

त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥

बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें ।

नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥

हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना ।

रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥

ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन ।

म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥

कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं ।

यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥

पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण ।

संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥

श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा ।

अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥

मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर ।

मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥

त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें ।

लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥

ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं ।

निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥

तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें ।

लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥

त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन ।

येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय २१

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा ।

जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥

देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास ।

सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥

पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य ।

पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥

म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी ।

धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥

म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा ।

काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥

तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन ।

या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥

सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत ।

कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥

तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई ।

अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥

पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा ।

आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥

कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी ।

दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥

तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत ।

अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥

श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण ।

तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥

एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची ।

त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥

बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर ।

एक होता मजूर । हाताखालीं गवंड्यांच्या ॥१४॥

तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला ।

तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥

तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला ।

उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥

परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत ।

जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥

सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी ।

तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥

मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला ।

तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥

पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी ।

हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥

अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा ।

हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥

या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें ।

तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥

असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची ।

बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥

तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला ।

तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥

तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ ।

ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥

या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन ।

रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥

प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला ।

अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥

काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें ।

खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥

दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा ।

प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥

उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें ।

खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥

श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला ।

जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥

त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं ।

होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥

म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया ।

गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥

तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला ।

तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥

तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? ।

लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥

दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी ।

पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥

ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण ।

ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥

तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला ।

लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥

हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर ।

त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥

आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला ।

हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥

खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं ।

त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥

बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत ।

नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥

ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी ।

सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥

तोही गोल थोर होता । परी स्वामीची अगाध सत्ता ।

कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥

पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा ।

परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥

एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी ।

ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥

भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? ।

ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥

पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक ।

गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥

निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी ।

स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥

गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत ।

दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥

गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला ।

कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥

कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं ।

अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥

तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर ।

कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥

उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं ।

कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥

आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन ।

मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥

पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा ।

तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥

परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख ।

त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥

आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं ।

पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥

तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला ।

तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥

तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं ।

ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥

समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना ।

योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥

तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी ।

तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥

बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत ।

बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥

का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी ।

पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥

पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण ।

त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥

द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये ।

राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥

साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून ।

दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥

हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास ।

होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥

आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी ।

साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥

अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा ।

होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥

आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें।

सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥

कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं ।

जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥

मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस ।

ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥

दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला ।

पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥

पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार ।

हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥

श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला ।

घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥

रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन ।

ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥

श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र ।

अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥

या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका ।

वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥

प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन ।

केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥

माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी ।

देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥

बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर ।

त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥

कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य ।

गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥

पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला ।

बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥

कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला ।

गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥

त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली ।

तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥

जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें ।

देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥

मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर ।

विठोबासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥

कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही ।

जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥

किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य ।

सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥

त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला ।

जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥

होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले ।

तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥

चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला ।

शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥

कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत ।

बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥

गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली ।

महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥

हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला ।

महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥

समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ ।

पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥

कोरड्या ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला ।

एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरड्या विहिरी ठायीं ॥९८॥

भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती ।

शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥

षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा ।

मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥

गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत ।

पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥

बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची ।

घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥

नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला ।

जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥

कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले ।

नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥

चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं ।

कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥

मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत ।

समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥

गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली ।

हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥

हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले ।

मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥

उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार ।

अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥

भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत ।

आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥

ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही ।

निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥

कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत ।

अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥

खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें ।

निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥

तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला ।

आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥

कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी ।

मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥

ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला ।

“नैनं छिन्दन्ति” श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥

जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर ।

न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥

कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला ।

खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥

दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी ।

घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥

बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन ।

संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥

दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक ।

उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥

गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं ।

भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामीच्या ॥२२॥

गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला ।

छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥

द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची ।

दांभिक भक्ति घुड्याची । कशी ती कथन केली ॥२४॥

एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान ।

आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥

झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी ।

येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥

निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला ।

द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥

आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला ।

वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥

शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची ।

मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥

स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला ।

स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥

पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी ।

वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥

पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ ।

नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥

विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी ।

महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥

झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला ।

पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥

झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली ।

पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥

कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा ।

हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥

बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें ।

कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥

नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास ।

नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥

विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला ।

या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥

अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा ।

आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥

भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला ।

मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥

श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश ।

नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥

कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी।

जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥

पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला ।

कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥

छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा ।

ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥

सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास ।

जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥

नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं ।

केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥

महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला ।

हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥

बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची ।

भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥

कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची ।

कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥

महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला ।

तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥

कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी ।

त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥

एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला ।

दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥

कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी ।

आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥

गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला ।

श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥

त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत ।

परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥

धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत ।

समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति ।

दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥

तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला ।

तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥

केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून ।

समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥

गजाननाचे कृपें भलें । जाखड्याचें लग्न झालें ।

कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥

तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला ।

नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥

पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन ।

महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥

पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं ।

आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥

विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर ।

जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥

जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी ।

दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥

आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा ।

अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥

प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर ।

म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥

वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें ।

मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥

ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर ।

धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥

या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला ।

त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥

मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन ।

कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥

सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी ।

बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥

भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई ।

सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥

पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी ।

पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥

बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल ।

त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥

किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर ।

हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥

या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी ।

केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥

कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें ।

बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥

लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या ।

परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥

त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली ।

योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥

बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर ।

कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥

तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी ।

जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥

गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना ।

कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥

समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार ।

परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥

शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण ।

केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥

अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें ।

अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥

कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत ।

काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥

वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा ।

भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥

पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी ।

व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥

लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न ।

शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥

बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं ।

माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥

तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें ।

पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥

माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न ।

भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥

तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें ।

एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥

बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार ।

कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥

चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन ।

यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥

ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी ।

खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥

यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत ।

तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥

जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली ।

अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥

विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले ।

नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥

वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना ।

म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥

तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन ।

तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥

म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें ।

म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥

सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी ।

ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥

तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं ।

पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥

ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल ।

वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥

गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा ।

कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥

या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य ।

तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥

दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं ।

याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥

कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा ।

त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥

धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून ।

दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥

भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना ।

तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥

सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका ।

शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥

ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस ।

या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥

एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन ।

एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥

हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा ।

नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥

वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर ।

पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥

सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा ।

प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥

मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर ।

अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥

तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा ।

साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥

हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी ।

येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥

श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य ।

त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥

हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती ।

महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥

वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत ।

पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥

जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव ।

संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥

हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी ।

दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥

जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा ।

तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥

दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण ।

साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥

निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र ।

चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥

दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला ।

अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥

गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी ।

बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥

त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा ।

कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥

जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत ।

लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥

ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत ।

कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥

मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा ।

तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥

पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर ।

नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥

उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत ।

वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥

तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ ।

फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥

आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती ।

अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥

म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार ।

होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥

आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।

दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥

मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट ।

दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥

आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो ।

अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥

प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा ।

समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥

मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज ।

हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥

जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा ।

हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥

शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र ।

ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥

त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला ।

म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥

झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन ।

करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥

शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत ।

चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥

हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला ।

तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥

स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥

॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥

॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥

॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥

॥समाप्त॥

Sharing Is Caring:

Leave a Comment